गांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील
महात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम आहे. गांधी यांचे नाव गेल्या शतकातील सर्वश्रेष्ठ पुरुष म्हणूनदेखील काही वेळा उच्चारले जाते. आज ऐतिहासिकदृष्ट्या विचार करत असता गांधींचे जे महात्म्य आहे ते ध्यानी घेता ‘गूढ’, ‘गारूड’ हे शब्दप्रयोग अनैसर्गिक वाटत नाहीत. मात्र शंभर वर्षांपूर्वी, गांधीजी हे ‘फूल अॅक्शन’मध्ये असताना देशविदेशातील लोकांना ते गूढच वाटत होते असे ‘पुण्यश्लोक’ या, 1922 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जाणवते. ‘भारत गौरव ग्रंथमाले’ने ते पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे लेखक म्हणून ‘एक महाराष्ट्रीय’ एवढाच उल्लेख आहे. त्या पुस्तकात महात्मा गांधी यांच्यावर अनेक वृत्तपत्रे /नियतकालिके यांतील लेखांचे संकलन आहे. त्यामध्ये इतर भाषांत छापून आलेल्या लेखांचे अनुवाददेखील आहेत. प्रकाशक त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, “हा लेखसंग्रह करत असताना केवळ व्यक्ती या दृष्टीने महात्माजींची अवास्तव स्तुती किंवा विषदर्प दृष्टीने केलेली अकारण निंदा अशा प्रकारचे थोडे लेख हाती लागले; परंतु ते पुस्तकातून वगळले आहेत. केवळ तत्त्वदृष्ट्या हिंदुस्थानच्या चालू मन्वंतरासंबंधाने विचार करण्याची पात्रता ज्यांच्या लेखणीत दिसून आली तेवढ्याच लेखांचा संग्रह या पुस्तकात केला आहे.”