विद्यापीठ नामांतर आणि तारतम्य
विद्यापीठांच्या, रेल्वे स्थानकांच्या आणि विमानतळांच्या नावांवरून वाद सुरू झाले, की काही लोकांना वैताग येतो. मग असे लोक वेगळीच भूमिका घेतात. ‘नकोच कोणाचे नाव द्यायला!’ ‘नाही तरी नाव दिल्याने काय, विद्यापीठातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का?’ ‘नाव दिल्याने काय, कोणाचा मोठेपणा वाढणार आहे का?’ ‘कशाला या महापुरूषांना वादात ओढता?’ असे काही प्रश्न या लोकांकडून विचारले जातात. त्यांना नावावरून चाललेल्या एका अर्थाने निरर्थक अशा वादांचा कंटाळा आलेला असतो. साधारणत: अशा मागण्यांना एक जातीय पार्श्वभूमीही असते. तेव्हा व्यक्तीने कोणत्या तरी एका नावाचा पुरस्कार केला तर तिच्यावर एका जातीचा शिक्का बसेल आणि दुसरी जात तिच्यावर नाराज होईल अशी भीती लोकांमध्ये असते. म्हणून ते कोणाच्याही नावाचा पुरस्कार करण्याचे टाळून, नकोच ती नामांतराची कटकट असे सावधपणाचे धोरण स्वीकारतात. सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वरांचे नाव द्यावे की अहिल्यादेवींचे नाव द्यावे यावर वाद जारी आहे पण तो वाद करण्यापेक्षा केवळ सोलापूर विद्यापीठ असे नाव दिलेले काय वाईट आहे? अशी या लोकांची भूमिका असते.