शकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)
श्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले. त्यांनी 1933 ते 1955 या तेवीस वर्षांत सतरा चित्रपटांत भूमिका केल्या. त्यात – ‘कुंकू’, ‘सैरंध्री’, ‘लोकशाहीर रामजोशी’, ‘रामशास्त्री’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतही काम केले. शकुंतलाबार्इंनी Sense And Sensibility, Three Years in Australia ही दोन इंग्रजी आणि ‘भिल्लिणीची बोरे’, ‘काही आंबट काही गोड’, ‘देशविदेशच्या लोककथा’ ही तीन मराठी पुस्तकेदेखील लिहिली. शकुंतलाबार्इंनी दोन लहान लांबीची नाटकेसुद्धा लिहिली आहेत. त्यांची नावे आहेत ‘सोयरीक’ आणि ‘चढाओढ’. पैकी ‘चढाओढ’ आधी लिहिले होते, पण ते ‘सोयरीक’च्या नंतर, 1936 साली प्रकाशित झाले. त्यांच्या ‘चढाओढ’ नाटकाची ही ओळख.