वैराग्यवारी - परतवारी
पंढरपूरकडे जाणारी वारी ही ऐश्वर्यवारी असते. वारकऱ्यांची सोय गावोगावचे लोक, स्वयंसेवी संस्था, मंडळे करत असतात. दान देण्याची प्रवृत्ती त्या काळात दिसून येते. चहा, अल्पोपहार, फळफळावळे, उपवासाचे पदार्थ, पाणी यांचे वाटप सतत चालत असते. त्यामुळे वारीत श्रद्धाळू असतात तसे पोटार्थीही दिसून येतात. त्या दिंड्या परत कधी फिरतात? त्यांची व्यवस्था काय असते? परतीचा प्रवास किती दिवसांत होतो? किती लोक पालखीबरोबर असतात? या प्रश्नांची उत्तरे देणारे एक पुस्तक सुधीर महाबळ यांनी लिहिले असून ते पुण्याच्या ‘मनोविकास प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे नावच ‘परतवारी’ असे आहे.