नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच देतात. “आमच्या आवर्तनाने एकादशणीची पूर्तता होते, त्याप्रमाणे ह्या माझ्या अकराव्या ग्रंथपुष्पाने लेखनार्चनाची परिसमाप्ती होत आहे. त्यातही हे शेंडेपुष्प निखिल जगाचे पाप धुऊन टाकणा-या गंगा-यमुनांसारख्या पवित्र नद्यांवर पडत आहे ही संदहोकुल मनाला क्षणभर समाधान देणारी गोष्ट आहे.”
चापेकरांनी तो प्रवास नेपाळ, गंगोत्री-जन्मोत्री व केदारनाथ-बद्रिनाथ अशा पाच ठिकाणी केला. केदारनाथ व बद्रिनाथ ही यात्रा १४.५.३९ ते १७.६.३९ या काळात केली, त्यांचा नेपाळदर्शन ५ .३.४१ ते ३०.३.४१ व गंगोत्री-जन्मोत्री हा प्रवास १.५.४१ ते ३.६.४१ या काळात झाला. ते प्रवासवर्णन (अंदाजे) नोव्हेंबर ४१ मध्ये प्रसिद्ध झाले. म्हणजे पहिला प्रवास व त्याच्या वर्णनाची प्रसिद्धी यांत सुमारे अडीच वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यामुळे प्रवासवर्णनातील स्पष्टता, सत्यता कमी झालेली नाही, कारण चापेकरांनी सर्व ठिकाणच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या होत्या.