कविपण मिरवणारे सुधीर मोघे (Sudhir Moghe)
प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता सजवणारा कलंदर कवी आपल्यातून निघून गेला! सुधीर मोघे यांचा जन्म सांगली जिह्यातील किर्लोस्करवाडीचा. वडील कीर्तनकार असल्याने त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी पंडिती कवींच्या उत्तम रचना पडल्या होत्या. घरच्या संस्कारांचा भाग म्हणून त्यांचे दररोजचे परवचा म्हणणे न चुकल्याने शुद्ध शब्दोच्चार आणि पाठांतर झाले, अनेक स्तोत्रे, कविता, अभंग आदी मुखोद्गत झाली होती. त्यांना त्यांच्या पुढील लिखाणात त्या सगळ्याचा उपयोग झाला. त्यांच्या कविता त्यामुळे शब्द, ताल, सूर आणि लय घेऊन येत असत. त्यांनी किर्लोस्करवाडीला, शाळेच्या दिवसांत शाळेत होणाऱ्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतला, पण त्यांचा साहित्यिक म्हणून कालखंड सुरू झाला तो पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर. त्यांचे वडील बंधू श्रीकांत मोघे यांचे रंगभूमीशी संबंध असल्यामुळे, सुधीर मोघे यांना रंगभूमीचे आकर्षण लहाणपणापासून होते, पण त्यांच्यातील कवी हा लपून राहू शकत नव्हता. सुधीर मोघे यांचे ‘कविता सखी’ हे पुस्तक कविता संग्रह नसून कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचे एक धावते वर्णणात्मक पुस्तक आहे. कविता सखी या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी म्हणतो,
जो दिसतो तुम्हा ।
तेवढाच मी नाही ।।
बघण्याला तुमच्या।
नसो वर्ज्यही काही ।।