सु-यांचं गाव की सुराचं गाव?

0
79

तंत्रज्ञानात्मक, औद्योगिक वाढीला सामोरे जात असताना, महाराष्ट्रातला समाज हा वैचारिक, भावनिक, आध्यात्मिक क्षमतेचाही आहे याची प्रकर्षानं जाणीव व्हायला ‘थिंक महाराष्ट्र डाँट कॉम’ ह्या संकेतस्थळाचा उपयोग होणार आहे. तशी जाणीव निर्माण होण्याची गजरही आहे.

युरोप-अमेरिकेतल्या निराशाग्रस्त आयुष्यांकडे पाहिलं तर अशा त-हेचं समाजजीवन महाराष्ट्रात निर्माण होऊ पाहात आहे हे जाणवत. यासाठी अत्यंत योग्य वेळी ह्या संकेतस्थळाची कल्पना मांडली गेली आहे. दिनकर गांगल, अतुल तुळशीबगवाले, माधव शिरवळकर, भूषण केळकर वगैरे त्याचं नेतृत्व करत आहेत. तेव्हा त्यात यशाशक्ती योगदान करावं, ही नैतिक जबाबदारीची भावना माझ्यासारख्या अनेकांना ह्या कल्पनेविषयी निर्माण होईल अशी ताकद ह्या कल्पनेत आहे. आजुबाजूच्या परिस्थितीची भीषणता पाहता प्रत्येकांच्या अशा सहभागाची गरजही आहे.

नुसती टीका करणं हा कुठल्याही अनिष्ट, अयोग्य, कमी चांगल्या, कमी दर्जाच्या उपक्रमावर-प्रथेवर उपाय नसतो. अधिकाधिक चांगले पर्याय निर्माण करणं हा सकारात्मक उपाय असतो. – तो निर्माण होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा माध्यम म्हणून वापर करून TM वाटचाल करू शकेल.

वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रत्येक क्षेत्रामध्ये समाजासमोर अधिकाधिक चांगले पर्याय येण्याची फार मोठी गरज आहे. महाराष्ट्रात मनुष्यबळ प्रचंड आहे, पण या माणसांना  एक दिशा देण्याचा प्रयत्न TM या माध्यमातून होईल आणि एका कालानुरूप अशा विचारसरणीचा  जन्म, कदाचित या प्रकल्पातून होऊ शकेल!

आमच्या तळेगांवचा एकेकाळी ‘सु-यांचं गाव’ म्हणून लौकिक होता. खूप मारामा-या होत, गुंडगिरी होती, पण गेल्या पंचवीस वर्षांत श्रीरंग कलानिकेतन नावाची संगीतकलेला वाहिलेली संस्था निर्माण झाली. त्या आधी गो. नी. दांडेकर ह्या नावाची संस्था होती. आणखीही संस्था आहेत. त्यांनी सतत चांगलं काही दिलं आणि आता, तळेगाव ‘सुरांचं गांव’ म्हणूनही ओळखलं जातं. अशा त-हेचं अधिक व्यापक काम ह्या माध्यमातून होईल. ही एक संस्थाच असेल TM ला भेट देणा-या प्रत्येक संवेदनशील मनानं आजुबाजूला प्रत्येक गोष्टीबद्दल व्यक्त होणं ही त्यांची स्वत:ची तळमळ असेल. त्यातून विचारमंथन होईल.

योग्य आणि चांगलं हे स्वत:ची ताकद घेऊनच आलेलं असतं. ते सातत्यानं समाजासमोर येण्याची प्रक्रिया असण्याची गरज आहे आणि TM एक Facilitatorची भूमिका बजावू शकेल.

Constructive Learning  ही नवी संकल्पना सध्या अभ्यासली जात आहे. अशी परिस्थिती निर्माण करायची की त्यातून शिक्षण आपोआप होईल. शिकणारा त्याच्या नकळत शिकून प्रगल्भ होईल – असा ‘माहोल’  TM च्या माध्यमातून व्हावा असं माझं स्वप्न आहे.

केवळ Data Information ह्याच्या पलीकडे जाण्यासाठी ह्या दोन गोष्टी माध्यम देणारंच वापरून प्रयत्न करणं हा TM चा उद्देश आहे. नुसती Site Visit न करता सगळ्यांनी मिळून इमारत बांधायची आहे. ह्याचं architecture हळुहळू निर्माण होणार आहे. माकडांनी एकत्र येऊन सेतू बांधला, तर माणसं एकत्र येऊन काय करू शकतील, ह्याचा नुसता विचार केला तरी TM ची झेप कळेल.

तेव्हा आम्ही काही मंडळी ज्या एका बांधीलकीनं, ह्या प्रकल्पाला सुरूवात करत आहोत त्यांत सर्वांनी सामील व्हावं आणि हक्काचं माध्यम, हक्काचं व्यासपीठ म्हणून कर्तव्याचं भान ठेवून त्याचा वापर करावा हे आवाहन…

– विदुर महाजन

About Post Author

Previous articleमाळशेज रेल्वेचा पाठपुरावा… (Followup of Malashej Railway)
Next articleएक ‘भेट’ कार्यशाळा…
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.