सामुदायिक आनंदाची नाशिकची दिवाळी

0
374

नाशिक हे मंदिरांचे गाव. तेथे असंख्य आळ्या, पेठा नि वाडे. तेथे ‘दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! पूर्वी देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच…

नवरात्र संपल्या क्षणी नाशिकला दिवाळीची चाहूल लागायची. भिंतीवरचं कॅलेंडर त्यासाठी कधी पाहवं लागले नाही. अनेक मंदिरं… बाराव्या शतकातील, काही पेशव्यांच्या काळातील. त्या त्या सरदारांची. एखाद्या प्रशस्त वाड्यात असणाऱ्या स्वयंभू देवाच्या वास्तव्याने ती आख्खी पेठ धन्य होई. पंचधातूच्या दीपमाळेला लख्ख करण्यास प्रारंभ झाला नि देवांना उटणी लावून स्नानासाठी तयारी होऊ लागली, की अजि म्या देव पाहिलाम्हणून तो काळ हरखून जाई. देवाचे दागिने पाहण्यास बायका लगबगीने जमत. देवाचे ते रूप आगळं असे. देव अगदी आपलावाटे. सारी मंदिरं धुतली जात. गंगेचे पाणी हाच अभिषेक ! बिनदिक्कत तोंडात घेऊन आचमन केलं तरी पुण्याचे सोपानचढल्याचा आनंद ! गल्लीबोळातील वाड्यांचा प्रवास गंगेच्या काठापर्यंत संपून जाई. अरुंद रस्ते एकमेकांच्या कुशीत विसावत मेनरोडया नावाने सामोरे येत. तो रस्ता व्यापाऱ्यांचा, असंख्य दुकानं हातात हात घालून नतमस्तक झाल्यासारखी वाटत. कपड्यांपासून ते किराणा मालापर्यंतची दुकानं. सगळा माल त्या वेळेस दोन-तीन रस्त्यांवर मिळत असे. भद्रकाली मार्केट, बोहोरपट्टी, रविवार कारंजा, कापडपेठ… दिवाळीची पहिली चाहूल लागायची, जेव्हा त्या दुकानांतलं सामान बाहेर काढलं जायचं आणि दुकानांना रंगरंगोटी सुरू होई तेव्हा. लहानमोठे दुकानदार त्यांच्या दुकानांना नवा साज देत. ती दुकाने आपलीच, रोजचा तेथील संबंध. खात्यावर टिपून ठेवाअसे सहज सांगण्याचा तो काळ. दुकानदाराला घरातील मंडळींची नावे ठाऊक असे. तो कोणते सामान संपले आहे, काय हवे आहे त्याची आठवण करून द्यायची. घरच्यांचाही दुकानदाराच्या मालावरचा विश्वास. धावत पळत ते सामान आणले जाई. दुकानदाराने दुकानात रंगाचे काम काढले, की पसारा रस्त्यावर वाढत असे, पण त्याबद्दल तक्रार नसे. जाण्या-येण्यास त्रास नसे, ना तर कोणी दटावत. दिवाळीची चाहूल मात्र अधिक गडद होई.

असंख्य आळ्या, पेठा नि वाडे सज्ज होण्यास सुरुवात होई. कोणी मातीचे रंग आणून ठेवे. चोपणीने जमीन चोपून काढे. घर-दुकानं कधी पांढऱ्या मातीने तर कधी शेणाने सारवली जात. संकोच हा शब्द दूर दूरपर्यंत नसे. मागील-पुढील गल्लीत एक तरी गोठा सापडे. शेणाची बादली घेऊन पोरंटोरं जणू मोगऱ्याची फुलं आणण्यास चालली आहेत अशा थाटात बागडत जात. ते गोठे वसुबारसेला जणू नदीकिनाऱ्यावरील चिमुकली मंदिरंच बनत. पुरणपोळी नि गवारीची भाजी गाईच्या मुखात देऊन, तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला ओवाळत. तो हात कपाळाला नि गळ्याला लावत अनेकांची दिवाळी सुरू होई.

जवळच्या आडगावात एखाद्या शेतकऱ्याच्या घरात कुंभारणीकडून चूल रोवली जाई. धनगर, कुंभार, मांगाळीतून डालगीसूपं विक्रीसाठी बाजारात आली, की ती घेण्यासाठी झुंबड उडे. आपल्या मोटा, अवजार करून देणाऱ्या बारा बलुतेदारांना फराळ पायलीने दिली जाई. ती दिवाळी माणसांची माणसांसाठी असे. ब्राह्मण म्हणजे देव. त्याला नमस्कार करत, तो गंगेच्या काठावरील मंदिराशेजारच्या वाड्यातील. शिवाय, त्याच्या घरातच एक भले मोठ्ठं देवघर. तेथे असणारं अग्निहोत्र. तो त्याच्या घरी त्या काळात आला तर घर लख्ख नको?

चाळीतील प्रत्येक घरी आणि स्वत:च्या वाड्यातील घरात रंग, घरातील माणसांनीच लावणं हा जणू प्रघात. पोपडे पडलेल्या भिंती, कोळिष्टकं, देवांच्या तसबिरी, जुने फोटो नीट काढून ठेवले जात. घरातील जाणती मंडळी रंग आणण्यास बाहेर पडत. काही ठिकाणी मातीचे रंग तर त्यापुढील काळात काही ठिकाणी ‘ऑईलबाँड’, ‘डिस्टेम्पर’चे डबे घरात आणले जात, झाकण उघडल्याक्षणी त्यात एक रुपयाचं नाणं दिसे. ते अप्रूपानं जपून ठेवत. आतील कणकेच्या गोळ्यासारखा दाबून ठेवलेला तो रंग सांगितलेल्या सूचनेबरहुकूम पाणी टाकून तयार केला जात असे. तोवर इतर कोणीतरी बोहोरपट्टीत जाऊन भिंत खरडवण्याचे पत्रे घेऊन आलेला असे. मग घरातील भिंती घासण्याचं काम सुरू होई. मध्यमवर्गीय, पांढरपेशी सारी घरं दिवसभर त्याच कामात मग्न..पेंटरचे काम फक्त ऑईलपेंट लावायचं असलं तरच…बाकी कर्ती मंडळी रंगारी बनत. सारं नाशिक दिवाळीच्या आगमनासाठी असं सज्ज होई !

गंगेला नमस्कार करत असले तरी त्यात दिवाळीच्या पूर्वी महिना-पंधरा दिवस घरातील गोधड्या, अंथरुणं धुण्यासाठी गंगेवर जात. बायका ठरवून निघत… माळ्यावरील तोंडं वाकडी केलेली भांडी मात्र चौकातील नळावर घासण्यास काढली की चिंच गोळ्याचा तो मीठ लावलेला वास… भांड्यावरील तो पहिला हात… प्रथम त्याच्यावरील धुळीची पुटं काढली जात. मग त्याचा जणू ‘मेकओव्हर’ होई. काळपट, कुळकुळीत अंगं चकचकीत होई. अर्थात त्यापूर्वी कल्हईवाल्याचं आगमन. कल्हई केली जाई. त्या वेळेस मुलं मांडी मुडपून कोंडाळं करत कल्हईवाल्याभोवती बसत. नवसागराचा तो ‘चर्र’ आवाज आला की भांडं आतून गोरं झाल्याची निशाणी. मग बाहेरून लख्ख झालं की त्यावर पाण्याचा थेंब पडू न देण्याची खबरदारी घेत. मांडणीवर ती ठेवण्यासाठी मुलांना हाताशी घेतलं जाई. पितळ्याचे डबे रांगेत ठेवले जात. प्रत्येक वाड्यात मांडणीवरील पितळेचे आकारानुसार डबे लागले की चुलींवर कढया विराजमान होत.

दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! एका घरापाशी भाजणी, दुसऱ्या घरापाशी बेसन… नाकाला आरामच नसे. ‘अनुलोम विलोमा’चे कोणतेही प्रकार आत्मसात करणारा तो काळ नव्हता… तरी आम्ही आपोआप ‘कपालभाती’पर्यंत पोचत असू. गोडसर, तळणाचे पदार्थ वाड्यात स्पर्धा केल्यासारखे असत. ते घरात चालू असेपर्यंत बाहेर रांगोळ्यांचे ठिपके वाट पाहत गेरूनं रंगवलेल्या चौकोनावर पहुडलेले असत. कोठे सात ठिपके, कोठे सत्तावीस… त्यांना आपल्याला कोणता आकार दिला जाणार यांची प्रतीक्षा असे. एखाद्या वाड्यातील चौकात रंग आणि रांगोळी घेऊन तरुण, प्रौढ बायका बसत. सज्जात त्यांची वाहवा करण्यास पुरुष उभे असत (बहुधा, त्यांना घरी फराळाच्या आसपास उभं न राहण्याची तंबी मिळालेली असावी). उंबरठ्यावर रोजच्याप्रमाणे लक्ष्मीची आणि गायीची पावलं रेखाटून रांगोळी कायम काढली जाई, पण पुढे मोठ्ठ्या रांगोळ्या अगदी चित्रकथेची आठवण करून देणाऱ्या! रामसेतू पुलापाशी देवळाजवळ असाच कोणी अनामिक रामाची देवीची रांगोळी काढे नि त्याला नमस्कार करत नारोशंकराच्या दिशेनं अनवाणी पायानं जाऊन बायका ती डोळ्यांत साठवून येत.

नाशिक हे मंदिरांचं गाव. शहराचा स्पर्श होण्यापूर्वी गावातील दिवाळी सगळ्यांची एकच असे. फुलबाजार आणि मंदिरं यात कापडपेठेचा रस्ता. तोच भांडीबाजार, तोच सराफबाजार. धनत्रयोदशीच्या दिवशी तेथे नुसती लगबग ! झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं… सजवण्यासाठी लागणाऱ्या त्याच दोन गोष्टी. दाराला तोरण किंवा सोडलेल्या माळा. पुड्यांचे दोरे आणि मोठाल्या सुया-दाभण घेऊन मुलांना एका रांगेत बसवलं जाई नि घर तासाभरात सजे. रोषणाई म्हणजे घरच्या घरी केलेला आकाशकंदील. बुरुडाच्या दुकानातून आणलेल्या बांबूच्या कामट्या. त्या सोलायच्या… त्यातून कधी चांदणीचा आकार कधी अष्टकोन. त्याला लावलेला जिलेटीनचा रंगीबेरंगी पेपर. घरच्या घरी खळ तयार करत. पतंगासाठीचे कागद, त्याच्या केलेल्या झिरमिळ्या. ते काम दुपारभर पुरे. आतून एक काठी घेऊन खिडकीजवळ लावलेलं कनेक्शन. संध्याकाळी आकाशकंदील लागला, की हरखून जाऊन त्याकडे पाहणारे आपणच. पणत्या नव्याच्या जुन्या करत. पाण्यात टाकत. कारण काय, तर त्या तेल पीत नाहीत. जणू त्या शहाण्या, सवरलेल्या, समजूतदार सुनाच !  त्यांतील वाती वेगळ्या… सहाणेवर निगुतीनं तयार केलेल्या किंवा फुलवाती. उंबरठ्यावर पणत्या तर असतच. पण त्या परसदारी, शौचगृहातही लावून ठेवलेल्या.

फटाक्यांसाठी आतुर असलेल्या पणत्या प्रत्येकाच्या दारी. दिसेल त्या लहानमोठ्या देवळात पणत्या ठेवून येणारे अनेकजण. दहीपूल, भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा या ठिकाणी गर्दी उसळायची, ती नवीन केरसुणी घेण्यासाठी. अलक्षुमी म्हणजे केरकचरा. तो काढायचा नि लक्ष्मीची पूजा करायची... या वस्तू घेणाऱ्या कोणाशी घासाघीस नसायची... मनात शुद्ध भाव, नि त्या माणसांबद्दल आपुलकी.

दिवाळी ही लाह्या विकणाऱ्या भुजारींची, बुरुडांची. ती किकाभाई, दगडू तेली, बुधा, पांडे, भगवंतराव, सुगंधीबंधू यांच्याशिवाय पूर्ण होणे अशक्य. त्यांनी उटणे, लाह्या-बत्तासे आकाशकंदील, रंग, किराणा, मिष्टान्न घराघरात फराळाबरोबर देण्यास प्रारंभ केला, की दिवाळी नजीक येऊन ठेपल्याचा पुकारा होई. वडनेरे यांचा कर्णा दिवाळीत रस्तोरस्ती फिरायचा. सासरहून माहेरी आलेल्या नलूचा कधी पुकारा, तर कधी दिनमाहात्म्य, ‘आज पाडवा..चला ओवाळा !अमुक वहिनी, तमुक मावशी यांना करून दिलेली आठवण. सराफ बाजारातील सराफांकडून काही खरेदी केली आहे का? हा प्रश्न. पगडबंद लेन असो की हुंडीवाला... बोहोरपट्टी असो की गोरेराम लेन… तिथून एकदा का वडनेरे यांनी फेरी मारली की कुटुंबात चैतन्य येई. त्या काळातील ती होती जाहिरात. तोच युएसपी ! मंदिरात कीर्तन तसे आकाशवाणीवर त्या दिवसांत हमखास कीर्तन असायचे. ते पुढे दूरचित्रवाणीवरील काही वाहिन्यांवर लावलं जाऊ लागले.

एखादे घर भले प्रशस्त. आजूबाजूलाच न्हाणीघर. दोन्ही शेजारी शेजारी. एक काळ्या दगडाचे तर दुसरे पांढऱ्या दगडाचे. दोन्ही न्हाणीघरांच्या मधोमध एक खिडकी. आजोबा अभ्यंगस्नान करण्यास खाली आले की त्यांना बाहेरच्या चौकात चौरंगावर बसवत. तेल-उटणे लावत. घरातला हा अगदी मोठ्यांचा पाडवा. आजोबा आत न्हाणीघरात गेले, की आजीने लगतच्या न्हाणीघरातल्या बंबातील गरमगरम पाणी घंगाळात काढायचे आणि त्या छोट्या खिडकीतून तांब्या तांब्याने आजोबांच्या घंगाळात ओतायचे. सोवळ्यातील आजोबा त्यांचे अंग प्रथम धाबळीने कोरडे करायचे, मग धोतर नेसायचे... कोरे करकरीत ! अर्थात, हा असा शौक काही घरांतच असे. बाकी सर्वत्र बंब असायचा. तो पेटवण्यासाठी फार लवकर उठावे लागे. दिवाळीत तर पहाटे तीनसाडे तीनला पाणी तापवण्यास सुरुवात होई. ते पाणी केवळ गरम नसे. उकळते असे. पितळी नळ उघडताक्षणी त्या पाण्याचा तो ऊन स्पर्श उबदार बनवायचा. पाडव्याला पतीला ओवाळल्यावर मात्र पावलं काळ्या रामाच्या मंदिराकडेच वळत.

देवळात रोज काकड आरती अर्थात नदीकाठच्या घरांतच नव्हे तर नाशकातल्या विखुरलेल्या आळ्यांमध्ये ओवाळणे हा साग्रसंगीत प्रकार असे. नरक चतुर्दशीला आपण सूर्योदयापूर्वी उठलो नाही तर नरकात जाऊ ह्या भीतीपोटी चाळीचाळीत नि वाड्या वाड्यात मुलांची फौज उठलेली. चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती काही सेकंदांत आजीने काढलेली रांगोळी. कणकेचे करून ठेवलेले दिवे. तापलेला बंब. प्रत्येकाच्या नावाचा तयार केलेला दिवा. तुझी फुलबाजी लावली म्हणत, प्रत्येकाला न्हाणीघरात पाठवत बाहेरून फुलबाजी लावणं. अंघोळ झाली की ओवाळून घेत. नव्या कपड्यांत ओवाळून घेण्याची कोण घाई ! नवे कपडे घालून देवाला जाण्याचा रिवाज. एकाच ताग्यातले सगळ्यांना कपडे शिवून घेतले जात, पण कोणी कोणाला हसायचे नाही, कारण आनंद नव्या कपड्याचा असायचा. ते घालून मिरवायचे. कपडे शिवलेले. रेडीमेडचा जमाना फार पुढचा. शिंपीदेखील वेळेत कपडे तयार ठेवायचा. गुंड्या आणि नाडीसकट. बाहेर पडायचे तरी नातलग, शेजारी, माणसांची भलीमोठ्ठी यादी तयार असायची.

बायकांच्या न्हाणीचे प्रस्थ मोठे. मंदिरात जायचे तर ओल्या केसांचा अंबाडा घालून किंवा त्या ओल्या केसांचा सैलसर शेपटा मिरवत. शिकेकाई नि रिठे यांचा मादकसा गंध मंदिरात अगरबत्तीच्या पूर्वीच दरवळायचा... सुगंधी बंधूंचे फूल बाजाराच्या जवळचे दुकान...तेथे सुवासिक तेल-उटणी, सुगंधी द्रव्य. पुढे त्यांची जागा न पाहिलेले साबण, नि मोती नावाच्या अद्भुत साबण यांनी घेतली, तो अनेकांच्या तिजोरीत बंद असायचा. नि दिवाळीत दिसायचा. काय त्याचे अप्रूपअंगाला तेलाचे मालिश किंवा मर्दन नि नंतर ते काढण्यासाठी उटण्याचे घर्षण. कपडे धुण्यासाठी पुढील काळात आलेला सनलाइट आणि 501 चा बार. हे सारे दिवाळीत दिसायचे.

देवाच्याच नव्हे तर देवळातील पुजाऱ्यांच्या-वडिलधाऱ्या सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची नुसती धांदल उडायची. दिवाळीच्या त्या चार दिवसांत भेटेल त्याच्या पाया पडण्यास लावणारी घरं नि रस्त्यात नि:संकोचपणे मोठ्यांच्या पाया पडणारी मुलं, तरुण. हे दृश्य अगदी पाहण्याजोगे असे. गाव लहान. माणसं जोडलेली. दिवाळीत सगळी सात्विक होत नि आपण पावन पवित्र ! फराळात चकल्या-बेसनाचे लाडू, साटोरी-शंकरपाळे आणि पोह्यांचा चिवडा.. चकलीला नळी असणे गरजेचे. ह्या पदार्थांचे प्रस्थ असले तरी खरा मान असायचा करंजी आणि अनारसा या ‘सेलिब्रेटी’ पदार्थांना. ते दोन पदार्थ असे की जे देवाला प्रसादाला दाखवण्याचे. करंजी भरली नसली तर तो खुळखुळा. अनारसा नीट जमला नाही आणि तळताना तो फुटला की अनारसा फसला असे न म्हणता अनारसा हसला असे म्हणणे. पहिला फराळ संपल्यावर देवदिवाळीला तो चविष्ट व्हावा म्हणून आपल्या घरातील फराळाचे ताट शेजारच्याच नव्हे तर अनेक घरांत घेऊन जाण्याची प्रथा. तेदेखील ताटावर क्रोशाचे मोठे वस्त्र टाकून.

लक्ष्मीपूजनाला गुलालवाडीत, यशवंत पटांगणावर भुइनळ्यांची आतषबाजी होई. फटाके मर्यादित होते. रस्त्यातला फटाका, भुइचक्र माझ्या हातानेच पेटले गेले पाहिजे हा आग्रह नव्हताच मुळी. हे घेण्याची माझी आर्थिक परिस्थिती नाही, पण मग एखाद्याने लावले तर ते पाहण्यातील आणि ऐकण्यातील पराकोटीचा आनंद झिरपत राहायचा. तो या तीर्थक्षेत्राचा स्वभाव होता, मात्र आपापल्या घरचे पूजन झाले की लोक आवर्जून नदीकाठच्या पटांगणावर ते पाहायला येत. त्या वेळेस बाणांची स्पर्धाच लागायची जणू ! फटाक्यांसाठीची वेळ कोणी न लादता ठरलेली असायची रविवार कारंजा, मेन रोड इथे लडीच्या लडी फुटायच्या. त्या व्यापाऱ्यांच्या दुकानांमुळेधनत्रयोदशीला त्यांच्याकडची वहीपूजा आख्खं गाव आनंदाने संध्याकाळी अनुभवायचे. त्यांनी फटाके उडवणे यावर कोणाचा आक्षेप नसायचा. प्रदूषण हा विषय डोक्यातही नव्हता. पुढे पुढे फटाके विकत आणण्यासाठी गर्दी व्हायची पण मुलांना बरोबर न घेता पालकच कोणाला काय आणायचे ते ठरवत. सुतळी बॉम्ब हे आकर्षण. फुलबाज्या हा एक निरुपद्रवी प्रकार. टिकली त्यापेक्षाही बिचारी. लाल गडद रंगाचा अद्भुत प्रकाश पाडणारी आगपेटी त्यातली एकेक काडी पेटवत राहण्यातली मजा घेणारी घरातली सर्वात छोटी मुलं. कोणी कशाचा हट्ट धरायचं नाही. कारण उडणारे नि उडवणारे आपणच आहोत हे मनावर बिंबवलेले.

देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. दिवाळी संपल्यावर पुन्हा वेध लागणार हरिहर भेटीचे. हरी म्हणजे सूर्य तर हर म्हणजे शिव. हरिहर भेट सोहळ्यात सुंदर नारायण मंदिरातील नारायण आणि कपालेश्वर मंदिरातील महादेव यांची भेट मध्यरात्री घडवली जाते. बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले तरी त्याच्या शंभरपट पुण्य एका कपालेश्वराला पाहून होते अशी त्याची ख्याती. महादेवाला बेलाचे तर नारायणाला तुळशीचे पत्र वाहण्यात येते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्री विष्णू भगवान व शंकर भगवान यांची भेट होण्यासाठी रात्री बारा वाजता शंकर भगवान कपालेश्वर यांना वाहिलेला बेल, श्री सुंदर नारायण भगवान विष्णूंना वाहला जातो. कपालेश्वराला तीन दिवस अर्ध्या भागात भगवान विष्णू तर अर्ध्या भागात शंकर भगवान पाहण्यास मिळतो. विष्णूला उभे तर शंकराला आडवे गंध लावले जाते. पाठीमागे आरसे ठेवल्याने विलोभनीय दृश्य दिसते. सुंदर नारायणाच्या देवळापासून बाण सोडले जात. ते कपालेश्वराच्या दिशेनं. पुन्हा तेथून जे बाण सुटत ते सुंदर नारायणाच्या दिशेनं जात. ती आतषबाजी पाहण्यास झुंबड उडत असे.

गोदावरीच्या काठावर गाडगे महाराज पुलाजवळ आकारानं लहान असलेली देवळं लक्ष वेधतात. त्या समाध्या आहेत. साधारण शंभर वर्षांपूर्वी गावात राहणाऱ्या, त्या काळातील लोकांचे आदराचे स्थान असलेल्या ऋषितुल्यांच्या. त्यांनी मोक्ष मिळण्यासाठी केलेली देवाची आराधना. त्यानंतर त्यांना आलेला मृत्यू. आठवण म्हणून त्यांच्या बांधलेल्या समाध्या. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी त्या समाध्यांवर देव दिवाळी साजरी केली जाते. त्यांची वर्तमान पिढी समाधीजवळ येते. स्वच्छता करून संध्याकाळी पणत्या लावल्या जातात. अनेकजण पूजा करतात. त्रिपुरीला रामकुंडात जाऊन अंघोळ... दिवे सोडत डोळे भरून पाहत. त्या दिव्याला नमस्कार... तुळशी विवाहाचा एखाद्या शाही विवाहासारखा उडवलेला बार... लोकांना दिलेले आमंत्रण... बालाजी मंदिरात होणारा उत्सव... हे पूर्वापार चालत आलेले आहे. गावात जायला ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी जणू तिरुपती गावाबाहेर गंगापूर रोडला, सोमेश्वराच्या पलीकडे दिमाखात विराजला आहे. त्रिपुरीला पण त्यांची आरास करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या चार चाकी गाड्यांना जागा पुरत नाही.

खरे तर, पुण्याचा-मुंबईचा गणपती पाहण्यास देशभरातील लोक गर्दी करतात. तसे नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध. मात्र हे शहर दिवाळीचा सामुदायिक रीत्या आनंद घेणारे होतं. आज, माझी हजाराची तुझी पाचशेची लड म्हणत स्पर्धा आली. गाव नि शहर आपसूक पूररेषेसारखे बाजूला झाले. सामूहिक शहाणपण विरजण्याऐवजी थोडे बिघडले. ‘मी’ कळसापेक्षा कितीतरी उंच झाला. पण थंडी पडण्यास सुरुवात झाली नि दिवाळीपूर्वीच पिंपळाच्या पाराशेजारी नि आख्ख्या नाशकात पाडवा पहाटेची पोस्टर्स झळकू लागली की पावलं पुन्हा गावाकडे वळतात.

बदल झाला आहे. फराळाऐवजी मिसळ खाल्ली जाते… चुकीचे काही नसतेच मुळी. राजाला रोजच दिवाळी… आता आपण सारे राजे नि राण्या. घरे अॅमेझॉननं सजलेली असतात. एशियन वा अन्य पेंट दरवर्षी भिंतीना असतो. आता तर भिंती टाइल्स लावून करून घेतलेल्या असतात. त्यामुळे भितींना रंग देण्याचा प्रश्नच येत नाही. रोषणाईसाठी दिव्यांच्या माळा असतात नि डिझायनर पणत्या… फराळ प्लॅस्टिकच्या पिशव्यांतून येतो. दिवाळीतच नव्हे तर कोणत्याही दिवशी… एक सुखद बदल मात्र येथे घडला. हेरिटेज वॉकनं प्राचीन परंपरा, जीर्ण वास्तू, पुरातत्त्वशास्त्र यांचा नाशिककरांशी हृदयस्थ संवाद सुरू झाला नि दिवाळीला कित्येकजण त्या ठिकाणी आवर्जून जाऊ लागले… माणसं पुन्हा नव्यानं नात्याचा गुणाकार मांडू लागली… चुलत-मामे-आते भावंडांचा शोध सुरू होऊन फॅमिलीचा ग्रूप तयार झाला. दिवाळीत नाही तरी देव दिवाळीत याच नाशिकला, असं आगत्याचं आमंत्रण दिलं जाऊ लागलं. संवादात स्मरणरंजनाचा भाग अधिक आला. प्रदूषण तेव्हा नव्हतं नि फराळामुळे कोणाचे घसे बसले नाहीत. तेल-तूप शुद्ध होतं नि मनातील भावदेखील शुद्ध असा निरागस होता. आता भाव वाढला.. तो वस्तूंचा.. नि मनातील भाव हीन होऊन गेला.. हे आपसूक घडलं तरी श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपानं त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच.

वृंदा भार्गवे 9373928404 bhargavevrinda9@gmail.com

(‘झी -मराठी उत्सव नात्याचा’ 2019 अंकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

———————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here