एप्रिल 2010 पासून शासनाकडून लागू करण्यात आलेल्या शिक्षण विषयक कायद्यानुसार महाराष्ट्रातील सर्व मुलांच्या आठवीपर्यंतच्या शिक्षणची सोय शासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयातला विरोधाभासा असा, की राज्यातल्या शासनाकडून चालवल्या जाणा-या शाळा या सातवीपर्यंतचेच शिक्षण पुरवतात. शासन म्हणते, आम्ही आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करणार नाही. जर सातवी पास झालेल्या मुलांनी ‘आम्हाला आठवीत प्रवेश मिळवून द्या’ अशी मागणी केली, तर आम्ही त्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मुलांना आठवीपर्यंत शिक्षण उपलब्ध करून देण्याचा शासनाचा स्वतःचाच नियम असताना राज्यातल्या शाळा आठवीपर्यंत का केल्या जात नाहीत?
शासन म्हणते, की प्रवेशास इच्छुक असलेल्या मुलांना मदत केली जाईल. पण जेव्हा गोखले रोडवरील एखाद्या महापालिकेच्या शाळेतून सातवी पास झालेल्या मुलाला बालमोहन शाळेकडून प्रवेश देण्यास नकार देण्यात येतो, तेव्हा आपल्या मुलाला कायदेशीररित्या प्रवेश मिळवून देण्यासाठी त्या पालकांना जी कुतरओढ करावी लागते, जो खर्च उचलावा लागतो, त्या समस्यांवर कधीच तोडगा निघत नाही आणि आठवीपासून शाळा सुरू करण्यात येणा-या अडचणी स्पष्ट करताना शासनाकडून जे पैशांच्या कमतेरतेचे कारण पुढे करण्यात येते, ते मान्य करणे अशक्यच आहे.
– विजया चौहान
शिक्षण हक्क समन्वय समिती
आणि मराठी अभ्यास केंद्र.
दिनांक – 22/04/2011
{jcomments on}
About Post Author
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.