श्रीक्षेत्र वरदपूर

3
147
carasole

वरदपूर हे कर्नाटकाच्या शिमोगा जिल्ह्यातील सागर तालुक्यातील गाव. ते ‘वरदहळ्ळी’ या कानडी नावानेही ओळखले जाते. त्या ठिकाणी श्रीधर स्वामी यांची समाधी व आश्रम आहे. सह्याद्री घाटाच्या उंच शिखरावरील निसर्गरम्य, वनश्रीने नटलेल्या त्या स्थानास महर्षी व्यास व अगस्ती यांनी ध्यानभूमी बनवली होती. अशी आख्यायिका आहे. व्यासांनी ध्यानधारणा केलेली गुंफा अजूनही त्या ठिकाणी दाखवली जाते. तेथून जवळच शरावती नदी आहे.

श्रीधर स्वामी हे प्रभू रामचंद्रांचे भक्त व सज्जनगड निवासी समर्थ रामदास यांचे शिष्य होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील लाड चिंचोली येथे ७ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांनी हैदराबाद येथे शिक्षण घेतल्यावर ते पळणीटकर गुरुजींच्या मार्गदर्शनाने सज्जनगडला आले. तेथे त्यांनी ध्यानधारणा केली. त्यांना समर्थ रामदासांनी दिव्यदर्शन देऊन आशीर्वाद दिला व कर्नाटकात जाऊन वैदिक धर्माचा प्रसार करण्याचा आदेश दिला. त्यांनी पुढे बारा वर्षें भारतभर पायी प्रवास केला. सगळीकडे वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी शिगेहळ्ळी येथे संन्यासाची दिक्षा घेतली, धार्मिक व्याख्याने दिली, वेदांचे सार सर्वसामान्यांपर्यंत पोचवले. स्वामींचे मराठी, संस्कृत, कन्नड, हिंदी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व होते. वेदांताची आणि तत्त्वज्ञानाची कठीण प्रक्रिया सुलभ करून सांगणे हे त्यांच्या प्रतिभेचे कौशल्य होय. त्यांनी लहानमोठे चाळीस ग्रंथ लिहिले. श्रीरामपाठ, श्री समर्थपीठ, शिवशांतस्तोत्र, विवेकोदय, दत्तकरुणार्णव, सप्ताध्यायी, मुमुक्षूसखा इत्यादी सुंदर काव्यमय ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांचा आर्यसंस्कृती हा पाचशे पानांचा सुंदर ग्रंथ असून त्यांनी विश्वधर्म, वैदिकधर्म, नीतिधर्म, राष्ट्रधर्म, मानवांचे श्रेष्ठ कर्तव्य अशा विविध उद्बोधक विषयांचे विविचेन केले आहे. त्यांचे अमृतवाणी, मधुरवाणी, मोक्षसंदेश, ज्ञानयोग, भक्तियोग असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

स्वामीजी वरदपूरला १९६७ मध्ये आले. त्यांनी त्या ठिकाणी सहा वर्षें वास्तव्य केले. आश्रमाचा परिसर जेथून सुरू होतो त्या रस्त्यावर मोठे प्रवेशद्वार आहे. तेथून आत अर्धा किलोमीटर गेल्यावर आश्रमाचे ठिकाण लागते. पार्किंग जागेजवळ चिरेबंदी कुंड आहे, त्याला ‘श्रीधरतीर्थ’ असे म्हणतात. त्या तीर्थातील पाणी गोड आहे. तेथे स्नान केले तर पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे. समाधी स्थळ उंच शिखरावर आहे. तेथे जाण्यासाठी तीनशे पायऱ्या चढून जावे लागते. ते शिखर हिरवाईने व उंच वृक्षवेलींनी वेढलेले आहे. त्यामुळे पायऱ्या चढताना थकवा जाणवत नाही. पायऱ्या चढून वर गेले, की डोंगराच्या माथ्यावर शिखरकुटी नावाची इमारत आहे. तेथे छोटे समाधी मंदिर आहे. त्या ठिकाणी श्रीधरस्वामींची समाधी आहे. बाजूला स्वामींचा स्मितहास्य करत असलेला करुणामयी फोटो ठेवला आहे. तो परिसर उंचावर आणि डोंगरावर असल्याने समोरचे दृश्य अतिशय सुंदर दिसते. जवळच ध्यान मंदिर आहे. तेथून आणखी एक किलोमीटर उंचावरील शिखर भागात ध्वजस्तंभ उभारलेला आहे. पंचधातूचा तो स्तंभ तीस फूट उंचीचा आहे. त्यावर चाळीस किलो चांदीचा धर्मध्वज बसवला आहे. त्या ध्वजावर सुवर्णाक्षरे काढलेली आहेत. श्रीधरस्वामींनी त्या ध्वजाची पूजा केली व ओंकाराच्या जयघोषात ध्वजस्थापना केली होती. खाली आश्रमात गोशाळा आहे. स्वामीजींच्या नावाने तेथे संस्कृत पाठशाळा आहे. तेथे वेद, उपनिषदे यांचे अध्ययन केले जाते. तेथील सर्व कर्मचारी सेवाभावाने काम करतात. आश्रम परिसरात मोठी यज्ञ शाळा आहे. परिसराजवळच अर्धा किलोमीटर अंतरावर दुर्गा देवीची सुंदर मूर्ती आहे. स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

– रंजना उन्हाळे

(‘आदिमाता’, जानेवारी २०१७ अंकावरून)

About Post Author

3 COMMENTS

  1. Mast. Amhi bapat sagarche. N
    Mast. Amhi bapat sagarche. N sridharswami bhakt. Mahiti lihitana bapatanche nav kalalach asave. Karan sagarla 25 ghar tari bapat ahet. Bhetayale avdel. Mi punyat bahutek yete. Nahitar tumhi mumbai la yaych bagha.
    No 9819056796

  2. Shreedhar swamy amchya
    Shreedhar swamy amchya sagarchya ghari alele ahet.
    Ankhi kahi mahiti tumhala milu shakte

  3. मला दर्शनासाठी जायचे आहे

    मला दर्शनासाठी जायचे आहे
    रेल्वे रूट सांगाल
    मनमाड वरून जाणे साठी

Comments are closed.