‘विश्वेश्वर’ची चौफेर नजर!

9
72
carasole

आलमल्यासारख्या लातूर जिल्ह्यातील आड गावात शहरी शिक्षणाला लाजवेल असे शिक्षण आणि नैसर्गिक सानिध्य! जे जे शहरी शिक्षणात आहे ते सर्व व शिवाय, नव्याने आणखी काही ‘विश्वेश्वर शिक्षण मंडळा’ने निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा तत्पर उपयोग घडवून आणून त्यांच्यामध्ये देशपातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावण्याची किमया त्या शिक्षणसंस्थेने उभी केली आहे. त्या महाविद्यालयात टेक्निकल शिक्षण आहे. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी नेहा पाटील ही पहिली मुलगी अठ्ठ्याण्णव टक्के गुण घेऊन पॉलिटेक्निकमध्ये प्रथम आली व यशाचा मान संस्थेच्या शिरपेचात खोवला गेला. त्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी पहिली कार निर्मिती जगासमोर आणली! त्या महाविद्यालयाचा निकाल नव्वद टक्क्यांच्या पुढे पुढे सरकत आहे.

आलमला हे गाव लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आहे. शेतकरी शिवचरण धाराशिवे यांना परिस्थितीमुळे शिक्षणाची भूक पूर्ण करता आली नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षित मुले यांच्या शिक्षणाचा विचार करून, दहा वर्षांपूर्वी तालुक्यातील केवळ पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या आलमला या गावात ‘विश्वेश्वर शिक्षण मंडळा’ची स्थापना केली. ग्रामीण भागातील ‘शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी’ सुरू झाले. ते उच्च शिक्षण व रोजगार या दोन्ही गोष्टींची सांगड घालून उभे ठाकलेले पहिले महाविद्यालय. त्यांनी त्याच गावात दुस¬ऱ्या दोन महाविद्यालयांची सुरुवात करून दिली – ‘दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेज’ व ‘विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय’. ती गोष्ट दहा वर्षांपूर्वीची.

शिक्षणाच्या आवडीनिवडी विद्यार्थ्यांमध्ये कशा उभ्या राहतात व त्यांची गरज भविष्यात काय असेल याची सांगड संस्थेने खेड्यात असणाऱ्या त्या महाविद्यालयांत घातली. शिवचरण धाराशिव यांनी स्वत:च्या शेतीवर कर्ज काढून आलमलासारख्या गावात हे धाडस दाखवले. त्यांना अवलियाच म्हणायला हवे. ‘विश्वेश्वर शिक्षण मंडळा’त शिकलेली शेकडो मुले, मुली देशभरात व परदेशात गुणवत्तेचा झेंडा रोवत पुढे जात आहेत.

लातूर जिल्हाऔसा तालुका दुष्काळाने तीन वर्षांपासून होरपळत होता. संस्थेने गोरगरीब कुटुंबांतील शेतक¬ऱ्यांच्या मुलांना ‘मातोश्री शांताबाई लिंबनप्पा धाराशिवे’ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्यता केली. एकूण एकशेवीस विद्यार्थ्यांना बारा लाख छत्तीस हजार रुपये एवढा निधी वाटप करण्यात आला.

‘श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळा’च्या सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी गार्डियन (पालकत्व) पद्धतीचा अवलंब केला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा या करता वीस विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक या पद्धतीने पालकत्व स्वीकारतात. त्या वीस विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व बौद्धिक क्षमता उंचावण्याकरता आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आत्मिक ऊर्जा देण्याचे काम ‘पालकां’कडून केले जाते. पालकत्व घेणारे प्राध्यापक दर आठवड्याच्या बैठकीत प्रगतीचा आढावा सांगतात. जे विद्यार्थी कमी पडत असतील तर त्यावर संबंधित शिक्षकाशी चर्चा करून त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेकरता व्यक्तिगत लक्ष ठवून प्रयत्न केले जातात. प्रवेश घेताना दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतात तेव्हाची मार्कांची टक्केवारी आणि ते शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात तेव्हाची टक्केवारी यांत  किमान चाळीस टक्के गुणाचा फरक दिसतो.

सर्व महाविद्यालयांत रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील पस्तीस विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, फार्मसी महाविद्यालयातर्फे औसा तालुक्यातील साडेसतरा हजार शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, एड्स जनजागरण मेळावा असे उपक्रम संस्थेतर्फे चालवले जातात. संस्थेच्या वतीने तुळजापुरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे दिली जातात.

तसेच, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ‘इन्स्पायर अवॉर्ड २०१४’चे संस्थेच्या वतीने आयोजन केले गेले. त्यामध्ये जिल्ह्यातील सुमारे सहाशे शाळांनी सहभाग घेतला. चाळीस हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित राहिले. दरवर्षी इयत्ता दहावीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापकांचा गौरव करून, त्यांना वॉटर कुलर भेट दिले जाते. तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा आलेख वाढवण्यासाठी प्रयत्न संस्थेकडून केला जातो. त्याचाच भाग म्हणून दरवर्षी आदर्श शिक्षक व आदर्श कर्मचारी असे पुरस्कार देण्यात येतात.

‘विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक’, ‘शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी’ व ‘दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी महाविद्यालय’ यांतील विद्यार्थी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रदर्शनांस व विविध औद्यौगिक संकुलास भेट देतात. त्यामध्ये प्रामुख्याने ईलेक्रामा या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रानिक्स प्रॉडक्टच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा समावेश असतो. ते दर दोन वर्षांनी देशाच्या विविध ठिकाणी भरवले जाते. जायकवाडीचे धरण (नाथसागर), बीएसएनएल- लातूर, पीयागीयो प्रा.लि.- बारामती, गॅलीअस टेक्नॉलॉजी- पुणे, झेड एफ स्टेअरींग गिअर प्रा.लि.- पुणे, आकाशवाणी केंद्र- अंबेजोगाईउस्मानाबाद, थर्मल पॉवर जनरेटिंग स्टेशन- परळी वैजनाथ, मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना- लातूर, २२० के.व्ही. सबस्टेशन, हरंगुळ, पार्ले इंडस्ट्रीज- सोलापूर, पॅटसन् वॉल्व्ह- लातूर, ५ मेगावॅट सोलार पॉवर जनरेटिंग प्लांट- गोंद्री, अडोरा फार्माशुटिकल प्रा. लि.- औरंगाबाद या व यांसारख्या अनेक औद्यौगिक संकुलांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध तंत्राविष्काराचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त होते.

विश्वेश्वर संकुलात प्रत्येक वर्षी तीन दिवसांचा राष्ट्रीय महोत्सव भरतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा विकास घडण्यास मदत होते. निशिगंधा वाड, समीरा गुजर, बसवराज पाटील, राणा जगजितसिंह पाटील, विक्रम काळे, वैजनाथ शिंदे, कवी इंद्रजीत भालेराव, विनोद मोहितकर, महेश शिवणकर, सामेश्वर मुद्दा, डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, प्राचार्य सलगरे सर, कुंभार सर आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय महोत्सवात एक लाख रुपये पर्यंतची बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास गौरवण्यात येते. त्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, रोबोरेस, रोबोवार व बॉब द बिल्डर अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यासाठी चाळिसावर अनुभवी प्राध्यापक व विभाग प्रमुख परीक्षक म्हणून काम पाहतात.

विश्वेश्वर संकुलातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेस निवडले जातात. त्यात इंडियन फार्माशुटिकल काँग्रेस, यांच्या तर्फे आयोजित टेक्निकल पोस्टर प्रेझेंटेशनकरता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विश्वेश्वरय्या टेक्नोफेस्ट (२०१४ व २०१५) या राज्यस्तरीय तंत्रस्पर्धेत वेगवेगळ्या स्पर्धांत प्रथम व द्वितीय स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी पुणे येथील ‘युनिव्हर्सल अभियांत्रिकी महाविद्यालय’ राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पेपर प्रेझेंटेशन या विषयात प्रथम स्थान पटकावले.

संस्थेला ‘मनोगत प्रतिष्ठान’च्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट प्रशासन सेवा पुरस्कार २०११ मध्ये व लातुरचा राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच, बेस्ट इन्स्टिट्युट अॅवॉर्ड हे ‘स्टुडंट टेक्निकल असोसिएशन’च्या वतीने २०१३ मध्ये उत्कृष्ट अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय म्हणून कै. यशवंतराव चव्हाण ज्ञानपीठ पुरस्काराने (सोलापूर) व ‘महाराट्र शिक्षक काँग्रेस’च्या वतीने (नवी दिल्ली) इंदिरा गांधी राष्ट्रीय शिक्षा शिरोमणी पुरस्कार देण्यात आले. बेस्ट सिटिझन अवॉर्ड, संस्थामित्र पुरस्कार हे अन्य काही सन्मान. तसेच, ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ’ यांच्या वतीने २०१४ मध्ये विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयास ‘उत्कृष्ट दर्ज्या’ने  सन्मानित करण्यात आले.

– पल्लवी शिंदे

Last Updated On – 4th Oct 2018

About Post Author

9 COMMENTS

  1. खुप छान लेख आहे. मनापासून
    खुप छान लेख आहे. मनापासून धन्यवाद दखल घेतल्याबद्दल.

  2. We are the future of
    We are the future of Technical education. We are the future of many fields. We ara the bestest in Education.

  3. आपल्या webside मुळे अनेक
    आपल्या webside मुळे अनेक चांगल्या संस्थेची माहिती मिळते.

  4. मला आपला सार्थ अभिमान आहे

    मला आपला सार्थ अभिमान आहे
    — राजू पाटील SBN पुणे

Comments are closed.