विनय सहस्रबुद्धे – प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन

IMG_8734

ज्‍योती शेट्ये

प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन

विनय सहस्रबुद्धे‘आत्म दीपो भव’ म्हणत स्वत:च्या अंतरंगात उजळलेल्या प्रकाशात वाटचाल करण्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार्‍या, प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन ही कार्याची त्रिसूत्री असणार्‍या आणि दक्षिण आशिया खंडात अशी एकमेव संस्था असल्याचा दावा सांगणार्‍या ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ मध्ये विनय सहस्रबुद्धे ह्यांचा प्रवेश

८ फेब्रुवारी १९८८ ह्या दिवशी झाला. तिथून त्यांनी उड्डाण केले, ते आज भारताच्या राष्ट्रीय वर्तुळात वावरत आहेत. एनडीटीव्ही सह वेगवेगळ्या वाहिन्यांवरील पंडितांच्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चा-परिषदा यांत ठाम मते मांडत आहेत. तत्सबंधी लेखन करत आहेत. अर्थात त्यांचा म्हाळगी प्रबोधिनीपर्यंतचा प्रवासदेखील सर्वसामान्य नाही, तो कष्टाचा आहे, नियोजनपूर्वक आहे.

विनय यांचे वडील ‘खादी ग्रामोद्योग’मध्ये नोकरी करत होते. विनय यांचे बालपण धुळे  येथे गेले. पाचव्या इयत्तेत त्यांची निवड एका विशेष शाळेसाठी झाली. तेव्हाच्या नासिक महसूल विभागातून तुलनेने जरा ‘स्पार्क’ असलेली आणि हुशार मुले त्या शाळेसाठी निवडली जात असत. मधुकरराव चौधरी ह्यांच्या कल्पनेतून साकार झालेली ती शाळा होती. विदर्भातून आलेले ब्र.भा.सिंघम हे त्या शाळेचे प्राचार्य होते. ते कल्पक आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने काम करणारे होते. त्यांचा सहकारीवर्गही तसाच होता. त्या निवासी शाळेत अभ्यासाबरोबर अन्य उपक्रमही यशस्वीपणे राबवले जात असत.

शाळेत प्रिंटिंग प्रेस, डार्करूम, fret machine, ग्रंथालय आणि बाग होती. मुले fret machine वर खेळणी बनवत असत. पुस्तके नोंद करून ठेवतानाच वाचून होत असत. मुले किचनचे स्टोअर सांभाळत असत. मुलेच बागेची निगराणी करत. शाळेत लेझीम आणि बँडपथके होती.

मुलांनी वर्गात बसण्याची व्यवस्थाही वैशिष्ट्यपूर्ण होती. तीन बेंचचा एक गट व त्यावर सहा विद्यार्थी बसत. असे पाच गट प्रत्येक वर्गात असत. एका वर्गात तीसच मुले असत. मुले गटागटाने वर्गातला अभ्यास आणि शाळेतली सर्व कामे करत. विनय तेथे असताना त्यांनी `पालवी` नावाचे हस्तलिखित काढले होते. एका वर्षी त्यांनी स्वत: खिळे जुळवून एक मासिक छापलेदेखील! त्यांच्या गटाने सातवीत असताना ‘आजार्‍याची खोली’ हा दोनशे पानांचा प्रबंध लिहिला होता.

स्वावलंबन, संघभावना असे गुण आणि घरापासून दूर राहायला शिकवणारी ही शाळा व शाळेचे प्राचार्य, शिक्षक ह्या सर्वांचा मोठा वाटा माझ्या वाढीमध्ये आहे असे विनय सांगतात. शाळेचे बोधवाक्य ‘उद्धरावा स्वये आत्मा’ हे पुढे उत्तम लेखक, पत्रकार आणि प्रशिक्षण केंद्राचे महासंचालक बनलेल्या विनय यांच्या ध्येयाचा उगम आणि प्रेरणा होत.

त्यांच्या कॉलेजजीवनाचा प्रारंभ पुण्यात स. प. कॉलेजमध्ये झाला. तिथे ते विद्यार्थी परिषदेकडे आकर्षित झाले. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे चे सक्रिय कार्यकर्ते आणि नेते बनले. ते आणीबाणीच्या काळात सत्याग्रही म्हणून तुरुंगात गेले. जेलमध्ये दीड महिना राहणे हा मनावर खोलवर परिणाम करणारा अनुभव आहे ही त्यांची प्रतिक्रिया. आसपासच्या लोकांचे अंतर्बाह्य दर्शन घडवणार्‍या जेलने, मोठी वाटणारी माणसे मनाने किती छोटी असतात आणि छोटी वाटणारी माणसे मनाने किती मोठी असतात ह्याचा प्रत्यय दिला. तो दीड महिना आणि परत संघबंदीला वर्ष झाले म्हणून दोन-तीन दिवस तुरुंगात राहण्याचा काळ हा त्यांची स्वत:ची व्हिजन बनण्याचा आणि वैचारिक ओळख दृढ करण्याचा होता.

त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली आणि विनय त्यांच्या कुटुंबीयांबरोबर मुंबईत दाखल झाले. ते रुइया कॉलेज मध्ये शिकत असताना ‘हवा कॉलेजची’ ह्या सदरासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स ’ ह्या दैनिकात लिहीत असत. त्यावेळी ‘मटा’त असलेल्या दि.वि.गोखले, प्रकाश अकोलकर वगैरे लोकांबरोबर भेटी होत. ‘लोकसत्ता’ च्या चंद्रशेखर वाघांनी विनय यांची ‘जेल डायरी` प्रसिद्ध केली. रत्नागिरीचे सतीश कामत (पत्रकार) ह्यांनी त्यांना `माणूस’च्या श्री.ग.माजगावकर ह्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळवून दिली. साधे वाटणार्‍या पण ‘ग्रेट’ असणार्‍या माजगावकारांबद्दल विनय आदराने बोलतात आणि आपल्या जडणघडणीवर त्यांचा खूप प्रभाव पडला आहे असे सांगतात. ‘माणूस`ने त्यांना १९८०साली आसाम राज्यात पाठवले. त्यांनी ‘अस्वस्थ आसाम’ ही लेखमाला लिहिली.

संगठन कौशल. संपादन - डाँ. विनय सहस्रबुद्धे, हिन्दी रूपांतर – प्रकाश भातम्ब्रेकरलहानपणी शासकीय निवासी शाळेत राहिल्याने संघाच्या शाखेत जाणे विनय यांना शक्य नव्हते. अर्थात घरातले वातावरण संघाचेच होते. त्या मुळे अ.भा.वि.प. च्या मार्गाने विनय नंतर संघपरिवारात सामील झाले. अर्थात असे असूनही यशवंतराव केळकर यांच्यासारख्या अनेकांनी सर्व विचारांच्या व्यक्तींशी मैत्री करण्याचीच शिकवण आम्हाला दिली असे ते सांगतात. शिवाय ‘माणूस’च्या संस्कारामुळे त्यांच्यात कधी झापडबंदपणा आला नाही असे ते नमूद करतात. ते पदव्युत्तर शिक्षण घेत असताना एका ‘न्यूज एजन्सी’त इंग्लिश आणि मराठीतून स्तंभलेखन, सदरलेखन करत होते.

ते शिक्षण संपवून तब्बल पाच वर्षे अ.भा.वि.प. चे पूर्ण वेळ कार्यकर्ते बनले. त्या काळातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक

प्रा.यशवंतराव केळकर, ह्यांना ते कधी विसरू शकणार नाहीत. ‘कार्यकर्ता म्हणून मी जो काही आहे त्याचे सगळे श्रेय केळकर ह्यांना आहे’ असे ते म्हणतात. तो नेतृत्वगुण बाणण्याचा काळ होता. त्याच वेळी स्टुडंट्स एक्सपीरियन्स इन इंटरस्टेट लिविंग (SEIL ) ह्या योजनेअंतर्गत ते वारंवार पूर्वांचलात जात. ‘एकाकी पूर्वांचल’ (१९८७) हे पुस्तक त्या अनुभवाचे संकलन आहे.

ते अ.भा.वि.प.चे काम थांबवून १९८५ नंतर सार्वजनिक जगतात स्वतःची ओळख काय आहे ते अजमावून पाहण्यासाठी मिडीयाच्या जगात शिरले. ते ‘मिड-डे ’ ह्या दैनिकात उपसंपादक म्हणून पाच-सहा महिनेच रमले. मग ते ‘कॅम्लिन ’मध्ये जॉब करू लागले. तिथे ते दोन वर्ष राहिले. त्याच दरम्यान ते विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नी नयना सहस्रबुद्धे ह्याही अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्या. त्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्या भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या सचिवही आहेत. त्यांनी स्वत:कडे घराची, विशेषत: आर्थिक जबाबदारी घेऊन विनयना त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याची मुभा दिली आणि फेब्रुवारी १९८८ मध्ये विनय संघपरिवाराच्या एका महत्त्वाच्या संस्थेत नवीन आव्हाने स्वीकारायला सज्ज झाले.

तेव्हापासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही त्यांची कर्मभूमी झाली. आता प्रबोधिनी म्हणजे विनय सहस्रबुद्धे असे समीकरण झाले आहे. प्रबोधिनीची वाटचाल गेली अठ्ठावीस वर्षे जोमाने सुरू आहे. राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायत सदस्यांपासून, आमदार-खासदार, तसेच राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत, तर स्वयंसेवी क्षेत्रात बचत गटातील महिलांपासून पर्यावरणापर्यंतच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणापर्यंत प्रबोधिनीने स्पर्श केला आहे. संघटनाशास्त्र, नेतृत्वशास्त्र, संस्थाबांधणी ह्या संकल्पनांचे वर्तमान व्यावहारिक संदर्भ तपासून व्यवस्थापन शास्त्राचा उपयोग स्वयंसेवी संस्थांच्या बळकटीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या गुणवत्ताविकासासाठी कसा करून घेता येईल या दृष्टीने प्रबोधिनी कार्यक्रम आखते.

अलिकडे प्रबोधिनीने शैक्षणिक संस्थांमधील घटकांसाठी क्षमता विकास कार्यक्रम, स्वयंसेवी संस्थांमधील कार्यसंस्कृतीबाबत दिशादर्शन, सार्वजनिक कार्यक्रमांची आखणी, वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये शिबीर, प्रकल्प प्रस्ताव लिखाण तंत्र असे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत.
प्रबोधिनी ज्यांच्या नावाने ओळखली जाते त्या रामभाऊ म्हाळगी यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आदर्श विचार करून तो अमलात आणला होता. ते आपण प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामाचा अहवाल दरवर्षी जनतेसमोर ठेवत असत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रबोधिनीनेही आपल्या कामाचे अहवाल १९८९ पासून गेल्या वर्षापर्यंत प्रसिद्ध केले आहेत. प्रबोधिनीच्या यशाचा उंचावत जाणारा आलेख त्यात दृगोचर होतो.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रबोधिनीच्या विविध कक्षांपैकी महत्त्वाचे असे केंद्र म्हणजे ‘संदर्भ, माहिती आणि प्रलेखन केंद्र ’ देश-विदेशातील वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांमधून पस्तीस निवडक विषयांवर, अभ्यसनीय व संदर्भ असलेला मजकूर कात्रण स्वरूपात पाठवणारी पाक्षिक सेवा तेथून पुरवली जाते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा आंतरराष्ट्रीय कक्ष हा सांस्कृतिक स्नेह्बंधातून आंतराष्ट्रीय सामंजस्य हे मुख्य सूत्र धरून काम करणारा मंच आहे. प्रबोधिनी प्रकाशनाच्या क्षेत्रातही उतरली आहे. प्रबोधिनीने ‘संघटनशास्त्र’, ‘प्रमोद महाजन : दूरदर्शी नेतृत्व’, ‘सार्वजनिक कार्यकर्ता : मनोरचना आणि व्यवहार’, ‘निवडक माणूस’ ही विनय यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत

प्रबोधिनीचे संचालकपद सांभाळत विनय ह्यांचा अभ्यास आणि देश-विदेशात दौरे चालू असतात. त्यांनी सर्व पातळ्यांवर अवमूल्यन होऊन र्‍हास पावत असलेली लोकशाही आणि बहुतांश राजकारणी लोकांची वृत्ती व एकंदरीतच राजकीय वातावरणाचा वेध घेणारा अभ्यास करून ‘Political Parties as Victims Of Populism and Electoral Compulsions : A Quest for Systemic Solutions.’ हा प्रबंध लिहून Ph.D. (मुंबई विद्यापीठ) मिळवली आहे. त्यांच्या मते, ‘विद्यमान व्यवस्थेतील first pass the post या न्यायामुळे कितीही कमी मते मिळाली तरी पहिला निवडून येतो. जो विरुद्ध मते फोडण्यात यशस्वी होतो तो जिंकतो आणि संघटित पक्ष पराभूत होतो, हा विरोधाभास आहे. लोकशाहीचा अर्थच असा आहे की 51 is everything and 49 is nothing. ह्यावर उपाय काय? तर निवडणूक प्रक्रिया/पद्धत बदलायची वेळ आलेली आहे. ब्रिटिशकालीन लोकशाहीची पाठ सोडून जर्मनीमध्ये प्रचलित आहे ती proportionate system स्वीकारावी. ह्या पद्धतीत ज्या प्रमाणात पक्षाला मते मिळतील त्या प्रमाणात त्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व अनेक संघराज्यांनी ही पद्धत स्वीकारली आहे. आपल्या राजकीय पक्षांची ह्याला तयारी नसण्याचे कारण आहे populism! हे लोकानुरंजन सोडून सशक्त लोकशाही निर्माण करायची तर लोकशिक्षण, जनजागरण व्हायला हवे, पण ते करण्यात कोणालाच रस नाही, कारण त्यापेक्षा कोणतेही मार्ग अवलंबून निवडून येणे जास्त सोपे आहे. पुढे या देशाचे काय होईल हा विचारच कोणाच्या मनी नाही. आखूड दृष्टी, myopic thinking झाले आहे सगळे.’

विनय सहस्रबुद्धेत्यांच्या पक्षाचे (भाजप) नेते, सदस्यही ह्याला अपवाद कुठे आहेत? ह्या प्रश्नावर त्यांचे उत्तर असे होते की हे राजकीय नेते असे का वागतात, तर “आपल्याकडे चांगल्याचे कौतुक नाही आणि नाकर्त्याला शिक्षा नाही. आमचा असा दावा नाही की प्रशिक्षण ही जादूची कांडी आहे आणि ती सगळ्यांना बदलून टाकेल. प्रत्येक माणसात चांगलेपणाची आस असतेच असते, पण तिला आव्हानच केले जात नाही. प्रशिक्षणाने माणूस अंतर्मुख होतो, आपण कुठे चाललो आहोत हा विचार करायला प्रवृत्त होतो.

त्यांचा अनेक मान्यवर संस्थांशी अध्यक्ष, सभासद, सल्लागार ह्या नात्याने संबध आला आहे. त्यांच्या मते, ह्यांतली बरीच पदे ही शोभेची असतात, आपण फारसे काही करू शकत नसलो तरी ह्या विविध संस्थांचा कारभार कसा चालतो, मोठ्या माणसांना जवळून पाहणे ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवीन आयाम देणार्‍या असतात. ते भाजपच्या कार्यकारी समितीचे सभासद २००८ पासून आहेत आणि पक्षाच्या अध्यक्षांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करतात. ते स्वत:ला राजकीय सल्लागार म्हणू इच्छित नाहीत. भविष्यात, विनय सहस्रबुद्धे लोकसभेत किंवा राज्यसभेत पक्षाचे प्रतिनिधी म्हणून दिसणार का? ‘ही शक्यता मी नाकारत नाही…..’ हे त्यांचे उत्तर होते.

विनय सहस्रबुद्धे, मुख्‍य संचालक, रामभाऊ म्‍हाळगी प्रबोधिनी

पत्‍ता – 17, चंचल स्‍मृती, जी. डी. आंबेकर मार्ग, वडाळा, मुंबई – 400031

भ्रमणध्वनी : 9821066281, इमेल : vinays57@gmail.com

विनय सहस्‍त्रबुद्धे यांचा ब्‍लॉग – http://vinay-views.blogspot.com/

ज्योती शेट्ये – भ्रमणध्वनी :9820737301, इमेल : jyotishalaka@gmail.com 

महाजालावरील इतर दुवे

विनय सहस्‍त्रबुद्धे यांचा लोकसत्‍तेतील लेख

About Post Author