वाचासंजीवनी

पंजाबराव शिरभातेज्यांना श्रवणयंत्र लावूनदेखील ऐकायला येत नाही अशी मुले श्रवणयंत्र न लावता बोलू कशी शकतात? हे कसे शक्य आहे?
होय. ते प्रयास पद्धतीने शक्य आहे!

प्रयास पध्दतीचे कृत्रिम ध्वनिउच्चारणतंत्र आणि ब्रेललिपीचा शास्त्रीय आधार यांत बरेच साम्य आहे. ब्रेललिपीमध्ये सहा उठावदार बिंदूंपासून वर्णमालेतील अक्षरे तयार करण्यात आली आहेत. त्यावर बोटे फिरवल्याने अर्थात हस्तस्पर्शाद्वारे दृष्टिहीन मुलांना वाचता येते. प्रयास पध्दतीमध्ये श्रवणशक्तीला पर्याय म्हणून दृष्टी आणि स्पर्शसंवेदना यांचा वापर केला जातो. कर्णबधिरांना भाषिक ध्वनीचे उच्चार कृत्रिम पद्धतीने शिकवण्यासाठी प्रयत्नावर आधारित वीस बोलक्या खुणा (Speaking signs) निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. मानवी शरीरातील अस्थिप्रणालीमध्ये ध्वनीचे संवहन करण्याचा भौतिक गुणधर्म विद्यमान असतो. त्याला अस्थिसंवहन (Bone conduction) म्हटले जाते. त्या तत्त्वाचा त्यासाठी अवलंब करण्यात आलेला आहे. माणसाने गळ्यावर हात ठेवून ‘अ…’ असा दीर्घ उच्चार केल्यास त्याला हातातून मेंदूकडे जाणाऱ्या ध्वनिकंपनाची प्रचीती येऊ शकते.
प्रत्येक कर्णबधिरामध्ये उर्वरीत श्रवणशक्ती असते यास श्रवणदोष विशेषज्ञांची मान्यता आहे. त्यामुळे वाणीउपचारासाठी श्रवणयंत्राचा वापर अनिवार्य असल्याचे मानले गेले/जात आहे. मात्र पिका मेडिकल्स या कोक्लियार इम्प्लांट उत्पादक कंपनीने अतितीव्र श्रवणदोष असल्यास  श्रवणयंत्राचा उपयोग होत नाही असा खुलासा केला आहे. त्यावरून पालकांची कशी दिशाभूल करण्यात आली हे लक्षात येईल. प्रयास पध्दतीमध्ये ध्वनिरोधक कमरा, स्पीचट्रेनर वा श्रवणयंत्र आणि आरसा अशा कोणत्याही साधनांची गरज नाही. शिवाय, मुलाचा वाणी उपचार सुरू असताना पालकांना त्या जागी मज्जाव न करता त्यांच्या उपस्थितीत बोलायला शिकवले जाऊ शकते.

प्रयास पद्धतीतील स्वररचनाप्रयास पध्दतीमध्ये ऐकू येण्यासाठी कानाच्या उर्वरीत श्रवणशक्तीवर अवलंबून न राहता मुलाला कृत्रिम ध्वनिउच्चारण तंत्राने भाषिक ध्वनीचे उच्चार शिकवले जातात. त्यामुळे श्रवणयंत्राचा वापर करणे बंधनकारक नाही. श्रवणयंत्राचा नियमित वापर करणाऱ्या मुलांचे उच्चार त्या तंत्राने अधिक स्पष्ट होऊ शकतात. मात्र भारतातील सुमारे पंच्याऐंशी टक्के मुले विविध कारणांमुळे श्रवणयंत्रांचा वापर करत नाहीत. श्रवणदोष अतितीव्र असल्यास श्रवणयंत्र लावूनदेखील त्यांना स्पष्ट ऐकायला येत नाही, हे त्यामागील प्रमुख कारण होय. अशा मुलांसाठी प्रयास पद्धत ही वाचासंजीवनी होय! 

प्रयास पध्दत प्राचीन भारतीय भाषाविज्ञान आणि देवनागरी लिपी यांवर आधारित आहे. कारण देवनागरी ही प्रचुर वर्ण आणि शिस्तबध्द उच्चार असणारी तुलनेने सर्वाधिक शास्त्रशुद्ध लिपी आहे. तिच्या वर्णमालेत प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र स्वर आणि व्यंजन असल्यामुळे भाषा जशी बोलली जाते तशीच ती लिहिली जाते, हे तिचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. म्हणूनच तिचा वापर संगणकात युनिकोड फॉण्टसाठी केला जातो. प्रयास ध्वनिउच्चारणतंत्राचा उपयोग संबंधित भाषेतील वर्णांच्या उच्चारण क्रियेनुसार आवश्यक ते बदल करून देश-विदेशातील अनेक भाषांसाठी केला जाऊ शकतो. कर्णबधिरांचे मुकेपण ही प्रगत विज्ञानयुगात न सुटलेली जागतिक समस्या आहे. त्यावर प्रयास पध्दत अनन्यसाधारण महत्त्वाची ठरते.

शिरभाते मूकबधिर मुलास स्वररचनेची माहिती देतानाप्रयास पध्दतीमध्ये तीन टप्प्यांत वाचाशिक्षणाचे नियोजन केले जाते. वाणीविकास ही भाषाविकासाची गुरुकिल्ली होय. त्यामुळे प्रत्येक मुलास भाषिक ध्वनीचे उच्चार सुरुवातीला तीन महिने ‘स्वतंत्रपणे’ शिकवले जातात. शब्दवाचन आणि ओष्ठवाचन यांच्या सरावाने लेखन-वाचन क्षमता विकसित केली जाते. दुसरा टप्पा नऊ महिन्यांचा असून त्या काळात चित्रांच्या पुस्तकातून व्यवहारोपयोगी शब्दांची लिंग, वचन व अर्थबोध यांसह साठवण केली जाते. तिसरा टप्पा एक वर्षाचा असून त्या काळात नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापदे इत्यादी संकल्पना आणि व्याकरणातील नियमांची उदाहरणांसह ओळख करून देत वाक्यरचनेतून भाषाविकासापर्यंत मजल गाठली जाते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आठ मुलांच्या गटाला शिकवायला हरकत नाही. त्याप्रमाणे मूकबधिर शाळांमध्ये अध्यापनाचे सूत्रबध्द नियोजन केल्यास सर्व शिक्षकांच्या सामुहिक प्रयत्नातून दोन वर्षांत प्रत्येक मुलाच्या लेखन, वाचन, श्रवण, आकलन व अभिव्यक्ती या संवादक्षमतांचा विकास होऊ शकतो. या पद्धतीमुळे चार वर्षाच्या निर्धारित कालावधीत दोन वर्षांची बचत होऊ शकते.

प्रयास पद्धतीतील बाराखडी प्रयास पध्दतीमध्ये भाषिक ध्वनीचे उच्चार शिकवण्यासाठी प्रचलित वर्णमालेत काही बदल करण्यात आलेले आहेत. स्वर आणि ओष्ठ्य व दंत्य वर्गातील वर्णांचे उच्चार मुलांच्या दृष्टीस पडत असल्यामुळे ते अनुकरण करायला सोपे असतात. परंतु कंठातून होणाऱ्या क, ख, ग, घ या  वर्णांची उच्चारणक्रिया त्यांना दाखवू शकत नाही. म्हणून स्पर्शव्यंजनांची मांडणी ओठांकडून कंठाकडे अर्थात ओष्ठ्य, दन्त्य, तालव्य, मूर्धन्य आणि कंठ्य या वर्गक्रमाने करण्यात आलेली आहे. आणखी  महत्त्वाची बाब म्हणजे उच्चार शिकवण्यासाठी करण्याच्या प्रयत्नांनुसार वर्णमालेतील मुळाक्षरांची विभागणी अल्पप्रयास, मध्यमप्रयास आणि विशेषप्रयास वर्ण अशी करण्यात आलेली आहे. बारा स्वर आणि ‘प, फ, म, त, थ, व, ल, ळ, य, ह’ या व्यंजनांचे उच्चार शिकवायला सोपे असतात, म्हणून त्यांची गणना अल्पप्रयास; आणि ‘ब, भ, द, ध, न, च, छ, ज, झ, ट, ठ, ड,ढ, ण, स, श, ष’ हे वर्ण शिकवण्यासाठी थोड्या अधिक प्रयत्नांची गरज असते म्हणून त्यांची गणना मध्यमप्रयास; परंतु ‘क, ख, ग, घ, र, क्ष, ज्ञ’ हे वर्ण शिकवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असते. म्हणून त्यांची गणना विशेषप्रयास वर्णात करण्यात आली आहे. या क्रमाचा अवलंब केल्यास मुलाला पहिल्याच बैठकीत किमान वीस वर्णांचे उच्चार शिकवले जाऊ शकतात. 

मूकबधिर मुलांना वर्णमालेतील उच्चार शिकवण्यासाठी केवळ उच्चार करून दाखवणे पुरेसे नसते. प्रत्येक वर्णाची उच्चारणक्रिया कशी होते ते समजावून सांगणे गरजेचे असते. आपण मुलांना ओष्ठ्य व दंत्य व्यंजनांचे उच्चार करताना जिभेची हालचाल व स्पर्शस्थान दाखवू शकतो. मात्र मुखाच्या आतील भागात होणारी स्पर्शव्यंजनांची उच्चारणक्रिया दाखवू शकत नाही. म्हणून मुलास उच्चार शिकवताना आपल्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पहिल्या पेरावर दन्त्य वर्णासाठी ‘त’, दुसऱ्या पेरावर तालव्य वर्णासाठी ‘च’, हाताच्या मध्यभागी मुर्धन्य वर्णासाठी ‘ट, श, ळ’ आणि मागील भागावर कंठ्यवर्गीय वर्णासाठी ‘क’ ही अक्षरे लिहून घ्यावी. मुलास स्पर्शव्यंजनांचे उच्चार शिकवताना डावा तळवा खालच्या दिशेने वळवून त्याला खोलगट आकार द्यावा. हा तोंडातील वरचा जबडा असून उजवा तळवा आपली जीभ होय अशी मुलास कल्पना करायला सांगावी. उजव्या तळहाताचा उपयोग जीभ वरच्या जबड्याला कशी आणि कुठे स्पर्श करते ते समजावून सांगण्यासाठी केला जातो.

याप्रमाणे दोन हात आणि बोलक्या खुणा यांच्या साहाय्याने मुलांकडून वर्णमालेतील मुळाक्षरे, त्यांची बाराखडी व जोडाक्षरे यांचे स्पष्ट उच्चार करवून घेऊ शकतो. उच्चार स्पष्ट झाल्यानंतर बोलक्या खुणांचा वापर बंद केला जातो. अर्थात, त्यासाठी वाचाशिक्षकाचे उच्चारण प्रक्रियेवर प्रभुत्व असायला हवे. विशिष्ट वर्णाचा उच्चार करताना जिभेची हालचाल कशी होते? ती कुठे व कशी स्पर्श करते? ओठांचा आकार कसा होतो? हवा कुठे व कशी अडवली जाते? पूर्णतः की अंशतः? हवा मुखातून बाहेर पडते की नाकावाटे? मुखातून बाहेर पडत असल्यास ती मंदगतीने की तीव्रगतीने? उच्चाराच्या वेळी पूर्वकंपन उत्पन्न होते की नाही? त्याचबरोबर विविध युक्त्यादेखील आत्मसात करायला हव्यात. घरच्या आरशात प्रत्येक अक्षराच्या उच्चारण क्रियेचे निरीक्षण केल्यास हे बारकावे लक्षात येऊ शकतात.

हस्‍तमुद्रामी या अनोळखी विषयाकडे वळण्याचे कारण पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या मुलास बोलायला शिकवण्यासाठी वाणीउपचार या विषयावरील पुस्तकांचा स्थानिक शाळेपासून देशातील राष्ट्रीय संस्थांपर्यंत शोध घेतला. परंतु सर्वत्र नकारघंटा ऐकायला मिळाली. राष्ट्रीय संस्थेतील प्रकाशित पुस्तिका; तसेच, काही अनुभवी शिक्षकांनी तयार केलेली  पुस्तके यांचे स्वरूप वरवरच्या मलमपट्टीसारखे होते. म्हणून समस्येच्या मुळाशी जाऊन, प्रथम संबंधित विषयाचे सखोल अध्ययन करून माझ्या मुलास अडीच वर्षांत शब्दांचे उच्चार शिकवले. परंतु माध्यमिक शिक्षणासाठी चार वर्षे वसतिगृहात ठेवावे लागल्यामुळे त्याचा भाषाविकास करू शकलो नाही. आणखी दोन मुलांना असेच शिकवून पडताळा घेतला. त्या अनुभवावर आधारित १९९३ मध्ये ‘आणि वैभव बोलू लागला’ हे पुस्तक लिहून प्रकाशित केले आणि महाराष्ट्रातील मूकबधिर शाळांमध्ये विनामूल्य वितरीत केले.

शिरभाते यांनी लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तकपुस्‍तकाचा मराठी अनुवाद कापूस एकाधिकार खरेदी योजनेतील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर २००५ पासून चार वर्षे वीस मुलांना बोलके करून भाषाविकास अध्यापनतंत्रासाठी पूर्णवेळ संशोधन केले. त्या संशोधनाचा लाभ देशभरातील मुलांना व्हावा या उद्देशाने ‘मूकबधिर वाणीउपचार : प्रयास पद्धती’ हे पुस्तक राष्ट्रभाषेत लिहून स्वतः प्रकाशित केले. वाणीउपचार या विषयावर हिंदी भाषेतील  भारतीय लेखकाचे ते पहिले पुस्तक असावे. कर्णबधिरांचे मुकेपण दूर व्हावे या उद्देशाने मूकबधिर वाणीविकास अभियानाचे साधन म्हणून त्या पुस्तकाची निर्मिती केली. त्याला राष्ट्रीय संस्थेतील विशेषज्ञांकडून उत्तम अभिप्राय मिळाले. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने माझ्या स्वप्नाला पंख देऊन ते नऊ भाषेत प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेतील मीच केलेला अनुवाद गतवर्षी प्रकाशित झाला. ते इतर भाषांमध्येसुद्धा उपलब्ध होईल. प्रयास पद्धत देशातील सर्व मूकबधिर शाळांमध्ये लागू करून राष्ट्रीय वाणीविकास अभियान राबवण्यात यावे. केंद्र व राज्य शासनातील बहुविकलांग यंत्रणेच्या घोर उदासीनतेमुळे मला या तंत्राचा प्रचार व प्रसार करण्यात फार अडचणी येत आहेत.

अॅड.  पंजाबराव शिरभाते
स्वप्नशिल्प, नागरी बँक कॉलनी,
हिंदनगर, वर्धा ४४२००१
मोबाइल ९४२१७८३७६१
इमेल – Mukbadhirprayasshirbhate@gmail.com

पंजाबराव शिरभातेपंजाब तुळशिरामजी शिरभाते महाराष्‍ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघात पंचवीस वर्षे ग्रेडर आणि पाच वर्षे व्य्वस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी नोकरी करत असताना १९८३ साली कापूस एकाधिकार खरेदी योजनेच्या पार्श्वभूमीवर ‘योजना’ हा कथासंग्रह लिहून तो ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर प्रकाशित केला. त्यांनी कापूस एकाधिकार खरेदी योजनेत सुधारणा घडवून आणण्यासाठी विविध वृत्तपत्रांतून टोपणनावाने वेळोवेळी टीकात्मक लेखन केले. त्‍यांनी मूकबधिर मुलांच्या वाणीविकासासाठी स्वतःच्या अनुभवावर आधारित ‘आणि वैभव बोलू लागला’ हे पुस्तक १९९९ मध्ये लोकसहभागातून प्रकाशित केले. त्या पुस्तकाचे महाराष्ट्रातील मूकबधिर शाळांमध्ये विनाशुल्क वितरण करण्यात आले. शिरभाते यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर वाणीउपचार या विषयावर शास्त्रीय संशोधन करून नवी पद्धती विकसित केली. देशातील काही मूकबधिर शाळांमध्ये वाचाशिक्षणाच्या नावाखाली गोंधळ सुरु आहे. त्या शाळांमधील मुले जेमतेम दहावीपर्यंतचे अर्धवट शिक्षण घेऊनसुद्धा बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण असूनही नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जाते. पंजाब शिरभाते यांनी त्या सदोष शिक्षणप्रणालीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी वृत्तपत्रातून लेख लिहिले. त्यांनी ‘प्रयास’ पद्धतीच्या कृत्रिम ध्वनीउच्चारण तंत्रातील बारकावे स्पष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक स्वरुपाची सी.डी. तयार करण्याचे प्रयत्‍न केले. त्यांचा ‘प्रयास वाणीविकास व भाषाविकास पथदर्शिका’ तयार करण्याचा मानस होता. पंजाब शिरभाते यांचे २२ डिसेंबर २०१३ रोजी कर्करोगाच्‍या आजाराने निधन झाले.

About Post Author

1 COMMENT

  1. आ.सर

    आ.सर
    आपण प्रयास पध्दतीच्या माध्यमातून कर्णबधिर मुलांच्या जीवनात वटवृक्ष उभा केलात त्याबद्दल आपले विशेष आभार.

Comments are closed.