रापण : किनारपट्टीवरील नयनरम्य देखावा (Rapan – Old Fishing Technique Disappears From the Sea Coast)

रापण’ हे कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारीचे मुख्य साधन होतेत्याच बरोबर ती गावची घटना होऊन गेली होती. आमच्या तांबळडेग गावाला पहाटे कोंबडा आरवला की जाग येत असे. प्रत्येक घरचा कर्ता पुरुष तोंड धुऊन इतरांना जागवत समुद्रकिनारी पोचत असे. हळुहळूलोकांचे थवे चहुबाजूंनी संपूर्ण किनारपट्टीवर गोळा होत. तोपर्यंत चिलीमभुरगडी किंवा विडी… कशाचा तरी झुरका मारूनशारीरिक थकवा दूर करून ऊर्जानिर्मितीचे पुरुष लोकांचे काही काम चालायचे. मच्छिमारी धंद्याची प्रमुख केंद्रे मालवणआचरा मुंबरीकुणकेश्वर ही होती. तांबळडेगच्या किनाऱ्यावर दहा रापणी कार्यरत असल्यामुळे परिसर सकाळी गजबजून जात असे. रापणीमध्ये ज्यांचा हिस्सा नव्हता अशी माणसे व होतकरू विद्यार्थी यांना रापणीमुळे आर्थिक मदत होत असे. त्या परिश्रमातून मिळत काय असे तर आठ आणे किंवा अर्धी टोपली मासे! तेसुद्धा संसाराचे रहाटगाडगे चालवण्यास पुरेसे होते. रापणीला जातपात नव्हती. सर्वांचे पोटापाण्याचे साधन म्हणून त्यांचा उपभोग होत असे.

 

रापण म्हणजे सरकारमान्य नोंदणीकृत मच्छिमारी संस्था. होड्यांवर एम.एल.व्ही. व नंबर इंग्रजीत कोरून रंगवलेला असायचा. शासनाकडून आर्थिक मदत कधी मिळत नव्हतीपरंतु चुकून मिळालीच तर ती पुढाऱ्याच्या किंवा त्यातल्या त्यात शिकलेल्या माणसाच्या खिशात जात असे. सोसायटीमध्ये कमीत कमी वीस सदस्य कायम स्वरूपी असत. एक किंमतीवान होडीतांब्याचे मडकेएक छोटी होडी व रापणीची मोठी जाळी हीच काय ती त्यांची मालमत्ता. वर्षभरात मासे विकूनकुटा विकून किंवा आवारात मीठ आणल्याचे जे पैसे गोळा होत असतत्यामधून वर्षाचा खर्च वजा जाता शिल्लक समप्रमाणात सर्वांना मे महिन्यात वाटली जाई. वर्षभराच्या मेहनतीचे फळ साधारण शंभर रुपये होत असे. मिळालेल्या धनातून कर्जतसेचपावसाळी बेगमीच्या वस्तू घरात आणल्या जाततर काही वेळालग्नकार्याला मदत होत असे.

 

रापणीचे जाळे फारच मोठे असते. ते पाण्याचा कित्येक नॉटिकल मैल भाग व्यापते. त्यामध्ये अडकलेलेच मासे मिळतात. त्या जाळ्याला दोन्ही बाजूंना पन्नास ते साठ वाव जाड काथ्याचा दोरखंड (टाकणी)पन्नास ते साठ पाटे (जाळ्यांचे तुकडे) जोडूनपंधरा फूट उंची राखली जाते. मधील घोळाच्या भागाला पाटे मजबूत लावले जातात. जाळ्याच्या सुरुवातीला व दोरखंडाच्या शेवटी पंधरा फूट उंचीचा मजबूत उंडलीचा (बांबू) दांडका लावलेला असतो. त्यामुळे जाळे पाण्यात उभे सरळ राहण्यास मदत होई. जाळ्याच्या वरील भागात तरंग व खाली जडत्व लावलेले असत. जाळे जड शिशामुळे तळाला जाऊन उभे राही. मासे जाळ्याच्या बाहेर जाऊ शकत नसत. जाळ्याच्या तरंगाची पूर्ण माळ कमी पाण्यात दिसत असे.

 

 

होडी जाळ्यासह सकाळी पाचच्या सुमाराला पाण्यात ढकलली जाई. एका दोरखंडाचे टोक किनाऱ्यावर देऊन होडी सरळ खोल पाण्यात मार्गक्रमण करत असताना दोरखंड सोडला जाई व नंतर दांडका सोडून जाळे टाकण्यास सुरुवात होई. होडी काही अंतर गेल्यानंतर दक्षिणेकडे वक्राकृती फिरे आणि पुढे पुढे मार्ग काढत जाळे टाकले जाई. जाळे अर्धवर्तुळाकार पसरल्यानंतर होडी सरळ किनाऱ्याकडे वळे. त्यावेळी उरलेले जाळे व शेवटीदोरखंड टाकला जाई. एक माणूस दुसऱ्या दोरखंडाचे टोक घेऊनपाण्यात उडी घेऊन किनाऱ्यावर येई. होडी नांगरून उरलेले खलाशीही पाण्यात उडी मारून पोहत किनाऱ्यावर रापण ओढण्यासाठी येत. शेवटीदोन्ही बाजूंनी आठ-आठ जोड्या-होड्या दोरखंडाला दोरी बांधूनत्यात पाच फूट लांबीचे टांगूल (बांबू) टाकूनते कंबरेच्या खाली धरून रापण वरवर ओढली जाई. दोरखंड पूर्णत: संपण्यास कमीत कमी एक तास लागे. रापण ओढणे हे येरागबाळ्यांचे काम नव्हे. त्याला कंबर मजबूत व ताकद भक्कम लागते. दोरखंड माणसांकडून त्यांचे पाय मातीत/वाळूत खोलवर रोवून ओढला जाई. ती माणसे फार श्रमाचे काम उपाशी पोटी करत असत. दोरखंडानंतर टांगूल येत असल्यानेत्या पाठोपाठ जाळे येण्यास सुरुवात होई. जाळे दुडून मगच ते वर खेचले जाई. त्या प्रक्रियेत पुन्हा एक तास जात असे. जाळे जेव्हा कमी पाण्यात येई तेव्हा त्याचे वक्रकृती तरंग डोळ्यांना दिसत. किर (गल) पक्षी गोळा होत व पाण्यात मनसोक्त तरंगून पटापट मासे फस्त करत. ते दृश्य अविस्मरणीय असेच असे. जाळे पाच फूट खोल पाण्यात आल्यानंतरत्यात मासे किती आहेत याचा अंदाज घेऊन नंतर जाळे वर कसे घ्यायचे ते ठरवले जाई. मासे भरपूर असतील तर जाळे तसेच पाण्यात ठेवून येंडीच्या (मासे पकडण्याचे साधन) सहाय्याने मासे कमी करत व शेवटीपूर्ण जाळे माशांसह किनाऱ्यावर घेत. कधी कधीजाळे कमकुवत असल्यास ते वर ओढताना रापण फुटे व मासे पाण्यात जात. त्यामुळे केलेले श्रम फुकट जात.

 

 

मासे पूर्णत: किनाऱ्यावर घेतल्यानंतर ज्यांना मासे विकत घ्यायचे असतात ती मंडळी पुढे सरसावत; पैसे देऊन मासे खरेदी करत. शिल्लक राहिलेले मासे सर्वांमध्ये वाटले जात. अशा प्रकारे ते काम सप्टेंबर ते मेपर्यंत पहाटे चारपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत चालत असे. पण ते सर्व काही काळाच्या पडद्याआड झाले आहे. किनारपट्टी शांत आहे. त्य़ाला कारणे अनेक आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे शैक्षणिक प्रगती व दुसरे म्हणजे यांत्रिक मच्छिमारीतिची सुरुवात 1960 च्या सुमाराला झाली. पुढे ती गुणोत्तराने वाढतच गेली. समुद्र त्या रीतीने दिवस-रात्र पूर्णत: गाळला जाऊ लागल्यामुळे किनारपट्टीकडे मासे येण्याचे बंद झाले. रापण हळुहळू एकामागून एक बंद झाल्या आणि माणसे शहराची वाट धरू लागली.

 

 

शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी रापणी सुटल्यानंतर घरी येऊनअंघोळ करूनपेज पिऊन दहा वाजता शाळेची वाट धरत असत. ती संध्याकाळी सहा वाजता पुन्हा घरी येत. रात्रभर अभ्यास करून सकाळी पाच वाजता पुन्हा पोटापाण्यासाठी रापणीला जाण्यास हजर होत. त्यांची दिनचर्या तशी असे. तीच पिढी पुढे मुंबईला येऊनस्वत:च्या हिंमतीवर संसार उभा करून पुढची पिढी सुदृढ बनवू शकली!

 

माता-भगिनी संसाराचे रहाटगाडगे चालवण्यासाठी सकाळी आठ वाजता रापणीचे मासे विकत घेऊनजड ओझे डोक्यावर घेऊनतापलेली वाळू अनवाणी पायाने तुडवतपाण्यातून मार्ग काढत तीन मैलांचे अंतर पार करून एस.टी. पकडण्यासाठी स्टँडवर पोचत असत. पंधरा मिनिटांच्या अवधीत ट्रंकांमध्ये मासे भरूनकसेबसे टपावर चढवून उभ्याने लिंगडाळचा तिठा गाठत असत. पुढेदुसरी गाडी पकडून शिरगावकोळोशीनांदगावफोंडा येथे जाऊन – मासे विकून संध्याकाळी सात वाजता परत येत. त्या सर्व श्रमातून फक्त दहा रुपये त्यांना प्रत्येकी सुटत असत. तरीही त्या चांगल्या प्रकारे संसार चालवून मुलांना एस एस सी किंवा डी एड करू शकल्या. त्याच त्यांच्या श्रमातून पुढील पिढी कर्तव्यदक्ष डॉक्टरइंजीनियरतसेचचांगले शिक्षक बनू शकली आहे.

तांबळडेग सुजलाम् सुफलाम्’; तसेच, सर्व क्षेत्रांत पुढे आहेआज सर्व काही बदलून गेले आहे. किनाऱ्यावर गाडी येतेपरंतु नयनरम्य किनारपट्टीवरील देखावा लुप्त झाला आहे. नवीन पिढीने माता-भगिनींचे पांग फेडून स्वबळावर रस्तापाणीवीज आणून तांबळडेगचे नंदनवन केले आहे. तांबळडेगची वाळू जशी शुभ्रतशीच तेथील माणसे पूर्वीपासून पारदर्शक व कष्टाळू आहेत. पायाखालच्या वाळूनेच त्या सर्वांना जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवले.

 

रापणीला पूर्वी ऑक्टोबर-जानेवारीत प्रचंड प्रमाणात मासे मिळत. कोळंबी दसऱ्याच्या दिवसांत तर खंडीने मिळे. परंतु त्यांना त्यावेळी ना बाजारभाव ना त्यांचा खाण्यासाठी वापर होत असे. अतिपरिश्रमाने कोळंबी सोलून सोडे बनवले तरी मेहनतीच्या मानाने किंमत तुटपुंजीच असे. कोळंबी सोलून हाताच्या चिंधड्या होत असत. त्याच कोळंबीची किंमत कोटीच्या घरात पोचली आहे. शीतगृह; तसेचवाहतुकीची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोळंबी पाण्यात सोडली जाईनाही तरकिनाऱ्यावर जागा उपलब्ध असल्यास कुट्यासाठी वाळूत पसरवली जाई. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत जायबांगडेतारलीबंगीपेडवे रापणीत खंडीने मिळत असत. परंतु त्यांनाही बाजारभाव नसे. लोक खाण्यासाठी नेत व उरलेल्यांचा कुटा होत असे.

 

– सूर्यकांत येरागी 9870381020

dryeragi@gmail.com

(दर्याचा राजा दिवाळी अंक – 2019 वरून उद्धृत, संपादित)

सूर्यकांत येरागी हे सोमैया कॉलेजमध्ये झूओलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांनी पी.एचडीचे चे प्रबंध पूर्ण केले आहेत. त्यांचे तीनशेहून अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी एक महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार त्यांना विशेष गौरवास्पद वाटतो.

——————————————————————————————————————-

 

 

 

 

                             

 

 

———————————————————————————————-

 

About Post Author

3 COMMENTS

  1. Rapan , Golden culture and tradition very effectively narrated by my Guru Dr Yeragi Sir is spreading knowledge about this wonderful culture traditional fishing methods and life of fishermen very successfully. Salute to your dedication Sir. Dr. Kakavipure.

  2. सर,खुपचं माहितीपूर्ण लेख आहे.लेखात मासे पकडणे,त्यासाठीची साधने यांची माहिती लेखातून कळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here