राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर दूर… सोलापुरात काही घडले आहे!

0
26
safalya

राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा… तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. वेगवेगळ्या क्षेत्रांत असाधारण काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तालुक्या तालुक्याच्या आणि त्याहूनही छोट्या गावी कार्यरत आहेत. त्यांची पोच सरकारदरबारी तर वगळाच पण मान्यताप्राप्त सामाजिक-सांस्कृतिक शहरी संस्थांकडे, एवढेच काय अनिल अवचटांसारख्या लेखकांपर्यंतदेखील नाही! ती माणसे तुळशीदास गव्हाणे यांच्याप्रमाणे सेंद्रिय शेतीत अभिनव प्रयोग करतात, रिधोरे गावच्या सयाजीराव गायकवाडांप्रमाणे शेतकऱ्यांची प्रयोगशाळा चालवतात, नाशिकच्या चिवड्याला थप्पड मारील असा लांबोटी चिवड्याचा ब्रँड मोहोळमध्ये तयार करतात, प्राध्यापकी ऐट न मिरवता अथवा समीक्षकी भाषेचा आग्रह न धरता करमाळ्याच्या प्रदीप मोहिते यांच्याप्रमाणे समाजजागराची पथनाट्ये सादर करत दिवाळीच्या सुट्टीत गावोगाव फिरतात… अशी कित्येक नावे! प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आणि त्याचा ध्यासही आगळा!

केवळ अर्थमंत्र्यांच्या बजेटमध्ये अथवा थ्रीजीसारख्या घोटाळ्यात ऐकलेले प्रचंड आकडे मी मंगळवेढ्याच्या वैभव मोडकच्या तोंडी एक लक्ष सव्वीस हजार कोटी रुपयांच्या रूपाने ऐकले तेव्हा दामाजीपंतांचे कोठारच खुले होत असल्याचा भास मला झाला. वैभव मोडक यांची शेती आहे, ते बारावी शिकलेले आहेत. त्यांनी कृषी-उपयोगी यंत्रे बनवली आहेत. त्यांना त्या ‘इनोव्हेशन’बद्दल सरकारचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या यंत्रांचा उपयोग झाला तर सरकारी खर्चातील बचत अशा कोटीच्या कोटी आकड्यांत होईल अशी मोडक यांची मांडणी आहे. अमेरिकेमधूनही त्याबद्दल विचारणा झाल्या आहेत. त्यांचे कोरडवाहू शेतीतील प्रयोग अनुकरणीय आहेत.

मोहोळमधील अरुण देशपांडे हे त्यांच्या विविध प्रयोगांनी व सोलारशाळेमुळे ‘इन्स्टिट्यूशन’ बनून गेले व सर्वप्रसिद्धही आहेत. त्यांना जरी अभय बंग, प्रकाश आमटे, सिंधुताई सपकाळ व डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारखे ‘सेलिब्रिटी स्टेटस’ लाभले नसले तरी  बऱ्यापैकी मान्यता मिळालेली आहे. त्यांची ‘ग्रीन व्हिलेज’ची संकल्पना आता विद्यापीठ अभ्यासक्रमात शिरली असून त्यासाठी पाठ बनवण्याची जबाबदारी देशपांडे यांच्यावर आली आहे.

‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेला तीन पदर होते – ‘थिंक महाराष्ट्र’च्या भाषेत तीन पेड – तिपेडी! – माहिती संकलन, जनजागरण व सांस्कृतिक विचारचर्चा. माहिती संकलन कर्तबगार व्यक्ती, सेवाभावी संस्था आणि संस्कृतिसंचित अशा तीन अंगांनी झाले.

व्यक्तीचे कर्तृत्व वा तिचा संस्थेतील सेवाभाव तुलनेने सहज नोंदण्यासारखा पण तिसऱ्या पदराची माहिती मिळवत असताना संस्कृतिसंचित म्हणजे काय येथपासूनच सुरुवात होते. ‘थिंक महाराष्ट्र’ असे मांडू इच्छिते, की वर्तमान व्यवहारातून उद्याची संस्कृती घडत असते आणि वर्तमान घडामोडी व व्यवहार यांची मुळे कालच्या संस्कृतीत वा परंपरेत मुरलेली असतात. त्या विचाराने माहिती संकलनाचे तिन्ही पदर एकात्म होऊन जातात. संस्कृतीमध्ये पंढरपूरचा ‘नवरंगे बालकाश्रम’ जसा येतो तशी वर्तमानात पंढरपूरातच एड्सग्रस्त मुलांसाठी सुरू झालेली ‘पालवी’ संस्थाही येते. संस्कृतीच्या विखुरल्या खुणा वाचण्या-ऐकण्यात तशाच विखुरल्या व विस्कळीत स्वरूपात येत असतात, पण त्या जर अशा मोहिमा वेगवेगळ्या जिल्ह्यांत यशस्वी झाल्या तर, त्यातून गोळा होणारी सर्व माहिती म्युझियममध्ये असल्याप्रमाणे एका क्लिकसरशी ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’वर पाहण्या-वाचण्यास मिळू शकेल.

सोलापूर शहर किती जुने? तर ते एक हजार वर्षांच्या मागे ऐतिहासिक दाखल्यांनी जात नाही असे आनंद कुंभार म्हणतात. पण मंगळवेढ्याचा जुनेपणाचा दावा खूप सच्चा ठरतो. त्या परिसरात औरंगजेबाची छावणी कित्येक वर्षे पडलेली असल्याने आणि त्याचे व संभाजीचे समर प्रसंग तेथेच घडल्याने त्या परिसराला आधुनिक इतिहासात देखील वेगळेच महत्त्व प्राप्त होते, पण ते दुर्लक्षित आहे. बाजूच्या सांगोल्याची व करमाळ्याची ऐतिहासिक कहाणी तशीच आहे. आणि विम्याचा व्यवसाय असलेले करमाळ्याचेच अनिरुद्ध बिडवे विलक्षण निष्ठेने त्या इतिहासाचा अभ्यास करत आहेत व लिहित आहेत.

महाराष्ट्राच्या जवळ जवळ पावणेचारशे तालुक्यांमध्ये मोठा इतिहास व संस्कृती दडलेली आहे आणि त्याची नोंद व मांडणी होणे आताच शक्‍य आहे, झाली तर आताच, अन्यथा ती पुढे कदाचित  विद्यापीठीय अभ्यासात विखुरल्या स्वरूपात होत राहील व महाराष्ट्राचे ते समग्र चित्र कधीच उपलब्ध होणार नाही. ते चित्र साकारण्याचे व्रत मनात घेऊन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलची 2010 साली निर्मिती केली गेली. त्यासाठी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ नावाची ‘ना नफा तत्त्वावर’ काम करणारी संस्था स्थापन झाली. पोर्टलवर दीड-दोन हजारापर्यंत लेख प्रसिद्ध झाले आहेत, परंतु विखुरल्या प्रयत्नांचा शाप तेथेही त्रास देत राहिला. म्हणून तालुक्या तालुक्यात जाऊन माहिती संकलन करण्याचा फंडा निघाला. तो व्याप मोठा – खर्च मोठा – इंटरनेट हे अजून ग्लॅमरप्राप्त माध्यम झाले नसल्याने प्रसिद्धी कमी व श्रेयही दुर्मीळ… तरी वेगवेगळ्या व्यवसायांतील विद्याविभूषित पन्नास मंडळी स्वेच्छेने तेरा दिवसांच्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेत सामील झाली. त्यांच्या तीन टीम तयार करून एकेका टीमने प्रत्येक तालुक्यात तीन-तीन दिवस मुक्काम टाकला. अशा तऱ्हेने सोलापूर जिल्ह्याचे अकरा तालुके वेगवेगळ्या कार्यक्रमांनी पिंजून काढले.

एवढी मातब्बर माणसे ठिकठिकाणी जाणार व व्यक्ती-संस्था- स्थळे यांना भेटी देणार, तर त्यांच्या प्रतिभेचा, ज्ञानाचा लाभ स्थानिकांना मिळावा यासाठी जनजागरण स्वरूपाची व्याख्याने व सादरीकरणे ठिकठिकाणी योजली. दोनच उदाहरणे देतो. सुलक्षणा महाजन या नगरनियोजनतज्ज्ञ स्थानिकांसमोर शहर कसे घडते याबाबतचे सादरीकरण स्थानिक संदर्भ घेऊन करत तेव्हा श्रोते चक्रावून जात. त्यांनी माढ्याला ठणकावून सांगितले, की यापुढे खेडी राहणार नाहीत, सारी शहरे बनणार आहेत व शहरात शेती होणार आहे! उगाच भलत्या भ्रमात राहू नका. तेव्हा श्रोते अवाक् झाले आणि सभेतील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या ऐंशी टक्कयांहून अधिक विद्यार्थ्यांनी आम्हांला शहरांतच राहायचे आहे अशी पसंती दर्शवली. तळेगावचे प्रसिद्ध सतारवादक विदुर महाजन व त्यांची अभिनेत्री कन्या नेहा खेड्या खेड्यांत वा शाळा-कॉलेजांत सतार या वाद्याचा परिचय करून देत, मुलांना तारांचे झंकार काढण्यास सुचवत व स्वत: वाजवून दाखवत, तो खेडुतांना अपूर्व अनुभव असे. मुले व प्रौढ महाजनांभोवती गराडा घालत. महाजन बापलेकही त्यांना सतारीभोवती मुक्तपणे बागडू देत.

चंद्रसेन टिळेकर यांची अंधश्रद्धाविरोधी भाषणे हे तर मोहिमेत मोठेच आकर्षण ठरले. त्यांना पुढील व्याख्यानांची निमंत्रणेही आली. राजा पटवर्धन यांची अणुऊर्जा तर पुरुषोत्तम कऱ्हाडे यांची सौर ऊर्जा, दोन्ही मुद्यांवर वाद झडत. पटवर्धनांना त्याच विषयावरील पुस्तकासाठी राज्य सरकारचा वाङ्मय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे हे श्रोत्यांना कळले, की ते चकित होत. अशी माणसे सहजपणे आपल्यात येऊन मिसळतात याचा त्यांना अचंबा वाटे. अरुण म्हात्रे हा कविराज मोहिमेत पाचच दिवस सामील झाला, पण विरघळून गेला. त्याला जुन्या विज्ञानयात्रेचे, ग्रंथयात्रांचे दिवस आठवले. त्याने सर्व वयांच्या श्रोत्यांना काव्यानंदात बुडवून टाकले.

मोहिमेत माझ्यावर जबाबदारी संस्कृती संकल्पनेबाबत तालुक्या तालुक्यातील विचारी व संवेदनशील व्यक्तींच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्या छोट्या बैठका योजणे व त्यांचे विचार जाणून घेणे ही होती. त्यासाठी आम्ही यश वेलणकर, दिलीप करंबेळकर व अतुल तुळशीबागवाले यांचे विचारप्रवृत्त करणारे व दिशा सुचवणारे तीन लेख असलेली वीस पानी पुस्तिका छापली होती व गावोगावी प्रसृत केली होती, काही लोकांनी ती गांभीर्याने वाचलीही होती. भारताची दीर्घ परंपरा, पाश्चात्य स्वागतार्ह प्रभाव, तंत्रविज्ञानाची घोडदौड या परिस्थितीत भारतीय मनाची जी कुतरओढ होत आहे, तिचे वेगवेगळ्या तऱ्हेचे विश्लेषण ऐकण्यास मिळाले. विशेषत: मुलांवरील संस्कार हा मुद्दा सर्व वयोगटांना फारच भेडसावत आहे, परंतु त्यासाठी मूळ संस्कृतिसंकर व विवेकी दृष्टीतून केलेले निर्णय ही महत्त्वाची गरज आहे हे करंबेळकर व तुळशीबागवाले यांच्या लेखांतून सैद्धांतिकदृष्ट्या अचूक व्यक्त होते असे त्यांचे मत दिसे. मात्र आचारधर्मावर गाडी अडते असेही आढळून आले.

वर्तमानकालीन प्रश्नांमध्ये जलनिर्मितीसाठी चाललेले उपक्रम आणि शिक्षणसुविधा व शैक्षणिक गुणवत्ता याबाबत विशेष आस्थेने विचारणा करावी असे माहिती संकलकांना सुचवले होते, परंतु तत्संबंधात सर्वत्र औदासीन्य दिसून आले. शेजारच्या मराठवाड्यातील दुष्काळाबाबत जाहीर बोलले जात असताना व सोलापूरचा बहुसंख्य भाग शतकानुशतके तेच भोग भोगत असताना, या दौऱ्यात स्थानिकांकडून पाणी हा प्रश्न असल्याचे ऐकण्यासच मिळाले नाही! लोकांनी पिण्याचे पाणी दोन-चार दिवसांनी मिळणार हे गृहित धरले आहे. शेततळी वगैरेंमुळे छोट्या शेतीचा प्रश्न काही प्रमाणात निभावतो आणि उजनी धरणाच्या पाण्याने सोलापूरचे सोने केले आहे. जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत!

शेतकऱ्यांनी जलसंवर्धनापेक्षा कोरडवाहू शेतीत कमी पाण्याची पिके – डाळिंबे, रामफळ – घेऊन संपन्नता प्राप्त करण्याची किमया साधली आहे. बार्शीचे सराफ शंतनू जोशी यांची चाळीस एकरावरील रामफळाची बाग आणि अजनाळे (सांगोला) गावची डाळिंब शेती या फार मोठ्या यशोगाथा आहेत.

लांबोटी चिवड्याच्‍या निर्मात्‍या रुक्‍मीणी खताळशाळेत दिले जाणारे शिक्षण पूर्णत: निरुपयोगी आहे याबद्दल एकमत आहे – त्यामुळे ना धड अभ्यासू, विद्वान मुले होण्याची शक्यता आहे, ना त्यामधून मुलांना व्यवहारज्ञान मिळते व ती मार्गाला लागतात. तथापी शाळांमधून उपक्रमशील शिक्षकवर्ग आहे, त्यांच्यापैकी काही शिक्षक-शिक्षिकांनी तनमनधनाने शिक्षणाला वाहून घेतले आहे असे दिसून आले. त्या शाळा खाजगी असल्या तरी त्या पैशांमागे लागलेल्या नाहीत असे दिसून आले. या दृष्टीने सांगोल्याची खेड्यांतील मुलांसाठी चालवली जाणारी ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठन’ची शाळा व सोलापूरची शिंदे पतीपत्नींची ‘सुयश’ शाळा यांचा उल्लेख करायला हवा. उपक्रमशील शिक्षकांचे, किंबहुना वेगवेगळ्या व्यावसायिकांचे ‘नेटवर्क’ हे ‘थिंक महाराष्ट्र’च्या कार्यक्रमपत्रिकेत आहे. त्यामुळे तशी संधी दिसली की जीव हुरळून जातो.

चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वी जिल्हा परिषदा निर्माण झाल्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने जिल्हया जिल्हयात नेतृत्व तयार झाले. तो प्रवाह ‘महाराष्ट्र टाइम्स’ने अचूक टिपला होता. ते या वृत्तपत्राच्या मतपत्र म्हणून तत्कालीन यशाचे प्रमुख कारण ठरले होते. माधव गडकरी यांचे लेख व नंतर त्यांची झालेली पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते लोण आता तालुक्यात पोचले आहे असे जाणवले. राजकीय टगेगिरीला बाजूला ठेवून किंवा तिला सांभाळून घेत, मुख्यत: शिक्षण, कृषी व उद्योग या तीन क्षेत्रांत तालुका स्तरावर मोठी उपक्रमशीलता दिसून येते. मात्र राजकारण व माध्यमप्रभाव यांच्या गदारोळात निर्माण झालेल्या बकालपणामुळे ती उपक्रमशीलता जाणवत नाही. ‘थिंक महाराष्ट्र’प्रमाणे त्या दोन्ही प्रभावांपासून दूर राहिले तर समाजातील ती संवेदना कळून येईल जरूर!

खरे तर, ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ ही मोहीम स्फुरली ती माहिती संकलनाच्या आणि पाणी व शिक्षण या क्षेत्रांतील प्रयोग जाणून घेण्याच्या हेतूने. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रा. रवींद्र कुळकर्णी यांचा लाभला. ते व अकोल्याच्या आयुर्वेद कॉलेजमधील त्यांचे प्राध्यापक बंधू सुनील यांनी त्यांच्या ट्रस्टमधून प्रारंभिक निधी उपल्ब्ध करून दिला व गेली दोन-तीन वर्षे शीतपेटीत असलेली आमची उर्मी जागी झाली. रवींद्र कुळकर्णी बंधू मूळ मोहोळचे. रवींद्र कुळकर्णी न्यू यॉर्कला प्राध्यापक होते व आता इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे व पुण्याच्या भास्कराचार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर कमी पडणारा पाच लाख रुपयांचा निधी ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स प्रा. लि.’ने उपलब्ध करून दिला. जैनांची नवी पिढी – अशोक व अजित, त्यांचे पिताजी भवरलाल यांच्याइतकेच सामाजिक भावनेने भारलेले असतात याचा प्रत्यय आला. येथे ‘थिंक महाराष्ट्र’चे उद्दिष्ट भवरलाल जैन यांच्या सज्जनशक्ती एकवटण्याच्या प्रस्तावाशी मिळतेजुळते आहे हेही येथे नमूद केले पाहिजे. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एन. एन. मालदार व विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख प्रा. रवींद्र चिंचोळकर यांनी ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ची कल्पना उचलून धरली. त्यांनी त्यांच्या पत्रकार विद्यार्थ्यांना माहितीसंकलन कार्यात गुंतवले आणि त्याबद्दल त्यांना श्रेयाचे (क्रेडिट्सचे) आमीष दाखवले. तो ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’च्या यशातील मोठा दुवा ठरला.

सगळे नागरिक जीवन गेल्या पन्नास वर्षांत राजकारणाश्रयी होत गेले आहे. त्यास उत्तर म्हणून जी सिव्हिल सोसायटी (राजकारण आणि संरक्षण दले यांहून वेगळी, तिसरी शक्ती) निर्माण झाली तिचेच राजकारण होत असलेले दिसले. त्या सर्वांच्या पलीकडे माणसे व त्यांचा समाज स्वत:चे जीवन स्वत: जगू इच्छितात, त्यात त्यांना ना धर्माचा वा जातीचा अडसर येत, ना राजकारण्यांची वा पोलिसांची मदत लागत… असे जगू इच्छिणारे, जगणारे लोक एकमेकांना भेटले. त्यांनी त्यांच्या फक्त गुणांची बेरीज केली. अवगुण तर व्यक्तीव्यक्तींत आणि त्यांनी बनलेल्या समाजात असतातच, ते किती उगाळायचे? माणसांचे जगण्याचे प्रश्न तंत्रविज्ञानप्रभावित जगात सुटतील अशी सर्व चिन्हे दिसत असताना माणसाला आशावादी राहणे सहज शक्य आहे. म्हणूनच समाजातील विधायकतेचे –  पॉझिटिव्ह फोर्स – जाळे निर्माण करणे अभिप्रेत असलेल्या ‘थिंक महाराष्ट्र’च्या नेटवर्क संकल्पनेला जोमदार पाठिंबा मिळत गेला.

सोलापूरचे साथीदार आता विचारतात, पुढचा जिल्हा कोणता? ‘थिंक महाराष्ट्र’चे त्यांना उत्तर असते, ते तुम्हीच ठरवायचे आहे.

About Post Author

Previous articleमाझं गाव मोडनिंब! (Modnimb)
Next articleअपेक्षा बहुआयामी ज्ञानप्रकाश (रिनेसान्स) चळवळीची
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.