म्हातारा इतुका न…

0
28

– दिनकर गांगल

     अण्णा हजारे, रामदेवबाबा यांचे गेले काही महिने चालू असलेले नाट्य उबग आणून राहिले होते. त्यावर मनमोहन सिंग यांनी कुरघोडी केली. त्यांनी त्या दोघांना आणखीच महत्त्व द्यायचे ठरवले असावे! मनमोहन सिंग आपदधर्म म्हणून राजकारणात आले आणि पूर्णत: प्रदूषित झालेल्या यंत्रणेच्या हातचे खेळणे बनून गेले…


     अण्णा हजारे, रामदेवबाबा यांचे गेले काही महिने चालू असलेले नाट्य उबग आणून राहिले होते. त्यावर मनमोहन सिंग यांनी कुरघोडी केली. त्यांनी त्या दोघांना आणखीच महत्त्व द्यायचे ठरवले असावे! मनमोहन सिंग आपदधर्म म्हणून राजकारणात आले आणि पूर्णत: प्रदूषित झालेल्या यंत्रणेच्या हातचे खेळणे बनून गेले. अर्थात त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नव्हती. त्यांची ब्युरोक्रसीतील करिअर आणि एक विषयतज्ञ… त्यामुळे एका टप्प्यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व देशाला नेता म्हणून उपकारक झाले. त्यानंतर समर्थ राजकीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवे होते, ते झाले नाहीत. राहुल गांधींचा काही अंदाजच लागत नाही, तोच प्रियंका यांचे नाव काँग्रेस नेतृत्वासाठी पुढे येत आहे!

     खरे तर, विद्यमान बजबजपुरीच्या दैनंदिन राजकारणाला मुळीच महत्त्व देऊ नये, त्यात वेळ घालवू नये, मात्र घडामोडी वाचत राहवे असे माझे मत आहे. प्रशासन व देशाचा कारभार निष्पक्ष, प्रभावी आणि नियमाने बध्द कसा होऊ शकेल यावर विद्वानांनी चर्चा घडवावी, मते प्रदर्शित करावीत आणि त्यांतील योग्य पर्याय/उपाय स्वीकारण्यासाठी जनतेला जागे करावे… मला कार्याची ही दिशा मान्य होते, तरी अण्णा हजारे, मनमोहन सिंग, अडवाणी, बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे वृध्दातिवृध्द या देशाच्या घडामोडींच्या केंद्रस्थानी कैक दिवस असावेत आणि तरुणांनी त्याबद्दल ब्र काढू नये याचा अचंबा वाटून आज या आठ-दहा ओळी खरडत आहे. महाराष्ट्रापुरते, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार व त्यांची टीम, उध्दव व राज ठाकरे, नितिन गडकरी हे दैनंदिन राजकारणात सक्रिय असलेले त्या वृध्दांपेक्षा कितीतरी तरुण लोक…यांनी का वृध्दांच्या ‘वेड्या’ चौकटीत बांधले जायचे? त्यांनी मुक्त व्हावे, योग्य असा कार्यक्रम जनतेसमोर मांडावा. पैसा हे उद्दिष्ट ठेवू नये. जनता त्यांच्या मागे येईल.

     परंतु ही जबाबदारी खरी सुरू होते ती बुध्दिवंतांच्या चर्चेपासून. ते करमणुकीच्या कर्मकांडात किंवा पोपटपंची अभ्यास-संशोधनात मग्न आहेत. त्यांनी हे ध्यानी ठेवावे, की सर्व शास्त्रांतील अभ्यास-संशोधन हे जनतेच्या कामासाठी असते. अभ्यासासाठी अभ्यास असा कधी नसतोच.

     आजच्या मुद्याशी पुन्हा यायचे तर देशात जो वेडेपणा चालला आहे त्यास म्हातारचळ म्हणता येईल. तरुणांनी पुढे यावे व कृती करावी, कारण त्यांना उद्याच्या जगात जगायचे आहे. या वृध्दातिवृध्दांना नाही, त्यामुळे त्यांचा ‘स्टेक’ मर्यादितच असणार. रामदेवबाबा या गटात मोडत नसले तरी एकूण विचाराने व कार्यपध्दतीने ते गेल्या जमान्यातलेच वाटतात.

     तरुणांनी त्या सर्वांना (व आम्हालाही) रिटायर करावे.

-दिनकर गांगल
जेष्ठ पत्रकार

About Post Author

Previous articleवाढदिवशी पुस्तकांचा स्टॉल !
Next articleसाने गुरुजींच्या आठवणी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.