मायाजालात ‘इंटरनेट हिंदू’

CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले
CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले

CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले     इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची संधी मिळाली. वाद सुरू झाला ‘इंटरनेट हिंदू’ या वाक्प्रयोगातून.

     दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल’मधल्या कॅज्युअल चर्चाही बातम्या होतात. तसेच, इंटरनेटवरील काही वर्तुळांतले कॉईन शब्द तत्काळ प्रतिष्ठित कॉलम्समध्ये जातात!

     CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून ‘इंटरनेट हिंदू’ या ‘जमाती’ला प्रथम ललकारले. सागरिका यांनी टि्वटरवरच्या मतप्रदर्शनात ‘इंटरनेट हिंदू’ जमातीतल्या लोकांना शिव्या घातल्या, तेव्हा त्यांनी सारे ‘इंटरनेट हिंदू’ कसे तिय्यम दर्जाचे आहेत असे सांगत अजून पाच-पन्नास वेळा टि्वट केले. त्यांचे एक टि्वट माझ्या चांगल्या लक्षात राहिले. त्या लिहितात, ‘इंटरनेट हिंदू’ हे चवताळलेल्या माश्यांच्या झुंडींसारखे आहेत. मोदी, पाकिस्तान, मुस्लिम हे शब्द वाचले की या माश्यांची झुंड हल्ला करते.” सागरिका यांना ‘इंटरनेट हिंदूं’बाबत वाद-चर्चा करण्यापेक्षा त्यांना उचकावण्यात जास्त रस आहे असे माझे मत झाले आहे.

     कांचन गुप्ता यांनी कॉइन झालेल्या या शब्दावर ‘सण्डे पायोनियर’मध्ये लेख लिहिला. त्यांनी अमेरिकेत अथवा भारतात दिल्ली, चेन्नई अशा शहरांत स्थिर, झालेले उच्चशिक्षित उच्चभ्रू ‘इंटरनेट हिंदू’ हे स्युडो सेक्युलरिस्टांना कसे जागेवर ठेवतात याचे वर्णन आणि समर्थन केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमे, विशेषतः सीएनएन-आयबीएन, एनडीटीव्ही ज्या पध्दतीने ‘हिंदुत्वा’चे खंडन करतात ते ‘इंटरनेट हिंदूं’ना आवडत नाही आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून टि्वट्स, ब्लॉग्ज, यांच्यावर आपापली मते मनसोक्त प्रकाशित करतात. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष यांच्या ब्लॉग्जवर ‘इंटरनेट हिंदूं’च्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. माध्यमांची भूमिका एककल्ली आहे आणि पत्रकारांना जनतेला माहिती देण्यापेक्षा, त्यांना आपली मते लादण्यात जास्त रस आहे असे या ‘इंटरनेट हिंदूं’चे मत असते. त्यामुळे सागरिका घोष यांना त्यांच्या ‘डाव्या’ मतांबद्दल शिव्या घालणे यात ‘इंटरनेट हिंदूं’ना गैर वाटत नाही आणि ‘इंटरनेट हिंदूं’ना कमी लेखण्यात सागरिकांनाही काही कमी वाटत नाही.

     हिंदुत्ववाद ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत जेव्हा वाढत होता तेव्हा डाव्यांना ‘दंगलखोर शिवसैनिक’ आणि ‘अर्ध्या पँटीतले संघवाले’ ही दोनच हिंदू रूपे ठाऊक होती. उलट, डाव्यांकडे इंटेलेक्चुअल्स, कामगार, कलाकार, सोविएत प्रणित फंडिंगवर जगणारे अनेक मान्यवर लेखक अशी जी विविधता होती, त्यापेक्षा कित्येकपट सरधोपट आणि अल्पसंख्य ओळख ‘हिंदू’ मते मांडणा-या समुहात होती. संजय पवार यांच्या ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ नाटकामधला सोमनाथ मंदिराची पुनःपुन्हा आठवण काढणारा भाऊ हा या ‘इंटरनेट हिंदूं’चा पूर्वसुरी मानता येईल!

     मात्र हे गणित नव्वदच्या दशकानंतर बदलले. इंटरनेटचा वापर ऍकॅडमिक संस्थांमधून मोठया प्रमाणावर चालू झाला आणि समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय संशोधन अशा ज्या क्षेत्रांत बहुतांश डाव्यांची मक्तेदारी होती त्या विषयांवर इतर विद्याशाखांतील माणसेही आपापली मते व्यक्त करू लागली. इंटरनेटमुळे प्रथमतः मानव्य शाखा आणि इंजिनीयरिंग, प्युअर सायन्स रिसर्च, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थ या सा-यांना एकत्र व्यासपीठ निर्माण झाले. तोपर्यंत मानव्य शाखांत संशोधन करणा-या व्यक्तींना त्यांचा ‘स्वायत्त’ डावा कोष होता. आयआयटीत डावे-उजवे गट होते, परंतु ते हॉस्टेलमध्ये रात्र रात्र जागून केलेल्या भांडणांपुरते. y2k नंतरच्या काळात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, मानव्य शाखांचे शिक्षण नसलेले, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय, IT क्षेत्रांत घुसलेले घोडागिरी स्पेशालिस्ट (सॉरी, म्हणजे बॉडीशॉपिंगच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन फारसे महत्त्वाचे काम न करणारे असे लोक) यांची मोठी फळी इंटरनेटवर कार्यरत झाली. यांत काही अतिशय स्मार्ट आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारेही होते.

     या फळीला डाव्यांनी वर्षानुवर्षे उराशी कवटाळलेली समाजवादसुलभ मते पटायची नाहीत आणि तिथूनच ‘स्युडो सेक्युलारिस्ट’ या विशेषणाचा इंटरनेट वापर वाढलेला दिसून येईल.

     पूर्वी ‘याहू ग्रूप्स’वर वाद चालायचे. हे ‘याहू ग्रूप्स’ भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत इत्यादी गोष्टींवर चर्चा करायचे. एखाद्या ‘याहू ग्रूप’वर हजारो माणसे जरी मेंबर असतील तरी त्यांतले व्यक्त होणारे दहा-पंधरा जणच असायचे. बाकीचे वाचक असायचे. ‘इंटरनेट हिंदूं’चा पहिला जन्म झाला तो या ‘याहू ग्रूप्स’वर. इथे प्रथम मी मुंबईतल्या ९२सालच्या अयोध्येनंतरच्या दंगलीबद्दलची चर्चा ८४च्या शीख दिल्लीतील दंगलींपर्यंत गेलेली वाचली किंवा रोमिला थापर यांना मनसोक्त शिव्या घालणा-या लेखकांचे ताशेरेही वाचले.

     अनेकांनी ‘याहू ग्रूप्स’मधून फुटून आपापले गट तयार केले. यात ‘सॉनेट’चा (म्हणजे साऊथ एशियन विमेन्स नेटवर्क) उल्लेख करते. ‘याहू ग्रूप्स’ना कंटाळून लिबरल डाव्यांनी आपली वेगळी चूल मांडणे सुरू केले. ‘सॉनेट’वर तर फक्त स्त्रिया पोस्ट करू शकायच्या. या सा-या ग्रूप्समध्ये इंग्रजीवर प्रभुत्व असणा-या दोन-चार ‘इंटरनेट हिंदूं’ची आणि लिबरल डाव्यांची सतत जुंपायची. दरम्यान, ‘सुलेखा’ या पोर्टलचा जन्म झाला. अनेक अनिवासी भारतीयांना ‘सुलेखा’मुळे आधार मिळाला. त्यावर क्लासिफाईड्स होत्या, लग्ने जमवण्याची सोय होती; शिवाय ब्लॉग आणि चर्चा करण्यासाठीही जागा होती!

     भारतातल्या भाजप सरकारच्या काळात, जेव्हा ‘इंडिया शायनिंग’ होता तेव्हा ‘इंटरनेट हिंदूं’नी आघाडी घेतली. सुलेखावर त्या काळात झालेले ‘आर्यांचे आक्रमण खरे की खोटे?’, ‘सिंधु संस्कृतीचा प्रश्न’, ‘प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये’ या विषयांवरचे वाद मला आठवतात.

     इन्फिनिटी फाऊंडेशनचे राजीव मल्होत्रा, बापा राव, संक्रांत सानू ही मंडळी तत्कालीन समाजात ‘इंटरनेट हिंदूं’चे काम करत. डाव्यांच्या सेक्युलर तुच्छतावादाला इंटरनेटवरून दिलेले हे जहाल ‘हिंदू’ प्रत्युत्तर होते. त्या सुमारास झालेले दोन-तीन वाद महत्त्वाचे होते.

     शिकागो विद्यापीठात वेंडी डोनिजर या प्राध्यापिका शिकवतात. अमेरिकन विद्यापीठात रिलिजन, रिलिजस स्टडीज या विषयांचा ‘सेक्युलर’ व ‘धार्मिक’, दोन्ही अंगांनी अभ्यास होतो. यामध्ये अनेक वर्षे डोनिजरबाईंनी भारतीय हिंदू धर्माबद्दल लेखन, संशोधन केले आहे. मात्र पूर्वी, अशा त-हेचे लेखन केवळ विद्यापीठीय वाचनापुरते मर्यादित होते. Y2k नंतरच्या जगात उच्चविद्याविभुषित, भारतीय संस्कृतीवर प्रेम करणा-या लोकांनी डोनिजरबाईंची पुस्तके वाचली. त्यांना त्यातले भारतीय देवी-देवतांबद्दलचे उल्लेख असह्य झाले. वेंडी डोनिजर, पॉल कार्टेराईट, जेम्स लेन या तीन, ‘रिलिजन’ या विद्याशाखेत संशोधन करणा-या लेखकांवर ‘सुलेखा’वरून सडकून टीका करण्यात आली. नंतर त्याचेच पर्यवसान वेंडी डोनिजरवर अंडी फेकण्यात किंवा भारतात जेम्स लेनच्या पुस्तकावरून वादळ उठवण्यात झाले. ‘इंटरनेट हिंदूं’चे हे शक्तिप्रदर्शन होते.

     गेल्या आठवड्यात अशोक मलिक यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’मध्ये ‘व्हेन द फ्रिंज बेनिफिट्स’ म्हणजे जेव्हा अल्पसंख्यांचा फायदा होतो असा कॉलम लिहिला, तेव्हा त्या कॉलममधून त्यांनी ‘इंटरनेट हिंदू’चा पुन्हा उल्लेख केला.

     अशोक मलिक यांच्या मते, भाजपप्रणित हिंदू फळीला वाव राहिलेला नसल्यामुळे ते आता ‘इंटरनेट अँक्टिव्हिजम’ करत आहेत.

     कांचन गुप्ता यांचे मत वेगळे आहे. त्यांना या ‘इंटरनेट हिंदूं’ना कमी लेखायचे नाही. माध्यम आणि शिक्षणव्यवस्थेतली डाव्यांची दादागिरी हे ‘इंटरनेट हिंदू’ मोडीत काढतात असे त्यांना वाटते.

     ‘याहू इंडिया’वरचा अमित वर्मांचा कॉलम आणि मला आवडणा-या ‘सेपिया म्युटिनी’ या ब्लॉगवरची मते मात्र मला या संदर्भात फार आवडली. अमित वर्माने सागरिका यांच्या दुख-या भागावर बोट ठेवले. इंटरनेटवर ‘ट्रॉल’ नावाची एक जमात असते. तुमच्या मतांना विरोध करून, अत्यंत ग्राम्य भाषेत तुमच्याबद्दल लिहून तुम्हाला भडकावणे एवढेच ‘ट्रॉल’चे काम असते. इंटरनेटवर ज्यांनी अनेक वर्षे काढली. त्यांनी या ‘ट्रॉल’बरोबर वाद न घालता त्यांना दुर्लक्षून मारून टाकावे असे बेसिक ट्रेनिंग आवश्यक असते. हे ट्रेनिंग इंटरनेटवर मते व्यक्त करणा-या प्रत्येकाला हवे असे अमित वर्मांचे मत आहे. अमित वर्मा ‘डुकरांबरोबर कुस्ती खेळू नये. तुम्हाला चिखल लागतो आणि डुकरांना मज्जा येते!’ असे मूळ तत्त्व सांगतात.

     पण त्याही पलीकडचे सुंदर निरीक्षण नोंदवले गेले आहे, ‘सेपिया म्युटिनी’वर. इंटरनेटवर माणसे वास्तवात आहेत, त्यापेक्षा जास्त अतिरेकी वागतात. शिवाय, समविचारी ब्लॉगर किंवा प्रतिक्रिया लिहिणारे भेटले की त्यांची मते अहमहमिकेने अधिक जहाल बनत जातात. या जहालपणाची चढाओढ चिन्ह जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी होते. मात्र इंटरनेटवरचा अतिरेकीपणा ही केवळ ‘इंटरनेट हिंदूं’ची मक्तेदारी नाही असे ‘सेपिया म्युटिनी’वर म्हटले आहे. इंटरनेट मार्क्सिस्टस्, इंटरनेट ज्यू, इंटरनेट मुस्लिम असे अनेक प्रकारचे ‘कडवे वाल’ इंटरनेटवर जन्माला आलेले आहेत. यांच्या जन्माचे कारण म्हणजे त्यांची ‘अस्मिते’ची भूक आहे. या नव्या अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. बदनामीचे एक साधन म्हणून इंटरनेट वापरता येऊ शकते, म्हणूनच केवळ ‘इंटरनेट हिंदूं’ना खडयासारखे वेगळे काढता येणार नाही.

     माध्यमांकडे, अँकॅडॅमिक्समध्ये पूर्वापार असणारी डाव्या विचारसरणीची वैचारिक दादागिरी नव्या पिढीला चालत नाही. मनसेच्या राड्यानंतर किंवा मिरजेच्या दंगलीनंतर तरुण मुले इंटरनेटवरून आपापली मते त्वेषाने मांडताना दिसतात. ‘इंटरनेट हिंदूं’ची ही जनरेशन नेक्स्ट आहे. मनसेचे इंटरनेट मनसैनिक ‘राजसाहेबांना’ ज्या प्रकारे मानतात ते बघितल्यावर येणा-या काळाची चुणूक दिसते.

     मात्र या माध्यमात अशा त-हेच्या नव्या अस्मिता जन्माला येताना बरेच काही शिकण्याजोगे आहे. ‘महाराष्ट्र माझा’ या शिरीष पारकरांच्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसचा उल्लेख ‘व्हीटी’ असा केला. ही बातमी टि्वटरवरून पसरताच इंटरनेट मनसैनिक सरसावले. ही तरुण पिढी किती वेगळी आहे बघा! त्यांतले अनेक जण म्हणाले, की ‘राजसाहेबांनी व्हीटी म्हटले असेल तर ते चूक आहे. त्यांनी ‘सॉरी’ म्हणावे म्हणजे प्रश्न मिटला.’ नेत्यांकडे, त्यांच्या राजकारणाकडे खुलेपणाने बघणारी ही तरुण पिढी इंटरनेटवर व्यक्त होत आहे.

     अशा तरुण पिढीला अतिरेकी डावी मते मांडून स्वतःला स्नॉब समजणा-या सागरिका आवडणार नाहीत. तसेच, दुसरीकडे त्यांना श्रीराम सेनेचा मूर्खपणा किंवा संघिष्ट – हेटॉरिकल प्रतिवादही आवडणार नाही. ‘इंटरनेट हिंदू’, इंटरनेट ज्यू, इंटरनेट मराठी हे इंटरनेटवरी कडवे अस्मितावादी; परंतु ते त्यांच्या व्यवहारात अतिशय सेक्युलर असू शकतात, किंबहुना असतातच. इंटरनेटवर त्यांनी आपल्या कडवेपणाने  लिबरल कडवेपणाला शह दिलेला असतो. इंटरनेट नावाच्या मायाजालातल्या या नव्या शक्यता आहेत. नेटवरच्या नव्या समीकरणांत पन्नाशीकडे झुकलेले जुने डावे, जुने समाजवादी, जुने हिंदू, जुने जहाल, कोणीही टिकणार नाहीत. आता नवे प्रॅग्मॅटिक जहाल इथे निर्माण होतील आणि स्वतःला शहाण्या समजणा-या प्रत्येक व्यक्तीचे राजकारण तपासून बघतील. त्यांचे विचार इंटरनेट माध्यमातून समाजमनात झिरपत जातील.

     खरी ओळख लपवणे इंटरनेटमुळे शक्य होते. त्यामुळे इंटरनेटचे जग हे प्रत्येक सामाजिक व्यक्तीचे वाभाडे काढू शकेल. शेवटी, आपल्याला कोणत्या डुकरांशी कुस्ती खेळायची आहे की त्यांना सॉक्रेटिक शहाणपणापर्यन्त न्यायचे आहे हा असेल ज्याचा त्याचा प्रश्न!

ज्ञानदा देशपांडे
मोबाईल – ९९३०३६०५५०

ईमेल – dnyanada_d@yahoo.com

About Post Author