मानवी विकार व संस्कृती

0
24

काय योगायोग, पाहा! विजय तेंडुलकर यांचा दहावा स्मृतिदिन आणि जागतिक हिंसाचारविरोधी दिवस हे जवळजवळ लागून, एकापाठोपाठ एक आले. त्यामुळे त्या घटनांना औचित्य लाभले. ही आठवडाभरा पूर्वीची गोष्ट. विजय तेंडुलकर यांनी हिंसाचाराचा, विशेषत: मानवात दडलेल्या हिंसावृत्तीचा शोध घेतला. तोच त्यांनी त्यांच्या नाट्यकृती व चित्रपटकृती यांमधून मांडला. मनुष्य हादेखील प्राणी आहे. त्याने त्याच्या प्राणीज विकृती संस्कृतीच्या आवरणाखाली दाबून ठेवण्याचा परोपरीने प्रयत्न केला आहे. परंतु अडचणीचे प्रसंग उद्भवताच संस्कृतीची ती आवरणे गळून पडतात व मनुष्यदेखील हिंस्र प्राण्यासारखा उघडावाघडा व्यक्त होतो. तेंडुलकर यांनी त्यांचे ते निरीक्षण कलात्मक रीतीने मांडले. त्यामुळे ते प्रभावी रीत्या व्यक्त झाले आणि परिणामतः लोक बिथरले. त्यांनी त्यांची नाटके बंद पाडली, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले केले. तेंडुलकर त्या काळात कमालीचे शांत राहिले. त्यामुळे त्यांच्या पक्क्या चाहत्यांचा वर्ग जसा तयार झाला तसा त्यांच्याबद्दल मनात अढी बाळगून असलेला वर्गही तयार झाला. समाजात असे गट तयार झाले, की वस्तुनिष्ठता संपते. तसेच तेंडुलकरांच्या बाबतीतही घडले. त्यांच्या प्रतिपादनाचा वाद-प्रतिवाद फारसा खोलवर झाला नाही.

भारतीय परंपरेने माणसाचे विकार सहा मानले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर! माणसाचे वर्तन त्या घटकांनी नियंत्रित होते. त्यांचा अतिरेक माणसाला विकृतीकडे नेतो. माणसाच्या हातून सर्व गुन्हे त्यामुळे घडतात. पांडुरंग खोत नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने, त्यांनी शोध लावलेल्या दहा गुन्ह्यांच्या कथा सांगितल्या आहेत आणि दाखवून दिले आहे, की त्या गुन्ह्यांच्या मुळाशी षड्रिपूंपैकी कोणता ना कोणता विकार बळावला हे कारण आहे. उलट, त्या सहा विकारांचे यथायोग्य प्रमाण माणसाला सुकृतीकडे नेते. त्यामधून संस्कृती घडते. मला व्यक्तिश: ही मांडणी यथार्थ वाटते व आवडतेही.

या विकारांपलीकडे, माणसाच्या स्वभावप्रकृतीकडेही भारतीय परंपरा विधायक रीतीने पाहते. स्वभावप्रकृतीची सत्त्व-रज-तम अशा तीन प्रकारे विभागणी केली जाते. ‘तम’पासून ‘सत्त्व’पर्यंत जाणे हे माणसाचे इतिकर्तव्य असते असेही ती परंपरा निर्देशित करते. त्या आधी ‘स्वभावो दुरतिक्रम:’ किंवा ‘स्वभावाला औषध नसते’ हे बजावून सांगितलेले असतेच.

म्हणजे बघा, मनुष्य घडवण्याची ही प्रक्रिया आहे. ते भारतीय परंपरेचे वैशिष्ट्य जाणवते. पाश्चात्य वैज्ञानिकांनी व समाजशास्त्रज्ञांनी गेल्या दोन-तीनशे वर्षांत माणसाच्या शरीरप्रकृतीचा व मनोविज्ञानाचा विविध तऱ्हांनी शोध घेतला. त्यामधून माणसाच्या स्वभावप्रकृतीचे आणि तीमधील विकारांचे विश्लेषण सूक्ष्मतेने घडून आलेले आहे. त्यात प्रकृतीमधील बिघाडांचे व ते दुरुस्त करण्याचे वर्णन आहे, परंतु मनुष्य घडवण्याचे व प्रकृतीतील दोष दृगोचरच होणार नाहीत यासाठीचे उपाय नाहीत. मला आधुनिक अभ्यासातील एकूणच हे उणेपण जाणवते.

तेंडुलकरांनी तो आधुनिक अभ्यास हिंसाचाराच्या संदर्भात भारतात आणला. त्यामुळे वाचक-प्रेक्षक-श्रोते भयचकित झाले. त्यांनी माणसाची जगण्याची प्रबळ इच्छादेखील फार प्रभावी रीत्या व्यक्त केली, मात्र ते जगणे निरोगी, निर्विकार कसे होईल हा विचार फार पुढे नेला नाही. तसे सूचनही त्यांच्या कृतींमधून झाले नाही. त्यामुळे मनुष्यस्थितीचे वास्तव दर्शन प्रखरपणे झाले, परंतु उपाययोजना सुचवली गेली नाही. उलट, ते लेखक-कलावंताचे कामच नव्हे अशी त्यांची भूमिका होती.

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleगोटेवाडी
Next articleगीता – जशी ऐकली तशी – व्हॉट्सअॅपवरून!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.