बाळ भालेराव – साहित्य संघाचा प्राण (Bal Bhalerao – Doctor Who Devoted His Life to Stage & Literature)

डॉ. बाळ भालेराव

विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दादरच्या (मुंबई) राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भरले होते. त्यात एका संध्याकाळी साष्टांग नमस्कार हे नाटक रंगले होते. काम करणारे सगळे होते पत्रकार! दिग्दर्शक होते विहंग नायक. नायिकेच्या भूमिकेत वसुंधरा पेंडसे अन् त्यात छोट्या चंदूची भूमिका केली होती विहंगच्या मुलाने. संमेलनात पत्रकारांचे नाटक असावे ही संकल्पना डॉ. बाळ भालेराव यांची. त्या संबंधातूनच पुढे भालेराव यांनी विहंग यांना साहित्य संघाच्या नाट्यशाखेत ओढून घेतले. वेगळी, अनोखी संकल्पना राबवणे, माणसांना पारखून संस्था मोठी करणे आणि स्वत:च्या डॉक्टरी पेशाचा/पैशांचा आधार नाट्यसृष्टीतील असंख्यांना देणे ही बाळ भालेराव यांची वैशिष्ट्ये. डॉक्टरांचे तसे ऋण तर माझ्यावरही होते. माझ्या वहिनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या भरवशावरच दाखल झाल्या होत्या. तेव्हा साहित्य संघाचे महानगर साहित्य संमेलन बोरिवलीला चालू होते. संमेलन आटोपल्यावर घरी परतायचे; तर भालेराव मला म्हणाले, चला, जाता जाता तुमच्या वहिनींना बघून पुढे जाऊ.डॉक्टरी पेशाच्या सहाव्या इंद्रियामुळे म्हणा की माझ्या वहिनीच्या जबरदस्त इच्छाशक्तीने म्हणा; आम्ही अगदी वेळेवर पोचलो. वहिनीच्या पोटात पाणी खूप साठले होते तेव्हा. भालेराव यांनी तातडीचे उपचार केले अन् मी त्यांची ऋणी झाले, कायमची. माझ्या भावाला, डॉ. सुनीलला त्यांनी जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये शिकवले होते.

भालेराव यांच्याशी माझा जवळचा स्नेहबंध मुंबई मराठी साहित्य संघातील माझ्या कामामुळे आला. माझ्या मोठ्या मुलीचे- अनुराधाचे लग्न ठरले तेव्हा त्यांनी एक कुटुंबीय असल्यासारखी जातीने चौकशी केली, काळजी घेतली. त्यांच्या सौभाग्यवती डॉ. विजया (विजुताई) यादेखील त्यात सहभागी असत. त्या अनुराधाच्या पहिल्या गरोदरपणात वरचेवर फोन करून चौकशी करत. ती बाळंतीण झाली तर त्यांनी आपणहून मला घरी बोलावून त्यांच्या घरचा (इंग्लंडहून आणलेला) दुधाची बाटली धुण्याचा स्टरलायझर भेट दिला होता! बाळ भालेराव यांचे दुसरे कुटुंब म्हणजे मुंबई मराठी साहित्य संघ. त्या संस्थेत काम करणारी मी. म्हणून मी जणू त्यांची कुटुंबीयच!

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पहिले विश्व साहित्य संमेलन सॅन होजेला भरले तेव्हा त्यांनी माझी निवड साहित्य संघाची एक प्रतिनिधी म्हणून केली. मला व्हिसा पहिल्या फटक्यात नाकारला गेला. तो माझा परदेशवारीचा पहिलाच प्रसंग असणार होता. पण माशी शिंकली. वर्तमानपत्रांनी त्या गोष्टीचा खूप गाजावाजा केला. बाळ भालेराव यांनी मला फोन करून पुन्हा अर्ज भरण्यास सांगितले. परदेशात जाण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी पहिल्या वेळी मराठीत मुलाखत घेण्यात आली होती. डॉक्टर म्हणाले, आता तुम्ही मराठी मुलाखतीसाठी जाऊ नका. दुभाष्यांना काही कळत नाही. मी अर्ज करण्यासाठी लागणारे पैसे देतो. नाहीतर साहित्य संघ देईल.झाले की माझे काम! डॉक्टरांनी भरीस घातले नसते तर मी एका सुंदर अनुभवाला मुकले असते. मी मराठी भाषा अमराठी भाषकांना शिकवण्याचा वसा साहित्य संघातर्फे गेली अनेक वर्षे घेतला आहे. त्याबद्दलही ते म्हणत, हे वर्ग विद्यार्थी कमी झाले तरी बंद करायचे नाहीत. तुम्ही एक पुण्यकार्य करता आहात.” साहित्य संघाच्या; किंबहुना कोठल्याही संस्थेच्या कार्याला पुढे नेण्यासाठी अशी सकारात्मकता लागते; ती डॉक्टरांमध्ये होती. ओ निगेटिव्ह हा माणसाचा रक्तगट दुर्मीळ मानला जातो. अगदी तसेच, माणसाच्या वृत्तीत सकारात्मकता हा दुर्मीळ घटक असतो. तो दुर्मीळ घटक बाळ भालेराव यांच्यामध्ये होता.

कार्यमग्न डॉ. भालेराव

मी मुंबई मराठी साहित्य संघाच्या साहित्यया त्रैमासिकाची संपादक पाच वर्षे होते. तेव्हा मी त्या मासिकात कोणते विषय घ्यावेत, विशेषांक कोणता व कसा असावा, मुद्रणाचे काम कोणाला द्यावे… इत्यादीबाबत त्यांची धारणा निश्चित असायची. त्यांना साहित्य संघाला सुरुवातीच्या उमेदीच्या काळात ज्यांनी ज्यांनी तनमनधनाने हातभार लावला, त्यांच्या ऋणांतून उतराई व्हावे असे वाटायचे. त्यानुसार त्या मासिकाची आखणी असायची. त्यांच्या तशा उतराई व्हावेया भूमिकेतूनच स्मरण व्याख्यानमाला, अमृत व्याख्यानमाला असे उपक्रम आखले गेले. नवीन सभागृह उभे राहिले ते अमृत नाट्यभारती सभागृहम्हणूनच. त्या कृतज्ञतेपोटी भालेराव कुटुंबीयांतर्फे पंचवीस, पंचवीस हजारांचे यशवंत पुरस्कारआणि सहचारिणी पुरस्कारदेण्यात येऊ लागले. वा.रा. ढवळे स्मृतिदालनम्हणून अक्षर साहित्य दालन उभे राहिले. त्या दालनाची प्रमुख म्हणून माझी कामगिरी वाखाणताना ते सभेत म्हणाले होते, वा.रा. ढवळे स्वर्गातून बघताहेत तुझ्याकडे खुश होऊन.कारण मी वाङ्मयीन परीक्षावर्ग घेण्याच्या निमित्ताने, चर्चासत्रांच्या निमित्ताने वा.रा. ढवळे यांचेच बोट धरून साहित्य संघात गेले होते. ते त्याचा उल्लेख कौतुकाने असा करत.

वा.रा. ढवळे स्मृतिदालन म्हणजे अक्षर साहित्य दालनही आगळीवेगळी संकल्पना बाळ भालेराव यांचीच. त्या दालनात पंधरा-सोळा प्रकाशकांच्या सहकार्याने पुस्तके मांडली आहेत. त्यांची त्यामागील धारणा वाचकांनी यावे, पुस्तक वाचावे-हवे असल्यास विकत घ्यावे अशी आहे. त्याच दालनात महिन्याला किमान एक आणि पुढे कितीही कार्यक्रम सातत्याने होतात. रसिकांची वर्दळ साहित्य संघात पूर्वीसारखी वाढावी म्हणून बाळ भालेराव यांचा प्रयत्न सदैव राहिला. त्या दालनातर्फे अक्षरसाहित्य नावाची छोटी पुस्तिका प्रकाशित होते. त्या पुस्तिकेची संकल्पना, विषयाची निवड, लेखकांची निवड पूर्णपणे बाळ भालेराव यांची असायची. इतकेच नव्हे तर, पुस्तिकेसाठी मुद्रकही त्यांनीच शोधला आणि प्रकाशनाला लागणारा पूर्ण खर्चही तेच करायचे. त्या दालनातर्फे काही छोटी पुस्तके (पॉकेट बुक्स) यावीत हीदेखील त्यांची भविष्यवेधी कल्पना ! ‘ज्ञानेश्वरीचे संक्षिप्त रूप अमृतकण कोवळेनावाने रेखा नार्वेकर यांनी केले आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती तीन महिन्यांत संपली.

संस्थेच्या सर्वंकष विकासासाठी लागणारी दूरदृष्टी बाळ भालेराव यांच्याकडे होती. त्यासाठी ते सतत प्रयोगशील राहिले. मुंबई मराठी साहित्य संघाचे आणि बाळ भालेराव यांचे नाते म्हणजे आत्मा आणि शरीर असेच होते. साहित्य संघ हा जणू त्यांचा बहिश्वर प्राण होता. म्हणूनच एमबीबीएसला सुवर्णपदक मिळवणारे, एडिंबरोमधून एफआरसीएस होणारे, अॅनाटॉमी आणि सर्जरी या विषयांत 19521956 मध्ये सुवर्णपदक मिळवणारे, केईएममध्ये सर्जरी विभागप्रमुख राहिलेले; हिंदुजा रुग्णालयात सर्जरी विभागप्रमुख आणि पुढे, डायरेक्टर ऑफ प्रोफेशनल सर्विसेस झालेले… आणि असे आणखी काय काय असलेले डॉक्टर बाळ भालेराव त्यांचा जीव साहित्य संघाच्या कार्यात ओतत. त्यांना नाटकांत विशेष रुची होती. डॉक्टरांच्याच पुढाकाराने पु.ल. साहित्य संघाचे झाले. अंमलदार’, ‘तुझे आहे तुजपाशी अमर झाले. वि.वा. शिरवाडकर यांनी नाट्यलेखनाची सुरुवात साहित्य संघातच केली आणि त्यांचे दूरचे दिवेचमचमले. त्यांनी राजमुकुटही या संस्थेसाठी लिहिले आणि कळस म्हणजे नटसम्राट’ ! ‘संत गोरा कुंभारहे रंगमंचावर तंत्रकिमया करणारे नाटक साहित्य संघानेच आणले. बाळ भालेराव यांच्या प्रेरणेने धाडिला राम तिने का वनी?’, ‘संन्यस्त खङ्गही संगीत नाटके साहित्य संघाची निर्मिती झाली. टिळक आणि आगरकर हे नाटक पेलले साहित्य संघानेच. साहित्य संघाने नाट्यसृष्टीत ऐतिहासिक चमत्कार म्हणावा असे ते नाटक 1971 साली बाळ भालेराव यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे दिले. कॉकेशियन चॉक सर्कलया बर्ट्राण्ड रसेल यांच्या नाटकाचा चिं.त्र्यं. खानोलकर यांनी अजब न्याय वर्तुळाचाहा अनुवाद केला आणि विजया मेहता, बाळ भालेराव यांच्या प्रयत्नाने चाळीस जणांचा ताफा प्रथम जर्मनीत व नंतर सर्व युरोपभर फिरला. डॉक्टर नसते तर तो चमत्कार घडलाच नसता. मुद्राराक्षस जर्मनीमध्ये त्यांच्या भाषेत गेले तेही डॉक्टरांच्यामुळे. डॉक्टर असे प्रयोगशील होते. त्यांनी साहित्य संघाचा पाचवा मजला ड्रामा स्कूलला दिला आहे. तेथे जहान माणेकशॉ हिंदी, इंग्रजी नाटकांचे प्रयोग करत असतात. कमलाकर सोनटक्के यांना बोलावून नाटकाचे प्रशिक्षण, बालनाट्याचे प्रशिक्षण, नाट्यसंगीताचे प्रशिक्षण, महाविद्यालयीन मराठी साहित्य महामंडळाचे काम… हे सगळे सगळे बाळ भालेराव यांच्या सम्यक दृष्टीचे आणि चिंतनाचे फलित आहे.

राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार स्वीकारताना डॉ. बाळ भालेराव

डॉ. बाळ भालेराव यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार लाभला. त्यांना अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही लाभले. अशा सन्मानप्रसंगीच डॉक्टर मंचावर बसायचे. ते एरवी कोठल्याही समारंभाला प्रेक्षकांच्या सहाव्या रांगेतील खुर्चीत, दुरून पाखर घालावी त्याप्रमाणे. शेवटी शेवटी ते आय.सी.यु.त असतानाही त्यांना ध्यास होता तो साहित्य संघाच्या कार्याचा, म्हणूनच 21 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांचा देह अनंतात विलीन झाला तरी साहित्य संघाशी जडलेली त्यांची चित्शक्ती अमर आहे. बाळ भालेराव यांचे बळ मोठेच. बा.भ. बोरकर यांच्या कवितेच्या शेवटच्या ओळींचा आधार घ्यावासा वाटतो.

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा

 

अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा

(साहित्य त्रैमासिकावरून उद्धृत, संस्कारित)

सुहासिनी कीर्तिकर 9820256976 vaijayanti.kirtikar@gmail.com

सुहासिनी किर्तीकर या ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या ‘अक्षरदालन’ या उपक्रमाच्या प्रमुख आहेत. त्यांनी अडतीस वर्षे विविध महाविद्यालयांत मराठीचे अध्यापन केले. त्या उपप्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत या विषयांत एम ए केले. त्या सरदार अली जाफरी यांच्याकडे उर्दू शिकल्या. त्यांचे लेखन विविध मासिकांत, वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले आहे. त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून एकलव्य पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

——————————————————————————————————————————————————

 

 

About Post Author

3 COMMENTS

  1. हि कल्पनाच वेगळी व आकर्षित करणारी आहे ती किती उत्साहाने साकारली असेल त्या प्रतिभावंत पत्रकार कलावंत यांना रसिक प्रेक्षक म्हणून सलाम च…..

  2. खूप सुंदर महितीपूर्व लेख आहे माझा जन्म नानाचौकात ला पूर्वी १/२/३रुपये दर असणारी तिकितात नाटके पाहिली आहे साहित्य संघ आणि डॉ भालेराव यांचे महत कार्य या लेखातून अनुभवता आले.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here