बसोली आणि चंद्रकांत चन्‍ने

8
63

चंद्रकांत चन्‍नेमुलांच्‍या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्‍स! मग ते १५ ऑगस्टचे व २६ जानेवारीचे भाषण असो, सामुहिक गायनवृंदातला सहभाग असो वा शाळेच्या हस्तलिखितात लिहिलेली कथा-कविता असो. त्याचा ‘प्रकाशक’ म्हणून यादगार ठरतो तो शिक्षकच. नागपुरचे चित्रकार आणि शिक्षक चंद्रकांत चन्ने हे असेच एक कलंदर व्यक्तिमत्त्व आहे.

चंद्रकांत चन्ने बसोली या चळवळीच्‍या माध्यमातून गेल्या छत्तीस वर्षांपासून लहान मुलांच्‍या कलागुणांना हळुवार फुंकर घालत त्या कळ्या उमलवण्‍यात रममाण झाले आहेत. त्यांचे विद्यार्थ्यांच्या हृदयातील अढळ स्थान आणि सोबतच पालक- पाल्यांना मान्य असलेले श्रेय ही तिन्ही घटकांच्या मर्मबंधातील अबाधित ठेव आहे. बसोली ह्या चन्ने यांच्या चळवळीच्या काहीशा अपरिचित नावामागे एक प्रेरणा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या त्या नावाच्या दुर्गम गावाने कलासंस्कृतीतील भारतीयत्व एकलव्याच्या निष्ठेने अंगिकारले आणि जोपासले आहे. बसोली ही तेथील लघु चित्रशैली. मोगलांनी राजपुतांचा पराभव केल्यानंतर परागंदांना ज्या गावांनी आश्रय दिला त्यांपैकी बसोली हे एक. त्या पराभूतांनी ती चित्रदुनिया साकारली आणि त्यांचा स्‍वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवला.

चन्ने यांनी नागपुरात बसोली ‘वसवून’ त्याच चिकाटीने त्यांच्या बालसदस्यांमध्ये कलासक्ती रुजवली आणि फुलवली.

लाल कावळा पिवळा राघू, बंधन नाही कशाचे;
काढू फांद्या जमिनिलागून, आकाशाला मुळे,
आम्ही बसोलीची मुले.

बसोलीचे जग त्यांच्या ह्या गीताप्रमाणेच आहे – मुक्त आणि दिलखुलास! रंग-रेखा,आकृती-बंध ह्यांची चाकोरी उल्लंघून पिवळा राघू-हिरवी मैना चितारण्याची मुभा बसोलीत आहे. तेथे लहान मुलांना त्यांच्या भावविश्वनुरूप व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांचे अंगीभूत कसब, त्यांचा आत्मविश्वास बहरण्यास हातभार लागतो. निरागस प्रामाणिकपणे रेखाटलेल्या त्यांच्या अस्सल कलाकृती विविध प्रदर्शनांतून जाणकारांचे लक्ष वेधतात. त्यांना मिळणारी बक्षिसे-पारितोषिके त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातील आत्मविश्वास दुणावतात आणि अधिक समृद्ध झालेल्या त्या कलाकृती आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातदेखील वाहवा मिळवून जातात. मुलांनी जे रेखाटले आहे ते अधिक उठावदार कसे होईल एवढ्यापुरते चन्नेसरांचे मार्गदर्शन असते.

चंद्रकांत चन्‍ने ह्यांचा जन्म ५ जून १९४९ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे झाला. त्यांच्या चित्रकलेची सुरुवात दिवाळीत अंगणात लक्ष्मी, गुढीपाडव्याला रथारूढ सूर्यदेवता चितारण्यापासून झाली. घराची परिस्थिती बेताची, त्यामुळे मुलाने पारंपरिक शिक्षण घेत प्रपंचाचा डोलारा सावरण्यास मदत करावी ही घरच्यांची अपेक्षा होती. मात्र चंद्रकांतला चित्रकलेची ओढ स्वस्थ बसू देईना. तो घर सोडून, नागपूरला येऊन तेथील चित्रकला महाविद्यालयातून BFA ही पदवी प्रथम क्रमांकाने पास झाला. कॉलेजमधून पास आऊट होणारी ती पहिली तुकडी. त्यानंतर चंद्रकांतने बडोदा, शांतीनिकेतन येथून history of arts ही स्नातकोत्तर पदवी घेतली. त्यादरम्यान त्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सहवास लाभला, नवीन उर्मी जागृत झाल्या आणि त्याने ख्यातनाम JJ school of  arts मध्ये प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. परंतु तेथे त्याचे संचालकांशी अनबन झाल्याने तसेच न पटणाऱ्या बाबींपुढे झुकणे त्याच्या स्वभावात नसल्याने त्याचे जे.जे. सुटले व त्याने नागपुरात पंडित बच्छराज व्यास विद्यालयात drawing teacher म्हणून तीस वर्षे नोकरी केली. लक्षावधी मुलांना कलाप्रवृत्त करण्यासाठी बसोली चळवळ सुरू करण्यास त्याची मुलांशी असलेली जवळीक प्रभावी ठरली.

चन्ने ह्यांनी ‘मुलांची भाषा’ हा विषय Ph.D. साठी निवडला होता. त्यांचे शांतिनिकेतनमधील गुरू निहार रंजन रे ह्यांनी child art ह्या विषयातील प्रत्याक्षानुभव घेण्याची आज्ञा दिली होती. त्यातून बसोलीची मुहूर्तमेढ १५ मे १९७५ रोजी रोवली गेली. बसोली दिसामासाने बाळसे धरत गेली, बहरत गेली. चार भिंती अपुऱ्या पडू लागल्या. शेकडो बालकलाकारांची गजबज ही चळवळ समृद्ध करत गेली.

बसोलीची निवासी शिबिरे १९९४ पासून घेण्यात येऊ लागली. मात्र तेथे चित्रकला शिकवली जात नाही. जे हवे जसे हवे तसे चित्र. मुलांना जपा, त्यांना वेळ द्या आणि त्यांच्यावर आपली मते लादू नका, ह्या कळकळीपोटी चन्ने गेली वीस वर्षें लहान मुलांसाठी ही निवासी शिबिरे भरवत आहेत. तेथे मुलांच्या हाती खोडरबर दिला जात नाही. बसोलीच्या सदस्यत्वाची तिसरी पिढी ‘बसोली’चा अभिमान बाळगून आहे. नागपूर किंवा आसपासच नव्हे; तर अहेरी, आलापल्ली सारख्या दुर्गम आदिवासी भागापासून जपान, कोरिया आणि अगदी लंडनपर्यंत बसोलीविषयी आत्मीयता विखुरली आहे. बसोलीचा सदस्य होण्यासाठी तीन ते चौदा वयोगटातील असण्यापलीकडे कसलीही अट नाही, प्रवेश फी नाही. चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे नाही. आवड असल्यास सोयीचे. ‘ज्याला चालता येते तो आम्हाला चालतो’ असे चन्ने म्हणतात. दर वर्षी केवळ १० मे ह्या एका दिवशी ही प्रवेश प्रक्रिया सुरू असते.

मुलांना विविध कार्यशाळा किंवा व्यक्तिमत्व विकास शिबिरांत धाडणे त्यांच्या आई-वडिलांना गरजेचे का वाटते हे एक कोडेच आहे. कारण त्यातून नेमके काय साधले जाते हे शिबीर संचालक, पालक किंवा शिबिरार्थी ह्यांपैकी कोणालाही ठामपणे सांगता येणार नाही. बहुधा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पाल्यास यशस्वी करण्याचा पालकांचा तो केविलवाणा अट्टाहास असावा.

बसोली वर्षातून दोन निवासी शिबिरे भरवते. वेळापत्रक झुगारून मनमोकळ्या वातावरणात मुलांच्या अंगाच्या कलागुणांची स्वैर परंतु समृद्ध अभिव्यक्ती बघून प्रत्येक पालक मनोमनी सुखावतो. निवासी शिबिरांव्यातिरिक्त बसोली अनेक सामाजिक वैगुण्यांवर, समस्यांवर चित्रकृतींच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. त्यात पाणी वाचवा, स्त्री -भ्रूणहत्या विरोध, पर्यावरण संवर्धन असे ज्वलंत विषय प्रभावीपणे हाताळले आहेत. नागपुरात भरलेल्या ऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधून मुक्तिबोधांपासून महानोरांपर्यंतच्या कवितांवरील रेखाटने संमेलनस्थळी प्रदर्शित केली गेली, तेव्हा चन्ने यांची मोहीम लोकांच्या विशेष लक्षात आली. मुलांची कविता चित्रे अगदी कवी ग्रेससहित मान्यवर जाणकार साहित्यिकांची वाहवा मिळवून गेली. नागपुरातील पत्रकार सहनिवासाच्या परिसरातील तटीय भिंतीवर १२५×१० फुटांचे अवाढव्य म्युरल सलग शंभर दिवसांच्या परिश्रमाने ह्या चिमुकल्यांनी साकारले.

thinkslideshow

ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्‍ट्रपती असताना त्यांच्या कवितांवर काव्यचित्रे त्यांना पेश केली होती. विस्मयचकित महामहिमांनी ती चित्रे मागवून घेतली व राष्ट्रपती भवनात सुंदर चौकटीत आभूषित केली. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या सव्वाशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या गीतांजलीवर बसोली बालकांनी रंगचित्रे रेखून समर्पक चित्रांजली वाहिली होती.

अशा उपक्रमांत मुलांनी रेखाटलेल्या कलाकृती पाहून कवितेतील विषय किंवा आशय कितपत उमजलेला आहे हा प्रश्न  कुणाला पडत असेलही. मात्र ते गरजेचे आहे असे न तर त्या बालकलाकारांना वाटत न त्यांच्या चन्नेसरांना. कारण कवितेतील एखादा शब्द, काव्यपंक्ती किंवा भावलेला अर्थ ह्याला धरून ते रेखाटन असते. त्यातील आशय शोधण्यापेक्षा त्या वयात येणाऱ्या अबोध, निष्कपट जाणिवांचे ते प्रकटीकरण असते हेच त्यातील मर्म आहे.

चित्रकलेसोबत मुलांमधील अभिनय-गायन नैपुण्यदेखील वाखाणण्यासारखे आहे. खुद्द शांतिनिकेतनात बसोलीकरांनी रवींद्र संगीतावरील कार्यक्रम सादर केला होता. पु ल देशपांडे यांनी बसवलेल्या, चाल न दिलेल्या संगीताचे देखणे सादरीकरण बघून पु ल देखील पुलकित झाले असते.

चंद्रकांत चन्ने मुळात चित्रकार आहेत. त्यांनी त्यांच्या सहाध्यायांच्या, सुहृदांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा सक्रिय होत हाती कुंचला धरला आणि चित्रकलेतील त्यांचे कसब सिद्ध केले. त्यांच्या चित्रांनी देशपरदेशातील प्रदर्शनांत प्रशंसा आणि मोल मिळवले आहे.

नागपुरातील एक रसिक, दिलदार आणि लक्ष्मीचा वरदहस्त असलेले धनिक श्रीमान भैय्यासाहेब मुंडले ह्यांनी ‘सिस्फा’ ह्या संस्थेची स्थापना केली. चन्ने त्या प्रकल्पाशी मूळ उद्दिष्टापासून निगडित आहेत. शांतिनिकेतनच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या अंगीभूत क्षमतांचे संवर्धन व्हावे ह्यासाठी अक्षरशः अहोरात्र जागत असतात. चन्ने प. बच्छराज व्यास विद्यालयातून निवृत्त झाल्यापासून ‘सिस्फा’चे अधिष्ठातापद सांभाळून आहेत. स्थानिक होतकरू कलावंत, तसेच आपल्यातील ह्या अंगाचा विसर पडलेल्या अनेक शासकीय नोकरदारांना उद्युक्त करून त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी नागपुरातील मध्यवर्ती भागात ‘सिस्फा की छोटी ग्यालरी’ नावाने कलादालन उपलब्ध करून दिले आहे. नागपूरकरांची कलासक्ती जागृत ठेवण्यात चन्ने ह्यांचे योगदान मोलाचे आहे.

नावारूपाला आलेले अनेक कलाकार घडवण्यात बसोलीचे मोलाचे योगदान आहे. ती मंडळी कृतज्ञतेने ते ऋण मानतात. ‘थ्री इडियट्स’सह अनेक चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर असणारे रजनीश हेडाऊ, टाईम प्लिज-कॅम्पस कट्टाचे साऊंड इजिनीयर स्वरूप जोशी, लता मंगेशकर, हरिहरन यांसारख्या दिग्गज गायकांसोबत गाण्याची संधी लाभलेला राजेश धाब्रे, नेपथ्यकार संजय काशीकर, अभिनेता मुकुंद वसुले, ग्राफिक डिझायनर विवेक रानडे, एरो मोडेलिंग इन्‍स्‍ट्रक्‍टर राजेश जोशी, शिल्‍पकर्ती हिमांशू खोरगडे, branding professional महेंद्र पेंढारकर, ‘काय द्याचं बोला’-‘दुसरी गोष्ट’ यांसारख्या बहुचर्चित सिनेमांचा सहाय्यक दिग्दर्शक अभिजित गुरू हे सारे कलावंत बसोलीने घडवले आहेत. बसोलीच्या नावाने थ्री इडियट्स चित्रपटासाठी लेह-लडाख मधील लहान मुलांसाठी शिबीर सुद्धा घेण्यात आले होते. लंडनच्या केन्सिंग्टन चिल्ड्रेन सेंटर मध्ये २००० ते २००६ दरम्यान चार शिबिरे पार पडली. मार्गदर्शक अर्थातच चंद्रकांत चन्ने होते.

गेली चाळीस वर्षे बसोली नावाचे चन्ने ह्यांनी उभारलेले, साकारलेले जग उत्तरोत्तर रंगत, विस्तारत गेले आहे.

जागेपणी स्वप्न बघणाऱ्यांना ती साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अहोरात्र करावी लागते. तशा व्‍यक्‍तींची उदाहरणे देताना चंद्रकांत चन्‍ने यांचे नाव आवर्जून घ्‍यावे लागेल.

चंद्रकांत चन्ने
८६-अ निर्माण एन्क्लेव, फ़्लट क्र. १०३,
गजानन नगर,वर्धा रोड ,नागपूर ४४००१५
९८२३१५९८७-६८९८०९१३२०
chandrakantchanne@gmail.com

अशोक जोशी
९८६००६०२१२
avj3012@rediffmail.com

About Post Author

8 COMMENTS

  1. मी बसोली मध्ये असण्याचा मला
    मी बसोलीमध्ये असण्याचा मला अभिमान आहे.

  2. आमच्या सारखं्या माती ला आकार
    आमच्यासारख्‍या मातीला आकार देणारे चन्ने सर!

  3. कलाकारी हि कलाकारांसाठी केवळ
    कलाकारी ही कलाकारांसाठी केवळ मनोभाव व्यक्त करण्याचे अथवा जीवनाच्या दिशादर्शक वाटा दाखविण्याचे किवा विविधांगी पैलू व्यक्त करण्याचे केवळ स्वदिग्दर्षित माध्यम नाही. कलाकारीतेच्या मर्यादा त्याहूनही अधिक प्रगल्भ आहेत. सर्वांनी त्या नव्याने शोधण्याची गरज आहे.
    कलाकाराची कला अधिक अधिक प्रगल्भ होत जाते न जाते तोच त्याला निवी क्षितिजे नवे आयाम ,नवे पैलू,..सारं काही पुन्हा नव्या रुपात दिसण्याची तंद्री लागते. काळ पुढे पुढे सरकत जातो. सामान्य व्यक्तीला ते आकलन कठीण जाते. पण कलाकारच्या नजरेतून ते सर्वांनी बघणे आता काळाची गरज आहे.
    तेव्हाच त्याने कलेतून वेचलेल्या त्याच्या आयुष्याचा अर्थ आपल्याला, सर्वाना थोडा उशिरा का होईना उमगायला लागलाय हे समाधान कदाचित मिळू शकेल. हा अट्टाहास नाहीये, पण प्रयत्न करावा.
    त्या बसोलीच्या कलाकारास वंदन.

Comments are closed.