प्रल्हाद पाटील-कराड – प्रगतशील शेतकरी

4
45
carasole

प्रल्हाददादांची ओळख ही ‘एक प्रगतशील शेतकरी’ म्हणून आहे. प्रल्हाददादांचा (प्रल्हाद नामदेव पाटील) जन्म २७ फेब्रुवारी १९३० रोजी जळगाव, तालुका निफाड येथे शेतकरी कुटुंबात झाला. स्वातंत्र्यलढ्याला उठाव आला होता. प्रल्हाददादा लहान वयात १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीकडे आकृष्ट झाले, ते ‘राष्ट्र सेवा दला’चे सैनिक म्हणून समतेचे पोवाडे गाऊ लागले. त्यांनी प्रभातफेऱ्या, सेवादलाची शिबिरे यांत सहभागी होऊन नवनिर्माणाची आस, अन्यायाविरूद्ध उभे राहण्याची उर्मी व्यक्त केली. त्यांच्या त्या सहभागाचा परिणाम शालेय शिक्षणावर झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी चौथीपर्यंत झाले. ते तेथेच थांबले. शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात याची त्यांना जाणीव होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रल्हाददादा समाजवादी पक्षात गेले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्या वेळेस त्यांनी एक महिन्याची कारावासाची शिक्षाही भोगली.

प्रल्हाददादा निफाड तालुका डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष १९५६ ते १९६५ या कालावधीत होते, तर जिल्हा परिषद सदस्य १९६२ ते १९७२ या काळात होते. त्यांनी ‘जिल्हा मध्यवर्ती बँके’चे संचालकपद भूषवले आहे आणि ते ‘शासकीय इरिगेशन कमिटी’चे सदस्यही होते.

गावातच दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे या भावनेने प्रल्हाददादा तसेच गावातील इतर समविचारी लोक – अॅड. लक्ष्मणराव उगावकर, शांतिलाल सोनी, रघुनाथपंत जोशी, चंपालाल राठी, कमलाकर नांदे, बा.य. परीट, पंडितराव कापसे, वि.दा. व्यवहारे या सर्वांच्या धडपडीतून १९६२ साली गावात आणखी एक माध्यमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. शिक्षणखात्याकडून त्यास मान्यता मिळाली.

न्या. महादेव गोविंद रानडे यांचे नवभारताच्या जडणघडणीतील असाधारण योगदान व त्यांचा जन्म निफाडचाच म्हणून त्यांचे नाव नव्या संस्थेला देण्याचा निर्णय झाला. ‘न्या. रानडे शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेचे ‘वैनतेय विद्यालय’ सुरू झाले. ‘वैनतेय’चा अर्थ गरुड, तसेच निफाड गावातील ‘विनिता’ नदीचा पुत्र ! ती शाळा उभी करताना जमीन सारखी करणे, साफ करणे अशी कामेही प्रल्हाददादांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. प्रल्हाददादांनी ते ‘निफाड साखर सहकारी कारखान्या’चे चेअरमन असताना, शेतक-यांचा काही पैसा सामाजिक कामासाठी वापरला. मात्र शेतक-यांचे सर्व पैसे त्यांच्या हातात देण्याऐवजी काही रक्कमच त्यांना दिली. त्यांच्या आर्थिक विवंचनेच्या विचारातून सामाजिक बांधिलकी जपण्याचाच तो प्रयत्न म्हणावा लागेल.

प्रल्हाददादा कादवा आणि गोदावरी या नद्यांच्या काठावर, मध्यभागी वसलेल्या गावाचे रहिवासी. त्यामुळे त्यांनी मोठ्या नदीतीरावर राहणा-या जनतेचे हाल पाहिले होते. नाशिकऔरंगाबाद रस्त्यावर, निफाडजवळ पूल असावा यासाठी, प्रल्हाददादांनी प्रयत्न चालू केले व पूल मंजूरही करवून घेतला. प्रल्हाददादांच्या कारकिर्दीत आणखी तीन पुलांचे बांधकाम झाले. कंजगाव-कोठोरे पूल, दारणा-संघवी पूल आणि खळस-पिंपळी पूल. हे बांधकाम शेतक-यांच्या सहभागाने झालेले आहे.

त्याच सुमारास रौळस आणि पिंपरी दरम्यान कादवा नदीवरील पूल बांधला गेला. तसेच, गोदावरी नदीवरील दारणासंगवी येथील फरशीही बांधली गेली. पिंपळगाव-निपाणी-तळवाडे या गावांसाठी जलसिंचन योजना राबवून माळरानावर शेती पिकवण्याचे स्वप्न, प्रल्हाददादांनी प्रत्यक्षात आणले.

शेतकरी संघटनेचा जन्म होण्यापूर्वी दादांनी निफाड तालुक्यातील लहान-मोठे शेतक-यांचे मेळावे घेतले. भारतातील पहिल्या कृषी संशोधन केंद्राची स्थापना १९६२ नंतर निफाड तालुक्यात करण्यात आली होती, तीही प्रल्हाददादांच्या कारकिर्दीत.

हरितक्रांतीचे जनक ख्यातनाम गहू संशोधक डॉ. नॉरमन बोरलॉग यांनी गव्हाच्या अनेक जाती विकसित केल्या असून, त्यावरील तांबेरा रोगावर संशोधन केले आहे. त्या कामासाठी त्यांनी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या. त्यांनी १९७४ साली कुंदेवाडी (तालुका निफाड) येथील गहू संशोधन केंद्रास भेट दिली होती. ते जळगाव (तालुका निफाड) येथील प्रल्हाददादांच्या शेतावरही गेले होते. डॉ. बोरलॉग यांनी तांबेरा रोग प्रतिबंधक व उत्पादनक्षम जी बियाणी शोधली, त्यांचा प्रयोग सर्वांत प्रथम प्रल्हाददादा यांनी त्यांच्या शेतात केला. भरपूर उत्पादन घेऊन, ती बियाणी महाराष्ट्रातील इतर शेतक-यांना देऊन, त्यांचा प्रसारही केला. पूर्वी एकरी दोन पोती गव्हाचे उत्पादन मिळायचे ते डॉ. बोरलॉग यांच्या संशोधनामुळे एकरी वीस पोत्यांवर गेले.

जगातील सार्क देशांच्या गहू संशोधकांनी २८ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रल्हाददादांच्या शेताला भेट दिली. झांबियाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळानेसुद्धा प्रल्हाददादांच्या शेतीला भेट देऊन सर्व पिकांची माहिती घेतली.

प्रल्हाददादांच्या मते देशाचे धोरण हे शेतीशी निगडित असायला हवे. दादांनी इंग्रजांचा काळ पाहिला आहे, अनुभवला आहे. त्यांच्या काळात शेतक-यांना त्रास नव्हता असे मत दादांनी व्यक्त केले. प्रल्हाददादांना ऐतिहासिक व संत साहित्य यांची आवड आहे.

– पद्मा कऱ्हाडे

About Post Author

4 COMMENTS

  1. छान! प्रल्हाद पाटिल कराड
    छान! प्रल्हाद पाटिल कराड यांचे प्रत्येक काम समाजभिमुख आणि सर्जनशील आहे. आम्ही त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. कर्तृत्वला सलाम!

  2. It feels really very proud of
    It feels really very proud of him a great outstanding personality hat’s off to his social work for surrounding people always

  3. भारतातील पहिल्या कृषी संशोधन…
    भारतातील पहिल्या कृषी संशोधन केंद्राची स्थापना प्रल्हाददादांच्या कारकिर्दीत निफाड तालुक्यात करण्यात आली. ही गोष्ट आम्हा निफाडकर अभिमानाने सांगतो निफाडवासियांची कितीतरी स्वप्न प्रल्हाददादांनी प्रत्यक्षात आणले…

  4. It feels really very proud…
    It feels really very proud of him a great outstanding personality hat’s off to his social work

Comments are closed.