पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस

0
18

खोटेपणा अनकव्हर करण्यापेक्षा कव्हर करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं.

खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच काय ते कुठल्याही कव्हरशिवाय पडून असलेलं वास्तव.


पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस आणि राकेश

– अवधूत डोंगरे

पिपली लाईव्ह – उत्तर भारतातल्या पिपली गावातला एक शेतकरी नि त्याचा मोठा भाऊ, छोट्या भावाची गरिबीला करवादलेली बायको, मुलं आणि घरातली एक म्हातारी, असं कुटुंब. गहाण टाकलेली जमीन कर्ज न फेडल्याने हातची जाणार, या भीतीनं ग्रस्त असलेलं हे कुटुंब. आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या कुटुंबाला नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये मिळतात अशी माहिती कुठूनतरी मिळवून तसं काही आपल्या बाबतीत करता येईल का, असा विचार हे दोघं भाऊ करत असतात. देशी दारूचा रोजचा डोस मारून घरी परत येत असताना एकदा या दोघांच्या बोलण्यातून बातमी पसरते, की छोटा भाऊ (म्हणजे नाथा) आत्महत्या करणार ! बातमी पसरते ती अगदी इंग्रजी वृत्तवाहिन्यांपर्यंत. मग सगळ्या माध्यमांचा गदारोळ पिपलीमध्ये उतरतो. नाथाच्या हगण्यामुतण्यापासून त्याच्या बकरीपर्यंत सगळ्यांच्या बातम्या बनतात. शेवटी, नाथा गायब होतो. माध्यमांच्या दृष्टीने तो मरतो. अशी एकूण कथा.

शेतक-यांच्या आत्महत्या, भारतातली शेतीची एकूण अवस्था, मूळ मुद्दा सोडून इतर सर्व मनोरंजक चाळे करणारी माध्यमं. अशा सगळ्या गोष्टींना गुंफून तयार झालेली ‘पीपली लाईव्ह’, ह्या दीड-दोन तासांच्या चित्रपटाची कथा. आपल्याला फक्त ह्या कथेच्या अनुषंगानं काहीतरी छोटंसं म्हणायचं असल्यानं चित्रपटाच्या इतर बाबींकडे जायला नको. थोडंफार विनोदी अंगानं जात गंभीर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शिकेचा आहे, एवढं लिहून हा भाग संपवू.

निळू फुलेंदिगू टिपणीस – ‘सिंहासन’ नावाचा मराठी चित्रपट १९७९ साली प्रदर्शित झाला. अरुण साधूंच्या ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ ह्या दोन कादंब-यांवर आधारित विजय तेंडुलकरांची पटकथा. बाकी दिग्दर्शक नि कलाकार अशी सगळी मातब्बर मंडळी. राजकारणावर भाष्य करणारा त्या काळी गाजलेला हा चित्रपट. कथेच्या तपशिलात न जाता सांगण्याचा मुद्दा एवढाच, की राजकारण नि एकूण सामाजिक स्तर नि भंपकपणा पाहून या चित्रपटातील एक पात्र मानसिक संतुलन हरवून बसतं नि हसत सुटतं. हे पात्र मध्यवर्ती आहे. दिगू टिपणीस नावाच्या पत्रकाराचं. निळू फुलेंनी उभा केलेला दिगू टिपणीस सगळ्या जगाकडे बघत हसत सुटतो नि पिक्चर संपतो.

पिपली लाईव्हमधील एक दृश्यसामोरील 'राकेश'राकेश – ‘पिपली लाईव्ह’मध्ये आहे तो राकेश नावाचा छोट्या हिंदी दैनिकातला पत्रकार. महानगरी माध्यमांच्या मुजोर भपक्यापासून दूर असलेला. नाथाचा आत्महत्येचा निर्णय आपल्या लेखातून पहिल्यांदा जगापुढे आणणारा. प्रामाणिकपणे ‘खरी’ पत्रकारिता करण्याची इच्छा असणारा राकेश. त्याच्या लेखाने माजलेला गदारोळ ऐकत ऐकत इंग्रजी-हिंदी वृत्तवाहिन्या पिपलीमध्ये पोचतात. त्यांच्या सोयीने प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अशी स्टोरी कव्हर करतात.

ह्या जर्नालिस्टांबरोबर वावरताना राकेश अंतर्मुख होत जातो. नाथाची स्टोरी रंगवण्यात गुंतलेल्या माध्यमांना जमीन खणता खणता मेलेला दुसरा, त्याच गावातला शेतकरी हा साध्या बातमीचाही विषय का वाटत नाही? असा साधासरळ प्रश्न त्याला पडतो. हा प्रश्न तो इंग्रजी जर्नालिस्ट मॅडमला विचारतो. ती त्याला त्याच्या प्रश्नातला ‘अव्यावहारिक भाबडेपणा’ स्पष्ट करून तिचा स्वत:चा शार्पनेस दाखवून देते.

नाथाला एका ठिकाणी लपवून ठेवण्यात आलं आहे. तिथं माध्यमांपासून गावगल्लीतल्या राजकारण्यांपर्यंत सर्व जण आपापली पोळी भाजून घ्यायला मौजूद असतात. आणि उडतो गोंधळ. त्या गोंधळात होतो स्फोट. स्फोटात एक व्यक्ती मरण पावते. माध्यमांच्या, राजकारण्यांच्या नि गावक-यांच्यात पसरते ती बातमी नाथा मेल्याची. पण खरा मरतो तो राकेश.

खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं.

खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच काय ते कुठल्याही कव्हरशिवाय पडून असलेलं वास्तव.

– अवधूत डोंगरे
भ्रमणध्वनी
: 9421229251

About Post Author

Previous article‘आयपॅड’वर मराठी पुस्तके! (Marathi Books On Ipad)
Next articleमराठीतून शिकू द्या
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.