दुर्लक्षित अवचितगड

7
85
carasole

अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. विशेषत: द्वादशकोनी तलावाच्या पाय-यांच्या बाजूची भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यात उगवलेल्या झाडांमुळे बांधकाम खचत आहे. झाडे काढली तरी धोका-न काढली तरी धोका! शंकराचे मंदिर उन, वारा, पाऊस खात आहे. देवाधिदेव महादेव उघड्यावर पडलेला आहे. वेळीच बंदोबस्त न केल्यास संपूर्ण उत्तर बुरुज ढासळण्यास वेळ लागणार नाही.

अवचितगड हा कोकण आणि देशपठार यांच्यामधोमध असल्यामुळे संदेशवहन व हेरगिरी यांच्यासाठी उपयुक्त किल्ला मानला जाई. नागोठणे बंदर, रोहे बंदर, तळा, घोसाळा या परिसरातील धारा-वसुलीचे काम अवचितगडावरून होत असे.

मौर्य, सातवाहन, शक, क्षत्रप, अभीर, त्रैकुटक, वाकाटक, अश्मक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी कदंब, शिलाहार, यादव, मोगल, मराठे, पेशवे या निरनिराळ्या राजवटींमध्ये किल्ल्यांची वहिवाट होती. इसवी सनपूर्व पाचशेेच्या आसपास सुरू झालेली किल्लेसंस्कृती पुढे उत्तरोत्तर प्रगत होत गेली ती सतराव्या शतकापर्यंत. जवळपास दोन-अडीच हजार वर्षांचा हा इतिहास आहे.

अवचितगडावर जाण्यासाठी चार-पाच वाटा आहेत. पण मुख्य वाटा दोन. त्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातात. ते पूर्वाभिमुख असून त्याच बाजूला गडाचा डोंगर आणि गडाच्या पूर्वेकडील डोंगररांग यांना जोडणारी खिंड आहे. खिंडीत येण्यासाठी मेढा किंवा पिंगळसई या गावांतून रस्ता आहे. मेढा हे गडाच्या उत्तर बुरूजाखाली तर पिंगळसई हे गडाच्या दक्षिणेकडे असलेले गाव आहे. त्याच बरोबर गडावर येण्यासाठी मेढ्यातून उत्तर बुरूजाच्या डोंगरधारेवरून येणारी वाट आहे. दक्षिणेला असलेल्या डोंगरावरून अवचितगडावर येता येते. या चार वाटा साधारण वहिवाटीच्या आहेत. पाचवी वाट ही निडी गावातून गडाच्या पश्चिम बाजूने वर येते. ती अवघड व विशेष वहिवाट नसलेली आहे.

निरनिराळ्या राजघराण्यांच्या काळात निरनिराळ्या ठिकाणी नवनवीन नागरी वस्त्या निर्माण होत गेल्या. त्यांच्या संरक्षणाच्या गरजेतून गडकिल्ल्यांचा उदय होत गेला. ज्या परिसरात वस्ती असेल तेथील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून किल्लेबांधणीचे तंत्र विकसित केले गेले. त्यातून किल्ल्यांचे प्रकार पडले. प्रामुख्याने थळदुर्ग, गिरिदुर्ग, जलदुर्ग असे तीन प्रकार आहेत. सपाट भूप्रदेशातील थळदुर्ग, दर्‍याडोंगरातील गिरिशिखरांवरील गिरिदुर्ग आणि समुद्रातील बेटांवर उभारलेले जलदुर्ग, बांधणीची शैली, गडाचा आकार यांच्यावरून अनेक किल्ल्यांचे उपप्रकारही केले जातात. कर्नल प्रॉथर या इंग्रज अधिका-याने १८१८ च्या आसपास महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले तोफांचा भडिमार करून उध्वस्त केले.

गडावर पोचण्यासाठी रोह्यातून पिंगळसईमार्गे साधारणपणे दोन ते अडीच तास लागतात. त्यातील अर्धा-पाऊण तास रोह्यातून पिंगळसईत जाण्यास लागतो. पुढे दीड ते दोन तास गडावर चढण्यासाठी लागतात. त्या मार्गे शारीरिक श्रम जास्त लागतात. त्या मानाने मेढामार्गे गेल्यास श्रम व वेळ, दोन्हीची बचत होते.

गडावर दरवर्षी काही गोष्टी नेमाने होतात. मेढा ग्रामपंचायतीतर्फे १५ ऑगस्टला व २६ जानेवारीला झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. गडावर असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी काही भाविक मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी येतात. गडावर येणा-यांची विशेष वर्दळ असते मकर संक्रांतीच्या दिवशी. पिंगळसई, मेढा, निडी, पडम, खारापटी या गावांतील रहिवासी मोठ्या संख्येने गडावर येतात.

ऐतिहासिक वास्तूंचे जतन आपणच करायचे असते हे लोकांच्या मनात उतरवण्याचे कार्य गेली काही वर्षे रोह्यातील दुर्गप्रेमी सुखद राणे करत आहेत. राणे व त्यांचे सहकारी संक्रांतीच्या दिवशी गडावर येतात व गडावर येणा-या इतर लोकांना गडाचे महत्त्व पटवून देतात. गडाची आवश्यकता लोकांना समजावून सांगतात. त्याच्या रक्षणाचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे पटवून देतात.

गडाच्या पूर्वेस गडाला लागून जी डोंगररांग सुरू होते ती पालीपर्यंत पोचली आहे. डोंगररांगेवर सुकेळी खिंड, वरदाईनी खिंड, वरदाईनी देवस्थान व धबधबा, तसेच घेरासूरगड हा किल्ला आहे. अवचितगडाच्या पूर्वेकडे पाहिल्यास, हत्तीचे मस्तक- बाजूने पाहिल्यास जसे दिसते तशा आकाराचा डोंगर दिसतो. तो घेरासूरगड. गडाच्या पायथ्याशी वैजनाथ, खांब ही गावे आहेत. वैजनाथच्या शेजारून जाणारी कुंडलिका नदी, कोलाड परिसर अगदी स्पष्ट नजरेस पडतात. वातावरण स्वच्छ असेल तर परिसराच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीची रांग दिसते. तसेच, त्या रांगेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे बघताना अनुक्रमे लोणावळ्याजवळील आय.एन.एस.शिवाजी परिसर, उंबरखिंड परिसर, घनगड, कोरीगड, तेलबैला, सुधागड परिसर, भिरा पॉवर हाऊस परिसर स्पष्ट दिसतात. त्यापुढे दक्षिणेकडे गेलेली सह्याद्री रांग ही कुंडलिका नदीच्या पलीकडे असलेल्या डोंगररांगांमुळे दिसत नाही.

गडाच्या पूर्वेकडची डोंगररांग व कुंडलिका नदी यांच्यामध्ये रोहा शहर व धाटाव औद्योगिक परिसर वसलेली आहेत. रोहे शहराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरांमध्ये हनुमान मंदिर आहे. तसेच सर्वात उंच भाग कळसगिरी आहे. लांडर धबधबा, बारशेतजवळील वाघाचा टेप इत्यादी ठिकाणे आहेत. वाघाचे टेप या ठिकाणावरून अवचितगड व रायगड, दोन्ही नजरेस पडतात. अवचितगडावरून वाघाच्या टेपमार्गे रायगडावर सांकेतिक संदेश पाठवला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडाच्या दक्षिणेस असलेला डोंग़र पडम गावापर्यंत उतरत जातो. तो रस्ता कुंडलिकेच्या किना-यापर्यंत आलेला आहे. समुद्रमार्गे आलेला माल रेवदंडामार्गे खाडीतून रोह्यापर्यंत छोट्या पडावांमधून येत असे, रोहा हे एकेकाळी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. खाडीमधून होणार्‍या जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम गडाच्या दक्षिण बुरूजावरून होत असे. गडाच्या दक्षिणेस कुंडलिका नदीच्या पलीकडे असलेल्या टेकड्यांवर वराठी, तांबडी, घोसाळे ही गावे आहेत. छोट्यामोठ्या टेकड्यांमुळे त्या परिसरातील घोसाळगड व तळेगड येथून दिसत नाहीत.

गडाच्या पश्चिमेस पायथ्याला निडी गाव, पुढे भातसई, शेणवई ही गावे आहेत. कुंडलिका खाडीचा मावळतीपर्यंतचा परिसर स्पष्ट दिसतो. खाडीतून होणा-या वाहतुकीचे व्यवस्थित निरीक्षण करता येते. अवचितगडावरून दिसणा-या पश्चिमेकडील प्रदेशात चणे-याजवळील भवानीगड दिसतो. तसेच क्षितिजावर रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, अलिबाग हा अष्टागराचा परिसर आहे. अवचितगडाच्या उत्तरेस, पायथ्याला मेढा गाव आहे. पुढे दिसणा-या डोंगररांगेवर भिसे खिंड व त्या पलीकडे नागोठणे व अंबा नदीचे खोरे आहे. हे ठिकाण एवढ्या मोठ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासारखे असल्यामुळे पेशवेकाळात घोसाळा ते पाली-सुधागडपर्यंतच्या महसूल-वसुलीचे काम अवचितगडावरून होत असे. हा परिसर अवचितगड महाल म्हणून ओळखला जात असे.

गडाचे प्रवेशद्वार, बालेकिल्ल्याच्या कमानी या काळ्या पाषाणातील असून सुबक व मापात दगड तासून, भार देऊन एकमेकांवर बसवलेले आहेत. बांधकामात फार थोड्या ठिकाणी, विशेषत: उत्तर बुरुजाच्या बांधणीत चुनखडीचा वापर सांधे भरण्यासाठी केलेला आहे. गडावरील तटबंदी, पाण्याची टाकी, मंदिर, वाडे हे सर्व बांधकाम ज्या पाषाणात केले आहे तो गडावरचाच आहे. गडावरील सात टाकी समूह व द्वादशकोनी तलाव यांच्या खोदाईमधून निघालेले चिरे बांधकामासाठी वापरले गेले आहेत. उत्तर बुरूज, दक्षिण बुरूज, बालेकिल्ला व प्रवेशद्वार यांच्या कमानी द्वादशकोनी, तलाव-वाड्यांचे चौथरे यांच्यासाठी वापरले गेलेले चिरे हे सुबक आकारातले व सफाईदारपणे तासलेले आहेत. इतर तटबंदीसाठी मात्र चिरे विशेष तासकाम न करता वापरले गेले आहेत. तटबंदीच्या चि-यांमधील सांधे भरण्यासाठी बारीक बारीक दगडी कपच्या वापरलेल्या आहेत. एकूण गडाची बांधकामशैली ही गरजेपुरते काम या तत्त्वाची आहे. कमीत कमी वेळ आणि पैसा खर्च करून उभारणी झालेला किल्ला याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवचितगड.

अवचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वृषभ शिल्प आहे. शिलाहारांचे ते प्रतीक म्हणजे साधारण त्या काळापासून गडावर वहिवाट असल्याचा तो पुरावा मानतात. अवचितगडाच्या इतिहासात मात्र सतराव्या शतकापासूनचे उल्लेख सापडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत गड नगरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याने तो १६५८ साली आदिलशहाकडून जिंकून घेतला. चौल-रेवदंड्याचे पोर्तुगीज; तसेच तळे-घोसाळ्यापासून नागोठणे खाडीपर्यंतच्या परिसरावर ठेवता येणारे लक्ष या बाबी नजरेत घेऊन महंमद शेख या स्थपतीच्या देखरेखीखाली गडाची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यानंतर किल्ला कायम मराठ्यांकडे राहिला. त्याच काळात किल्ल्याची पुन्हा डागडुजी झाली असावी (दक्षिण बुरुजावरील शिलालेख). गड आडवाटेवर व आकारमानाने छोटा असल्यामुळे शत्रूचे त्‍याकडे विशेष लक्ष गेले नाही.

गडावर बाजी पासलकर नावाच्या सरदाराची वहिवाट होती. गडावरील सात टाक्यांच्या समुहाजवळ एका स्तंभावर वीरासन घातलेल्या, हातात तलवार व ढाल घेतलेल्या पुरुषाचे शिल्प आहे. तो बाजी पासलकरांचा स्तंभ म्हणून ओळखला जातो. काही लोक त्याला म्हसोबाचे ठिकाणही म्हणतात. शेणवई, धाटाव या गावांमधील पाशीलकर मंडळी बाजी पासलकरांचे वंशज असल्याचे मानले जाते.

पुढे पेशव्यांच्या काळात गडावर पुन्हा बांधकाम झाले. तसा शिलालेख गडाच्या दक्षिण बुरूजावर आहे. शिलालेख पुढीलप्रमाणे आहे:

श्री गणेशाय नम:

श्री बापदेव शके १७१८

नल नाम संवत्सरे

चैत्र शुद्ध प्रतिपदा

शके १७१८ म्हणजे इसवी सन १७९६ साल. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. त्या साली गुढीपाडव्याच्या दिवशी डागडुजी पूर्ण करून दक्षिण बुरूज वापरात आला असावा.

पुढे, महाराष्ट्राच्या इतिहासाची अधोगती झाली. मराठेशाहीपाठोपाठ पेशवाई अस्ताला गेली. इंग्रजांचे प्राबल्य वाढले. नवोदित ब्रिटिश सत्ता, कुलाबकर आंग्रे व भोरचे संस्थानिक यांच्याकडील गावांची १८१८ ते १८४० दरम्यान वरच्यावर देवाणघेवाण झाली. ब्रिटिश राजवटीपूर्वी परिसर भोर संस्थानचे पंत सचिव व आंग्रे यांच्यामधे विभागला गेला होता. नागोठणे भागातील खेडी पंत सचिव व आंग्रे यांच्या मालकीची होती. तर अवचितगडमधील खेडी आंग्रे आणि पेशव्यांचे प्रतिनिधी असलेल्या ब्रिटिशांमध्ये विभागली गेली होती. भोर पंत सचिवाने १८३० मध्ये नागोठण्यामधील अर्धा भाग ब्रिटिशांना देऊन ब्रिटिशांनी आंग्रे यांच्याकडून नागोठणा भाग घेतला व त्याबदली अवचितगडाचा निम्मा भाग आंग्रे यांना दिला. देवाणघेवाणीच्या त्या कालखंडात प्रशासनाचा बोजवारा उडाला होता. महसूल-वसुली वंशपरंपरेने आलेली घराणी करत होती. ती घराणी पुढे त्या त्या गावची खोत मंडळी झाली. त्या काळात अवचितगड परिसराच्या महसूल-वसुलीचे काम त्या उपविभागातील दोन प्रभू कुटुंबे पाहात होती असा उल्लेख सापडतो.

पुढे, शे-दीडशे वर्षे घडलेल्या पारतंत्र्याच्या काळात पूर्णपणे निकामी झालेल्या अवचितगडाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत गेले. उन-वारा-पाऊस यांचा मारा सोसत असलेल्या अवचितगडाकडे नंतर लक्ष गेले ते महाराष्ट्रात १९६० च्या आसपास उदयास आलेल्या दुर्गभ्रमंती करणा-या या दुर्ग भ्रमंती कररणअगिर्यारोहकांचे. जागोजागी दुर्गप्रेमींची मंडळे तयार होऊ लागली व दुर्गदर्शनाचे संघटित कार्यक्रम होऊ लागले. दुर्गदर्शनाबरोबर दुर्गांची साफसफाई, देखभाल इत्यादी कामेही मंडळे करू लागली. त्या मंडळांपैकी ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्ट १९८९ रोजी स्थापन झालेल्या निसर्ग गिरिभ्रमण संस्थेचे अवचितगडाकडे लक्ष वेधले गेले. मी रोहे शहरात नोकरीनिमित्त १९९० साली आलो. माझ्या सोबत ‘निसर्ग गिरिभ्रमण’चे कार्यही आले. दुर्गप्रेमाने भारावलेल्या तरूणांची रोहे शहरात संख्या वाढू लागली. त्यातून निसर्ग गिरिभ्रमण संस्थेने १९९३ साली रोहा विभाग सुरू केला.

गडावरील वास्तू-

१. कलावंतिणीची विहीर – मेढा गावातील बाजूने गडावर येण्यास सुरुवात केल्यावर गडाच्या पायथ्याजवळ मोठी विहीर आहे. ती कलावंतिणीची विहीर म्हणून ओळखली जाते.

२. खिंडीत अनेक युद्धशिल्पे आहेत. त्यांना वीरगळ म्हणतात. ते युद्धात कामी आलेल्या शिपायांच्या स्मृतीनिमित्त उभारले जातात.

३. मधला मोर्चा – खिंडीच्या पश्चिमेकडे डोंगरावर मुख्य किल्ला आहे. गडावर जाण्यास नागमोडी वळणाची पायवाट आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी पडिक अवस्थेत तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. त्यास मधला मोर्चा म्हणून ओळखले जाते. गडावर हल्ला करणा-या शत्रूला प्रथम खिंडीत गाठले जायचे. तेथून शत्रू गडावर येऊ लागल्यास त्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी, मधल्या मोर्चावर अटीतटीची झुंज द्यावी लागत असे.

४. प्रवेशद्वार – मधला मोर्चा ओलांडून पुढे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ते पूर्वाभिमुख व गोमुख पद्धतीचे आहे. गडाचे प्रवेशद्वार दगडी बांधकामाचे असून प्रवेशद्वाराची कमान सुबक आहे. त्या ठिकाणी भक्कम लाकडी दरवाजा होता. तो बंद केल्यावर सहज उघडू नये म्हणून अडता टाकण्यासाठी बुरूजांमध्येच अडता शिरण्यासाठी दगड कोरलेले आहेत.

५. वृषभशिल्प – प्रवेशद्वाराच्या समोर डाव्या हाताच्या बुरुजाखाली चौकोनी दगडावर शिल्प कोरलेले आहे. ते वृषभशिल्प म्हणून ओळखले जाते. ते प्रवेशद्वारावर कमानीच्या वर मधोमध लावलेले असते. परंतु कमानीच्या वरचा भाग कोसळलेला असल्यामुळे शिल्पदेखील खाली पडलेले आहे. वृषभाचे शिल्प समुद्र आणि कोकणावर राज्य करणा-या शिलाहारांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

६. वाड्यांचे चौथरे – प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोर वाड्यांचे चौथरे नजरेस पडतात. गडावरील मुख्य कामकाज त्याच जागी होत असावे, कारण एवढा मोठा चौथरा गडावर इतरत्र आढळत नाही. ऐतिहासिक भाषेत त्या वास्तूस गडाची मुख्य सदर म्हणून ओळखले जाते.

७. बालेकिल्ला – प्रवेशद्वारातून चौथरे ओलांडून पुढे आल्यास बालेकिल्ला नजरेस येतो. गडावरील उंच भागास बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मुख्य किल्ला हा तटबंदीने संरक्षित केलेला असतो; तरीही अधिक सुरक्षिततेसाठी बालकिल्ल्याच्या भोवतीही तटबंदी असते. तशी तटबंदी अवचितगड बालेकिल्ल्यास आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. पैकी मुख्य प्रवेशद्वारातून आत चौथ-यावरून पुढे आल्यास समोर येणारी बालेकिल्ल्याची कमान उध्वस्त झालेली आहे. तिचे चिरे इतस्तत: विखुरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या हातास दुसरी कमान आहे. दक्षिणेच्या तटबंदीखाली सहा टाक्यांच्या समुहाजवळ तिसरी कमान आहे. पुढच्या दोन्ही कमानी शाबूत आहेत.

८. द्वादशकोनी तलाव – महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आढळणा-या तलावांमध्ये अवचितगडावरील तलाव त्याच्या बांधकामशैलीमुळे चटकन नजरेत भरतो. सुबक पद्धतीने बांधलेला बारा कोनांचा तलाव गडाच्या मानाने खूप मोठा आहे. तलावात उतरण्यासाठी रेखीव पाय-या आहेत. तलावाच्या दोन बाजूंमधील अंतर पन्नास-साठ फुटांच्या आसपास आहे. पाण्याचा उपसा नसल्यामुळे तलावातील पाणी खराब झालेले असून ते पिण्यायोग्य राहिलेले नाही.

९. शिवमंदिर – द्वादशकोनी तलावावरून पुढे शिवमंदिर आहे. मंदिराचा फक्त चौथरा शिल्लक आहे. गाभा-याच्या भिंती दोन फूट उंचीपर्यंत शाबूत आहेत. गाभारा पाच फूट लांबीरुंदीचा असून आतील शंकराची पिंड म्हणजे सुबक कारागिरीचा नमुना आहे. समोर नंदी आहे. उजव्या हातास विष्णूची व देवीची तर डाव्या हातास गणपतीची मूर्ती आहे.

 

१०. सातटाकी समूह – मंदिराच्या पाठीमागे खालच्या बाजूस पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. एकूण सात छोटीमोठी पाण्याची टाकी आहेत. पाणी वापरण्यायोग्य आहे.

११. पिंगळसई देवीची घुमटी – सात टाक्यांच्या समुहाच्या जवळ पिंगळसई देवीची घुमटी आहे.

१२. बाजी पासलकराचे स्थान – स्तंभ सात टाक्यांच्या जवळ आहे. परंतु त्यातील फक्त तीन फूट उंचीचा चौथरा शाबूत आहे. त्याच्या एका बाजूवर श्री गणेशाय नम: शके १६२३ माघ अशी अस्पष्ट अक्षरे दिसतात. चौथ-याच्या दुस-या बाजूस हाती ढालतलवार घेऊन वीरासन घेतलेल्या पुरुषाचे शिल्प आहे. शिलालेखावरील साल इसवी सन १७०१ दर्शवते. हा चौथरा बाजी पासलकराचा स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो.

१३. दक्षिण बुरुज – सात टाक्यांच्या समूहाला लागून असलेल्या बालेकिल्ल्यांच्या तटबंदीमधील कमानीखालून जाणारी वाट गडाच्या दक्षिण बुरुजाकडे जाते. दक्षिणेची बाजू तटबंदी बांधून भक्कम केली आहे व त्यावर टेहळणीसाठी बुरूज बांधलेला आहे. तोच दक्षिण बुरूज म्हणून ओळखला जातो. बुरूजावर जाण्यासाठी तटबंदीला लागून वर जाणा-या पाय-या आहेत. तसेच, तटबंदीवरही पाय-या बांधलेल्या आहेत. बुरुजाच्या पूर्वेकडील तटबंदी मात्र पूर्णपणे कोसळली आहे.

१४. शिलालेख – दक्षिण बुरूजावर येण्यासाठी पायर्‍या चढून वर आल्यावर वेधून घेतो तो बुरूजावरील शिलालेख. तो एक चौरस फूट आकाराचा आहे.

१५. खंदक – गडाच्या दक्षिण बाजूकडून गडाबाहेर जाण्यासाठी तटबंदीमध्ये कमानीचे द्वार आहे, त्यातून बाहेर पडल्यास गडाचे दक्षिण टोक लागते. गडाचे दक्षिण टोक व त्यापुढे असलेला डोंगर यांच्यामध्ये खंदक आहे. खंदकापलीकडचा डोंगर पुढे पडम गावापर्यंत उतरत गेलेला आहे. डोंगरावरून शत्रू गडावर येऊ नये म्हणून त्या दोन डोंगरांमधील भाग खणून खंदक तयार करण्यात आला आहे.

१६.तोफा – दक्षिण बुरूजावरून पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूने येणारी वाट पुन्हा मुख्य द्वाराकडे येते. त्या वाटेवर प्रवेशद्वाराच्या आधी एक तोफ आहे. तीमध्ये तोफगोळा अडकलेला आहे. दुसरी तोफ गडाच्या उत्तर बुरूजाकडील पूर्व बाजूच्या तटबंदीजवळ आहे. तटबंदी कोसळल्यामुळे दरीत कोसळलेली हीच ती तोफ.

१७. टेहळणीचा बुरूज – गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडून उत्तरेकडे जाताना छोटीशी टेकडी आहे. त्यावर काही बांधकाम ढासळलेल्या अवस्थेत आहे. तो गडावरील टेहळणी बुरूज.

१८. उत्तर बुरूज – टेहळणी बुरूजावरून पुढे उत्तर बुरूजावर जाता येते. उत्तर बुरुजाच्या पूर्व तटाजवळ छोटा खळगा आहे. तेथून तटाबाहेर पडण्यासाठी चोरवाट आहे. परंतु ती मातीचा भराव होऊन बुजली गेली आहे.

– सुखद राजाराम राणे
९४२३३८३२८१, ९८९४६५९३९८
sukhadrane@rediffmail.com

Last Updated On – 06th Nov 2016

About Post Author

7 COMMENTS

  1. गडाची माहिती उत्तम प्रकारे
    गडाची माहिती उत्तम प्रकारे मांडली आहे.

  2. अतिशय सुंदर आणि उपयुक्त…
    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली. मी जूनमध्ये गडावर जाणार आहे आपल्या माहितीचा नक्कीच चांगला उपयोग होईल. ३ दिवसात रोह्याजवळील ४ किल्ले करायचा प्लॅन आहे आपण काही सुचवू इच्छित असाल तर नक्की मला मेल करावा किंवा माझा नं ९८६०५०७७५७ आहे . किंवा मी तुम्हाला फोन केला तर चालेल का?

  3. अजय महाजन, जरूर फोन करावा.
    -…

    अजय महाजन, जरूर फोन करावा.
    – टीम ‘थिंक महाराष्ट्र’

  4. अतिशय उपयुक्त माहिती.
    अतिशय उपयुक्त माहिती.

Comments are closed.