तत्त्ववेत्ता अ.भि. शहा (A. B. Shah – Reformist, Philosopher)

प्रा. अ.भि. शहा

भारतीय समाजात सेक्युलर आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्याची मोहीम साठ-सत्तरच्या दशकात जोर धरू लागली. मोजक्या व्यक्ती, संस्था आणि संघटना त्यासाठी कार्यरत होत्या. त्यांत प्रा.अ.भि. शहा यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांची ओळख इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक किंवा सोसायटीमार्फत चालवल्या गेलेल्या नियतकालिकांचे लेखक-संपादक यांपुरती मर्यादित नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सेक्युलॅरिस्ट, ह्युमॅनिस्ट, एज्युकेशनॅलिस्ट यांपलीकडे जाणारी अनेक विशेषणे सामावलेली होती. ते न्यू क्वेस्ट आणि समाज प्रबोधन पत्रिका या नियतकालिकांचे संपादक होते. ते केवळ मूलभूत विचार आणि त्या अंगाने साहित्य निर्माण करणारे विचारवंत नव्हते; तर सक्रिय कार्यकर्तेही होते. त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ, प्राज्ञ पाठशाळा, इंडियन असोसिएशन फॉर कल्चरल फ्रीडम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अशा नामवंत संस्थांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी स्वत:ची वैचारिक भर त्या संस्थांच्या तत्त्वप्रणालीत घातली. त्यांनी योद्ध्याची भूमिका धर्मनिरपेक्ष मानवतावादाच्या प्रचारार्थ निभावली. शहा यांना एकसष्ट वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी त्यांपैकी तीन दशकांहून अधिक काळ समाजप्रबोधनाच्या कार्याला दिला.

शहा यांचा जन्म दिगंबर-जैन कुटुंबात 2 सप्टेंबर 1920 रोजी झाला. त्यांच्या जन्माला 2020 साली शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे भाग तर्कशुद्धता आणि सर्वांगीण अभ्यास हे होते. ते मॅट्रिकच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिले आले होते, तेव्हाच त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना आली होती. शिक्षणाचा खरा अर्थ ज्याला समजतो तो विचार करतो, प्रश्न विचारतो आणि उत्तरे शोधतो. शहा तसे होते. त्यांनी त्यांच्या विचार स्वतंत्रपणे करण्याच्या सवयीमुळे धर्माला श्रद्धेचा भाग न करता चिकित्सेचा भाग केले. त्यांना चिकित्सेमुळे धर्माच्या मर्यादा लक्षात आल्या. ते लहान वयात निरीश्वरवादी झाले. अंगी केवळ बुद्धिप्रामाण्य असून चालत नाही; बुद्धीचा सकारात्मक वापर करण्यासाठी बुद्धिप्रामाण्याला करुणा आणि विवेक यांची जोड हवी. शहा यांनी तो संयोग साधलाच, पण त्यापुढे जाऊन त्यांनी त्यांना तशी जोड उपजत असल्यामुळे बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद यांच्या आधारावर प्रगत मानवतावादाचा पुरस्कार केला.

शहा यांचे वाचन मोठे होते. त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी (1937 मध्ये) हॅकेल यांचे द रिडल ऑफ युनिव्हर्सआणि हेमन लेव्ही यांचे द युनिव्हर्स ऑफ सायन्सही पुस्तके वाचली. त्यामुळे त्यांना आत्मा किंवा देव या कल्पना फक्त मनात असतात; त्यांचे अस्तित्व मनाबाहेरच्या जगात नसते हे उमगले. शहा यांची बौद्धिक पक्वता विनवूड रेड यांचे मार्टिडम ऑफ मॅनवाचल्यानंतर उत्क्रांत झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर ज्येष्ठ मानवतावादी विचारवंत एम.एन. रॉय यांच्या साहित्याने प्रभाव टाकला. त्या संदर्भात शहा म्हणतात, “रॉय यांच्या वाचनाने विचारांना नवी दृष्टी आणि बौद्धिक स्वातंत्र्य मिळाले, ज्यामुळे नकारात्मक निरीश्वरवाद सकारात्मक नास्तिकतेकडे गेला.त्यांनी बर्ट्रांड रसेल, मार्क्स, एंजेल्स, लेनिन वयाच्या चोविसाव्या वर्षी वाचून काढले होते. त्यांचा असा विश्वास होता, की माणूस हा जोपर्यंत धार्मिक गूढवाद आणि पारंपरिक धर्मश्रद्धा अशा भ्रामक गोष्टींना नाकारत नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने मानव बनू शकत नाही. समाजात अनेक अभ्यासक असे आहेत, की जे शिक्षण आणि शहाणपणा पदवीशी जोडतात. परंतु शहा यांचा दृष्टिकोन तसा नव्हता. त्यांच्याकडे मूलभूत अभ्यास, चिकित्सक बुद्धी आणि लौकिक अर्थाने मान्यताप्राप्त शिक्षण होते.

     

डावीकडून हमीद दलवाई, भाई वैद्य, बाबूमिया बँडवाले आणि अ.भि.शहा

 

   शहा यांच्याकडे समाजप्रबोधन कोणत्या अंगाने झाले पाहिजे याची कल्पना स्पष्ट होती. अर्थात त्यांना मानवाला धर्मांधतेच्या कचाट्यातून मुक्त करणे हीच खरी मानवसेवा आणि समाजप्रबोधन आहे याची जाणीव होती. त्याकरता त्यांनी समविचारी लोकांशी मैत्री केली. त्यामुळे त्यांच्यात समाजपरिवर्तनाच्या कार्याला गती देण्याची ऊर्जा निर्माण झाली. व्यक्तिगत पातळीवर पटलेला विचार इतरांना सांगावा, तो विचार माणसाच्या कल्याणाचा असेल तर तो रुजवण्याचा प्रयत्न करावा या हेतूने शहा यांनी संस्था-संघटना उभारून त्याचे प्रबोधन चळवळीत रूपांतर करणे हे त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन केले. शहा हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधन संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्या संस्थेची स्थापना 1950 मध्ये झाली. त्या संस्थेमार्फत आधुनिक समाजाविषयीचे चिकित्सक विचार आणि मानवी मूल्ये सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य करण्यात येत असे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा प्रबोधनाचा मूलाधार असतो. त्यांनी तसा दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून वैज्ञानिक पद्धत-सायंटिफिक मेथडहे पुस्तक लिहिले. ते संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आले. शहा धर्मचिकित्सक असल्याने त्यांना धर्माच्या अभ्यासाबाबत कुतूहल आणि आवड निर्माण झाली. त्यांनी त्या विषयावरील उपलब्ध पुस्तकांचा अभ्यास केला आणि अशा निष्कर्षाला आले, की धार्मिक लोक धर्माभिमानी असतात आणि ते निर्माण होणाऱ्या नव्या आधुनिक मूल्यांशी जोडून घेण्यास असमर्थ असतात/ठरतात.

          शहा यांच्या लक्षात हमीद दलवाई यांच्या ललित साहित्यातून दलवाई यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, त्यांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची मुस्लिम राजकारणाची मीमांसा आल्यानंतर ते दलवाई यांच्या जवळ गेले. शहा यांनी दलवाई यांच्या मुस्लिम प्रबोधन विचारांची माहिती घेतल्यानंतर इस्लामच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी हिंदू आणि जैन या धर्मांचा अभ्यास केलेला होताच, ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपायहे पुस्तक 1968 मध्ये प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील परिसंवादातील दलवाई यांच्या टिपणांवर आधारित आहे. कवी-लेखक दिलीप चित्रे यांनी दलवाई यांची स्वतंत्र दीर्घ मुलाखत घेऊन, त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि शहा यांच्या प्रस्तावनेसह दलवाई यांचे काही लेख असलेले मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडियाहे पुस्तक इंडियन सेक्युलर सोसायटीने नोव्हेंबर 1968 मध्ये प्रकाशित केले. त्या दोन पुस्तकांत नऊ महिन्यांचे अंतर आहे. महाराष्ट्रात 1970 मध्ये धार्मिक दंगली झाल्या, तेव्हा शहा यांनी सेक्युलॅरिस्टमध्ये हिंदू जमातवादाचे प्रणेते हा लेख लिहिला. त्यात त्यांनी दयानंद सरस्वती, वि.दा.सावरकर आणि गोळवळकर गुरुजी यांच्यावर कडाडून टीका केली. धर्मांधता माणसाच्या मनात रुजलेली असते. त्यामुळे जमातवादी मानसिकतेशी युद्ध मानसिक पातळीवरच केले गेले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेत शहा आणि इंडियन सेक्युलर सोसायटी यांचा वाटा मोठा आहे. त्या दोन संस्थांच्या वतीने अनेक कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यात आले. मंडळाने समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण, विज्ञाननिष्ठ आधुनिक शिक्षण यांवर बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका घेतली. त्यांवरील अनेक कार्यक्रम आणि त्या संदर्भातील लेखन इंडियन सोसायटीमार्फत करण्यात आले आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ: उद्देश व भूमिकाया पुस्तकाच्या निर्मितीतसुद्धा शहा आणि इंडियन सेक्युलर सोसायटी यांचा वाटा आहे. समान नागरी कायद्यावर मोठ्या प्रमाणात बोलबाला होत असतो. विधीज्ञ सत्यरंजन साठे आणि त्यांचे सहकारी यांनी सर्व धर्मियांना आवश्यक आणि संविधानाच्या मूलभूत गाभ्याशी बांधील असा समान नागरी कायद्याचा मसुदा तयार केला. त्यावर मुस्लिम सत्यशोधक आणि सेक्युलर सोसायटी यांनी चर्चासत्रे आयोजित करून तो मसुदाही इंडियन सेक्युलर सोसायटीमार्फत प्रकाशित केला.

          शहा हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या काही कार्यक्रमांत, विशेषत: फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम कॉन्फरन्स, महिला परिषद यांच्या अभ्यासशिबिरांत सहभागी असायचे. ते डोक्यावर मुस्लिम वापरतात तशी फरची टोपीदेखील काही वेळा घालत. त्यातून शहा मुस्लिम असावेत असा अनेकांचा समज होई. दलवाई यांनाही शहा स्वत:ची तशी मुस्लिम ओळख का दाखवतात हे काही वेळा खटकायचे. ते त्यांनी बोलून दाखवले. दोघेही समाज प्रबोधनाचे चाहते; दलवाई जन्माने मुस्लिम असताना मुस्लिम ओळख असणारा पोषाख टाळतात आणि शहा मात्र जन्माने दिगंबर-जैन पंथी असताना मुस्लिम ओळख असणारी टोपी घालतात. नव्या लोकांचा त्यामुळे गोंधळ होत असे. दलवाई-शहा यांच्यानंतर तसाच प्रसंग सय्यदभाई आणि अनिल अवचट यांच्यावर एकदा आला. अवचट यांना दाढी होती आणि सय्यदभाई यांना ती नव्हती. ते दोघे पाहुणे म्हणून एकत्र एका कार्यक्रमस्थळी गेले. संयोजकांना दोघांची नावे माहीत होती, पण त्यांनी त्यांना कधी पाहिले नव्हते. प्रमुख संयोजकांनी अवचट यांचे मुस्लिम पद्धतीने आलिंगन देऊन स्वागत केले आणि सय्यदभाई यांना हात जोडून नमस्कार केला. अशा अनेक गमतीजमती आहेत. अस्सल मानवतावादी अशी ती माणसे हसत-खेळत चर्चेत रात्र जागवत, समाजप्रबोधनाचे चिंतन करत. धर्मातीतता हा त्यांचा स्थायिभाव होता.

          खरे म्हणजे, अशा व्यक्तिमत्त्वांवर निरपेक्ष चरित्रे निर्माण झाली पाहिजेत. ती न होणे हा दोन प्रकारचा अपराध ठरेल. पहिला अपराध हा की नव्या पिढीला अस्सल पद्धतीने सेक्युलॅरिस्ट, ह्युमॅनिस्ट असणारे आणि निरीश्वरवादी असतानाही धर्मवादी समूहाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचण्याचे प्रयोजन देऊन संपूर्ण आयुष्य त्याच्या सिद्धीसाठी देणे हे अलौकिक आहे. तशा प्रबोधकांची ओळख नव्या पिढीला नीटपणे झाली पाहिजे. दुसरे महत्त्वाचे कारण असे, की त्यांच्यासोबत काम करणारे, त्यांना जवळून ओळखणारे लोक कमी आहेत. शहा-दलवाई यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी काही कारणाने नकारात्मक लिहून ठेवले आणि त्याचा प्रतिवाद झाला नाही, तर तो अमानवी अपराध होईल. मतभेद नक्की असावेत, मात्र दृष्टी नकारात्मक नसावी. त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण करू नये. शहा यांना वाचून त्यांची धार्मिक ओळख कदाचित होणार नाही. शहा हे आडनाव हिंदू, मुस्लिम, जैन, पारशी अशा सर्व धर्मांत असते. दलवाई आणि शहा यांची अतुट मैत्री असताना काही विनोद होत. कोणी विचारले, की शहा यांच्या नावातील आद्याक्षरे ए. बी. म्हणजे काय तर ते अबु-बकर असे म्हणत. ज्यांना अबु-बकर माहीत आहे त्यांना समजले असेल, की मोहम्मद पैगंबर यांनी इस्लामचा पैगाम देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे अबु-बकर हे त्यांचे अनुयायी झाले; त्यांचे सोबती आणि सर्वार्थाने एकनिष्ठ. पैगंबर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा वारसा चालवणारे खलिफासुद्धा झाले. तसेच, दलवाई यांच्यासोबतची मैत्री, त्यांच्यासोबत केलेले सेक्युलर ह्युमॅनिझमचे कार्य, दलवाई यांना संघटना उभारणीत केलेले सहकार्य आणि दलवाई यांच्या निधनानंतर मंडळासाठी जिवंत असेपर्यंत विचारनिष्ठ योगदान. ए. बी. आणि अबु-बकर यांच्या नावातील आणि बाकीचा सर्व काही योगायोग असल्याने तो एक गमतीचा विषय आहे. वाचकालाही ए. बी. म्हणजे शहा यांचे मूळ नाव समजून घेण्यास आवडेल. त्यांचे पूर्ण नाव होते अमृतलाल भिकाभाई शहा. शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले यांचे शहा हे गुरू होते, त्यांनी ताकवलेसरांना मॅथ्स शिकवले. त्यांची अमीर शेख, भाई वैद्य यांच्याशी मैत्री असल्याने त्यांना मुस्लिम सत्यशोधकबद्दल आस्था आहे. मी हे वर्ष शहा यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याचे सांगितले आणि या निमित्ताने मासिक व्याख्यानमाला मंडळातर्फे आयोजित केल्याची कल्पना दिली. सर म्हणाले, की शहा यांनी ठरवून त्यांचा मुलगा यतिन याचे लग्न मुस्लिम मुलीशी केले. प्राचार्य अत्तारसरांची मुलगी आणि मुमताज रहिमतपुरे यांची बहीण नादिरा यांना सून म्हणून घरी आणले. हा जगलेला अस्सल मानवतावाद! धर्मातीततेची ही गोष्ट शहा यांच्या व्यक्तिमत्त्वातील मोठेपणा समजून घेण्यासाठी पुरेशी आहे.

          सर्व धर्मांतील कालबाह्य आणि विसंगत गोष्टी आधुनिक समाज घडवण्यातील अडचणी आहेत. त्या बाजूला सारल्या पाहिजेत असे म्हणण्याचे धाडस पन्नास वर्षांपूर्वी शहा-दलवाई करत होते. युवक क्रांती दलाने मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम 30 मे 1972 रोजी घेतला होता. त्यास शहा उपस्थित होते. आम्ही तथाकथित अस्पृश्यांशी एकभाव दाखवण्यासाठी येथे जमलो आहोत. हिंदूधर्मीय मनुस्मृतीने अस्पृश्यांबरोबर अमानवी वर्तन करण्यास संमती दिली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. त्याबरोबरच इस्लाम आणि ख्रिश्चानिटी यांमध्ये सुद्धा आधुनिक मूल्यांशी विसंगत अशा गोष्टी आहेत. त्या संदर्भातसुद्धा बुद्धिनिष्ठ चिकित्सा झाली पाहिजे.ही त्या कार्यक्रमामागील भूमिका त्या दृष्टीने पुरेशी बोलकी आहे.

          शहा यांनी न्यू क्वेस्टचे संपादक म्हणून संपादकीय आणि लेखन तर केले आहेच; शिवाय, त्यांनी सायंटिफिक मेथड, रिलिजन अँड सोसायटी, व्हॉट एल्स अवर मुस्लिम्स? चॅलेंजेस टू सेक्युलॅरिझम, प्लानिंग फॉर डेमोक्रसी अँड ऑदर एसेज ही पुस्तके इंग्रजीत लिहिली. त्यांनी जयप्रकाश नारायण यांनी 1975 च्या आणीबाणीत तुरुंगात लिहिलेली रोजनिशी संपादित केली. त्यांनी शिक्षण, राजकारण, संस्कृती यांसारख्या विषयांवरील काही पुस्तकांचे संपादन केले आहे. समाज प्रबोधन संस्थेने 1970 मध्ये अनुवादित केलेल्या भारतीय लोकशाहीला अंधश्रद्धेचे आव्हानया पुस्तकात शहा यांनी महत्त्वाच्या नियतकालिकांत आणि दैनिकांत लिहिलेल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील लेखांचा समावेश आहे.

          शहा हे एक तत्त्ववेत्ता होते असा निष्कर्ष त्यांचे लेखन अभ्यासल्यास प्रकर्षाने जाणवतो. विज्ञान म्हणजे काय हे समजून घेऊन वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब विद्यापीठीय शिक्षणातसुद्धा अभावाने होतो. त्यामुळे वैज्ञानिक सत्य समजून घेण्याची कुवत निर्माण होत नाही. तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम महत्त्वाचा असून त्यामुळे मानवाला जागतिक नागरिक होणे शक्य झाले आहे. विज्ञान हे मानवी जीवनावर तीन पदरी परिणाम करते – प्रामुख्याने तंत्रज्ञानावर, मानवी संस्कृतीवर आणि तत्त्वज्ञानावर. विज्ञानामुळे केवळ भौतिक सुविधा उपलब्ध होत नाहीत तर त्यामुळे सांस्कृतिक जीवन विस्तारते. मानवाच्या स्वर्ग-नरक, देव-देवता, कर्मसिद्धांत, वर्णव्यवस्था, धर्माधिष्ठित नैतिकता यांसारख्या पारंपरिक श्रद्धांतील फोलपणा वैज्ञानिक पद्धतीतून स्पष्ट होतो. शहा यांनी मांडलेला हा विचार धर्मवादी, अंधश्रद्ध राजकारण्यांना संसदप्रवेशपूर्व प्रशिक्षणासाठी वापरला तर संविधानाने अपेक्षलेला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता येईल. त्यामुळे आमदार-खासदार आणि मंत्री यांना ते अंधश्रद्धेला उत्तेजन देणारी विखारी व अवैज्ञानिक वक्तव्ये करताना काय बडबडत असतात याचे भान येईल.

          दलवाई आणि शहा यांनी सेक्युलॅरिझमची संकल्पना आणि त्याची व्यापकता स्पष्ट केली आहे. भारतीय समाजाने सेक्युलॅरिझमला असणारे विविध आयाम कधी समजून घेतले नाहीत. शहा यांनी त्यांच्या धर्म आणि समाजया पुस्तकात सेक्युलॅरिझम तपशिलात मांडला आहे. विविध देशांत आणि धर्मसमुहांत त्याचा लावलेला अर्थ त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. शहा म्हणतात, “प्रथमदर्शनी असे म्हणता येईल, की धर्माची ऐहिक जीवनापासून फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम. मानवी व्यवहार व्यक्तिगत व खाजगी, व्यक्ती-व्यक्ती अंतर्गत आणि व्यक्ती-संस्थांतर्गत असतात. म्हणजे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय व्यवहारांत घेण्यात येणारे निर्णय किंवा भूमिका धर्मसिद्धांत किंवा कोणतीही धर्मश्रद्धा यांच्याशी निगडित नसले पाहिजेत. एखादी व्यक्ती विशिष्ट वर्तन करत असेल, तर – तिच्या श्रद्धा, खाण्यापिण्याच्या सवयी, पोषाख वगैरे – तो तिच्या वैयक्तिक पातळीवरील विषय आहे. मात्र मी वागतो तसाच तो वागला पाहिजे असे म्हणणे मला मान्य नाही. एखाद्या शाकाहारी माणसाने तू पण शाकाहारी झालेच पाहिजे असा हट्ट करता कामा नये. माझी श्रद्धा ज्या देवावर आहे, तू पण त्याच देवावर श्रद्धा ठेवावी ही गोष्ट एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर ती लादणे मला मान्य नाही. अलिकडे काहींना जय श्रीरामम्हटले नाही; तसेच, जुम्माच्या नमाजला आले नाहीत म्हणून मार खावा लागला होता. मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील तलाक पद्धत किंवा ख्रिश्चनांमधील घटस्फोटाची प्रक्रिया, कुटुंबनियोजनाबद्दलचा दृष्टिकोन या संदर्भातील धर्मशिकवण सेक्युलर मूल्यांच्या आड येते. त्यामुळे सेक्युलॅरिझम म्हणजे एखादी व्यक्ती देव वा अल्लाहला मानत असेल तर तो तिच्या खाजगी संबंधांचा भाग आहे.

          शहा यांनी विविध विद्वानांच्या सेक्युलॅरिझमच्या व्याख्या आणि त्यात येणाऱ्या संकल्पना यांचा वापरसुद्धा केला आहे. समता आणि सामाजिक न्याय यांची संकल्पना सेक्युलॅरिझमशी जोडलेली आहे. भारतीय संदर्भात सेक्युलॅरिझमचे विविध प्रवाह -धर्मनिरपेक्षता, धर्मातीतता, निधर्मीपणा ते सर्वधर्म समभाव – अद्याप लोकवर्तन प्रभावित करू शकलेले नाहीत; किमान शासनाने कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन, समर्थन देऊ नये किंवा त्यांच्यासाठी लोकशक्ती वापरू नये.

इस्लामचा अभ्यास हे शहा यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास व मांडणी आधुनिक मूल्यांचा निकष लावून वैज्ञानिक पद्धतीने केली. त्यांनी इस्लामचा अभ्यास करताना आजच्या काळाशी असणारी सुसंगतता आणि मर्यादां यां संदर्भातही मांडणी केली आहे. त्यांनी व्हॉट एल्स अवर मुस्लिम्समध्ये मुस्लिम शिक्षण आणि मदरसा, उर्दू माध्यम व समाज यांच्या भवितव्याबद्दल मांडणी केली आहे. शहा हे प्राध्यापक होते. ते शिक्षण संस्थांशी संबंधित असल्याने त्यांचे शैक्षणिक विचार जर नव्या शैक्षणिक धोरणाचे मूल्यमापन करताना वापरले तर त्या धोरणाच्या मर्यादा अधोरेखित होतील. ते इस्लामपुढे नव्या युगाचे आव्हानया लेखात इस्लामची चिकित्सा करताना म्हणतात, की भारतातील मुस्लिमांना आधुनिकतेचे आव्हान स्वीकारावे लागत आहे. ती मुस्लिमांना सर्जनशील वृत्तीने धर्माचा पुनर्विचार करण्याची संधी प्राप्त झाली आहे. धर्माची सार्वत्रिक स्वरूपात ही शाश्‍वत व मूलभूत मूल्ये आहेत. ती धर्मस्थापनेवेळेच्या ऐतिहासिक गरजेतून सांगितलेल्या कालसापेक्ष गोष्टींपासून अलग काढणे याचाच अर्थ धर्माचा पुनर्विचार करणे असा आहे. प्रत्येक धर्मात शाश्वत व कालसापेक्ष अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात हे उघड आहे. पोथीनिष्ठेमुळे ज्यांची बुद्धी अंध झाली आहे त्यांच्याशिवाय इतर कोणालाही त्या गोष्टींचा पुरावा देण्याची गरज पडणार नाही. शहा म्हणतात, “इस्लामचा किंवा कोणत्याही धर्माचा चिकित्सक प्रकारे अभ्यास करण्यासाठी निकष कसा तयार करावा हा त्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय घटनेतील मूलभूत हक्क किंवा संयुक्त राष्ट्राची मानवी हक्कांची सनद यांवर तो निकष आधारित असावा.अलिकडील मुस्लिम विद्वान असे आहेत, की त्यांना भारतीय घटना इस्लाम आणि पैगंबर यांच्या शिकवणुकीच्या आधारावर आहे असे वाटते. पुढे जाऊन त्या विद्वानांना असेही वाटते, की फ्रेंच राज्यक्रांतीत पुढे आलेली समता-बंधुता-स्वातंत्र्य ही मूल्येसुद्धा इस्लामच्या शिकवणुकीचा भाग आहे. तसे प्रतिपादन इतर धर्मीय नेतेसुद्धा करतात. अशा प्रकारची धर्मचिकित्सा किती घोटाळा करू शकते हे लक्षात येईल. इस्लाम आणि आधुनिकता, इस्लाम आणि मानवतावाद हे सर्व विषय त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी समाज प्रबोधन संस्थेने प्रकाशित केलेले भारतीय लोकशाहीला अंध धर्मश्रद्धेचे आव्हानहे पुस्तक वाचण्यास हवे. तसेच, इंग्रजीतील इतर लेखही शहा यांची धर्मचिकित्सा समजण्यासाठी वाचण्यास हवेत.

          दिलीप चित्रे यांनी शहा यांच्या निधनानंतर 1981 मध्ये (शहा यांचा स्मृतिदिन 11 ऑक्टोबर हा आहे)  अभिरुचीच्या दिवाळी अंकात अ.भि. शहा: माणसे स्थापन करणारी संस्थाया शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यांनी त्यात शहा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. ते म्हणतात, क्वचित कोरडे किंवा तुसडे वाटणारे शहा अत्यंत संवेदनक्षम होते. दलवाई यांच्या आजारात शहा आतून तडफडत राहिले. त्यांचे आस्था, जिव्हाळा आणि प्रेम हे भाव अनेकांनी अनुभवले आहेत. शहा यांचे वर्चस्व विचारांवर असे, पण निव्वळ विचारांचे वर्चस्व शहा यांच्यावर कधीच नव्हते. माणुसकीचा ओलावा त्यांच्या विचारांना होता. त्यांच्या भावना प्रगल्भ नैतिक संवेदनक्षमतेच्या पातळीला सहज पोचत होत्या.

          समाजाला आधुनिकतावाद समजावून सांगणारे शहा-दलवाई यांची गरज पदोपदी जाणवते. त्यांनी मांडलेल्या मूलभूत विचारांना कुलूपबंद केल्याची जाणीव होते. लढाऊ पिंड असणारे शहा ह्युमॅनिझमच्या लढाईतील योद्धे होते हे त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसून येते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या योगदानाची उजळणी करताना त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते. दलवाई यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे समजले तेव्हा ते खिन्न झाले. मूत्रपिंड रोपणाची शक्यता डॉक्टरांनी जेव्हा बोलून दाखवली तेव्हा शहा आणि नगरकर यांनी त्यांची मूत्रपिंडे देण्याची तयारी उत्स्फूर्तपणे दाखवली. अ.भि.शहा-नरहर कुरुंदकर-वसंतराव नगरकर यांच्यासारखी माणसे हमीदभार्इंसाठी काय होती याची कल्पना येते. त्यावरून त्या काळच्या बुद्धिगम्य वातावरणाची जाणीव होते. 

शमसुद्दीन तांबोळी9822679391 tambolimm@rediffmail.com

(‘साधना‘ वरून उद्धृत, संपादित, संस्कारीत)

शमसुद्दिन तांबोळी हे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आहेत. ते गेल्या चाळीस वर्षांपासून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. ते हमीद दलवाई स्टडी सर्कल, वैज्ञानिक मनोभाव – विवेकवाद रुजवण्यासाठी दहा वर्षांपासून बकरी ईद निमित्त राज्यव्यापी रक्तदान सप्ताह अभियानाचे आयोजन करतात. त्यांनी समान नागरी कायदा अस्तित्वात यावा यासाठी लेखन आणि लोकशिक्षण केले आहे. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर बारा पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे. त्यांनी हमीद दलवाई यांच्या कार्यावर पीएचडी पदवी मिळवली आहे.

———————————————————————————————-

About Post Author

Previous articleभूम तालुक्यातील बेलेश्वर (Beleshwar Temple Of Bhoom)
Next articleवावीकर, शिरधनकर यांची पुस्तकांची दुनिया (Books About Books By Wavikar and Shirdhankar)
शमसुद्दिन तांबोळी हे मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादक आहेत. ते गेल्या चाळीस वर्षांपासून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. ते हमीद दलवाई स्टडी सर्कल, वैज्ञानिक मनोभाव – विवेकवाद रुजवण्यासाठी दहा वर्षांपासून बकरी ईद निमित्त राज्यव्यापी रक्तदान सप्ताह अभियानाचे आयोजन करतात. त्यांनी समान नागरी कायदा अस्तित्वात यावा यासाठी लेखन आणि लोकशिक्षण केले आहे. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक विषयावर बारा पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे. त्यांनी हमीद दलवाई यांच्या कार्यावर पीएचडी पदवी मिळवली आहे.9822679391

1 COMMENT

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here