टिलीमिली: स्तुत्य उपक्रम (Mkcl’s Praiseworthy Venture)

3
48

 

शाळा कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवस बंद आहेत, तर मुलांच्या शिक्षणाचे काय होणार असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. कोणी कोणी ऑनलाइन क्लासेसचा विचार करतात, त्यांची फी ऐकून हैराण होतात. पण ‘एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशनने (MKCLKF) ग्राममंगलच्या मदतीने पहिली ते आठवीचे पाठ बनवून घेतले आहेत व ते दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवले जात आहेत.
मी त्यांतील काही पाठ गेल्या काही दिवसांत पाहिले. सुखद धक्का बसला. जसे शिक्षकाने शिकवणे अपेक्षित आहे, तसेच ते पाठ आहेत. सावकाश, मुलांच्या कलाने, उदाहरणे देत ताई किंवा दादा शिकवतात. मुले नैसर्गिक रीतीने, स्वभावतः पडणारे प्रश्न विचारतात, चुकाही करतात. त्यावरून तेथे सगळे पाठ केलेले नाटक चालू नाही हे समजते. मुले खरेच शिकत आहेत, शिक्षक किंवा शिक्षिका मैत्रीपूर्ण रीतीने शिकवतात असे दिसते. शिकवताना, बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांचा वापर केला जातो. तेदेखील सोयीचे आहे. कारण जेव्हा शाळा चालू होतील, तेव्हा मुलांना तीच पुस्तके वापरायची आहेत, त्यांचा परिचय झालेला असेल, अर्धाअधिक अभ्यास हसतखेळत झालेला असेल.
मंगला नारळीकर
आज शहरात निदान मुलांना स्वतःचा स्मार्टफोन नसेल तरी घरात टीव्ही असतो. त्यावर सकाळी साडेसात ते साडेबारा सहसा मोठी माणसे आवडीचे कार्यक्रम पाहत नाहीत. मुलांना जरूर त्यांच्या जोगते पाठ पाहण्यास, शिकण्यास बसवावे. जमल्यास पालकांनीदेखील पाहवेत. म्हणजे मुलांना गृहपाठात मदत कशी करता येते ते समजेल.
वास्तविक, माझे नेहमी सांगणे असते, की पालकांपैकी कोणीतरी लहान मुलांचा अभ्यास पाहवा, त्यांच्याबरोबर पाठ्यपुस्तक वाचावे. अशिक्षित पालकांनी मुलांकडून मोठ्याने एकेक धडा वाचून घ्यावा. दोघांनी मिळून अर्थ लावावा. प्राथमिक शाळेतील मुलांना समजण्याजोगा मजकूर प्रौढ माणसांना समजणार नाही का? पण ते जमत नसेल तर टिलीमिलीमालिकेतील योग्य पाठ जरूर दाखवावेत. अगदी कमी शुल्क भरून स्मार्ट फोनवर ते पाठ हवे तेव्हा पुन्हा पुन्हा पाहण्याची सोय आहे. एरवी, सह्याद्री वाहिनीवरील पाठ तर अगदी मोफत आहेत.
भारताने अवकाशात उपग्रह सोडताना त्याचा सर्वदूर, लोकशिक्षणासाठी उपयोग होईल असे भविष्य सांगितले गेले होते. प्राध्यापक यशपाल यांनी ते स्वप्न दाखवले होते. ते आज सत्यात येत आहे असे वाटते.
मंगला नारळीकर mjnarlikar@gmail.com
(सकाळवरून उद्धृत)
घरातील कुटुंबवत्सल शाळा !
मंगला नारळीकर यांचा ‘टिलीमिली’ मालिकेबाबतचा लेख योग्य वाटला. त्यांनी ती मालिका कशी उपयुक्त आहे हे यथार्थ लिहिले आहे. त्या मालिकेचा आणखी एक वेगळा पैलू आमच्या प्रत्ययाला आला आहे. आम्ही घरामध्ये गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस सकाळी तीन-चार तास सह्याद्री वाहिनी चालू ठेवली. आमच्या घरी शिकणारा विद्यार्थी कोणी नाही, परंतु त्या कार्यक्रमामुळे घरातील वातावरण हसरे, खेळकर, कुटुंबवत्सल व प्रेमळ झाल्याचे जाणवले जीवन एकूण जे रुक्ष व व्यवहारप्रधान होऊन गेले आहे; ते कोरोनामुळे विशेषच तसे जाणवते, त्याऐवजी प्रसन्नतेचा शिडकावा सर्वत्र पसरलेला होता. घरात हिंडत फिरत असताना मराठीतील चांगले शब्द, चांगल्या संकल्पना कानावर पडत होत्या. टेलिव्हिजन असलेली खोली वर्गखोली झाली नव्हती, पण नीटनेटकी व उपयुक्त तेवढ्याच वस्तू असल्यासारखी वाटत होती. एकूण वातावरण संस्कारशील झाले होते.
            हा अनुभव आम्ही जेव्हा एका नातेवाईक स्त्रीला सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या, की “हो की काय, मी माझ्या मुलीला सांगते हं. तिचा मुलगा हेडफोन लावून बेडरूममध्ये लोळत ‘ऑनलाइन वर्ग अटेंड’ करत असतो. तो काय पाहत-ऐकत असतो असेच मुलीला सारखे वाटत असते. त्या घरच्या शाळेपेक्षा ही शाळा बरी की!” एमकेसीएल नॉलेज फाऊण्डेशन व सह्याद्री वाहिनी यांनी हा फार उत्तम उपक्रम सुरू केला आहे!
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमया वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
———————————————————————————————-

About Post Author

Previous articleविधानपरिषदेची गरजच काय? (Necessity of MLC?)
Next articleलोकवाद्य – संबळ (Sambal Folk Art Instrument)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

3 COMMENTS

  1. खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम. याचे टायटल गीत अतिशय उत्तम रित्या सादर केले आहे.

  2. अजून एक सांगावेसे वाटते आमच्या कडे लहान कोणी नाही. पान ज्यांच्या कडे आहेत त्यांना या कार्यक्रमाची शिफारस करतो. कारण आम्ही सुद्धा वय वर्षे 68/6oरुची घेऊन हा कर्यक्रम पाहतो व मनोमन कौतुक मिश्रित हल्लीच्या पिढीचा हेवा करतो.

  3. टिलीमिली हा उपक्रम फार पूर्वीपासून चालू करायला पाहिजे होता, असे वाटत राहिले.- प्रमोद शेंडे

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here