ज्योतिष इतिहासकार शं.बा. दीक्षित

0
206

दापोलीचे शंकर बाळकृष्ण दीक्षित हे ज्योतिष शास्त्रातील विद्वान गणले जात. त्यांनी कालगणना व कालनिर्णय ह्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. . दीक्षित यांनी रॉबर्ट सेवेल यांच्याबरोबर संयुक्तपणे लिहिलेला इंडियन कॅलेंडर हा इंग्रजी निबंध प्रसिद्ध झाला.पां.वा.काणे यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाचा धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्याच्या कामी उपयोग झाल्याचे नमूद केले होते…

दापोलीचे शंकर बाळकृष्ण दीक्षित हे ज्योतिषशास्त्रातील विद्वान गणले जात. त्यांनी कालगणना व कालनिर्णय ह्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते त्याविषयी लेखन ‘इंडियन अँटिक्वेरी’ व ‘इपिग्राफिका इंडिका’ ह्या इंग्रजी मासिकांतून करत असत. ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथामधील एका ऋचेत कृतिका पूर्वेस उगवतात व अजिबात मावळत नाहीत असा उल्लेख आहे. दीक्षित यांनी त्या वर्णनावरून गणित करून ‘शतपथ ब्राह्मण’ ग्रंथाची कालनिश्चिती केली आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी पहिला आर्यसिद्धांत केव्हा लिहिला गेला असावा ते एका निबंधात नमूद केले आहे. ते युरोपीयन विद्वानांच्या अडचणी दूर करून कालनिर्णयासंबंधी शंका निवारण करत असत. ‘गुप्तांचे शक’ या पुस्तकाचे लेखक डॉ. फ्लीट यांनी त्यांच्या पुस्तकात ‘दीक्षित यांच्या मदतीशिवाय गुप्तांचा शककाल निश्चित करता आला नसता’ असे लिहिले आहे. दीक्षित यांनी रॉबर्ट सेवेल यांच्या सोबत ‘इंडियन कॅलेंडर’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला आहे. भारतात सापडणाऱ्या शिलालेख, ऐतिहासिक पत्रे इत्यादी साहित्यात दिलेल्या दिवशी नेमकी इंग्रजी तारीख कोणती होती व तो खरा तोच दिवस होता की नाही हे ठरवण्यासाठी त्या ग्रंथाची सिद्धता करण्यात आली.

शंकर बाळकृष्ण यांचे सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी लिहिलेला ज्योतिष शास्त्राचा इतिहास. असा ग्रंथ त्याआधी आणि नंतर लिहिला गेला नाही. त्यांनी ज्योतिष शास्त्राचा इतिहास लिहिण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्या विषयाचा आवाका लक्षात घेता ते काम त्यांनी एकट्याने कोणत्याही तांत्रिक मदतीविना कसे पूर्ण केले असेल याचे आश्चर्य वाटते. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, की “त्यातील ओळ न ओळ मी स्वत: वाचून त्याची खात्री केल्याशिवाय आणि संदर्भाशिवाय लिहिली नाही.” पुण्यातील ‘आनंदाश्रम’ या संस्थेकडे असलेल्या पुस्तकांचा, हस्तलिखित पोथ्यांचा त्यांना त्या कामी बराच उपयोग झाला. एक दस्तावेज ज्या शिस्तीने लिहावा लागतो ती वैज्ञानिक शिस्त त्यांच्या कामात दिसून येते. त्यामुळे त्यांच्या समकालीन पाश्चात्य संशोधकांनी त्यांच्या कामाची दखल घेतली. त्यांनी रॉबर्ट सेवेल यांच्याबरोबर संयुक्तपणे लिहिलेला Indian Calendars हा निबंध पुढे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. भारतीय कालगणना पद्धतींची शास्त्रीय पद्धतीने मीमांसा त्या ग्रंथात केलेली आहे. डॉ. पांडुरंग वामन काणे यांनीदेखील त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या कामाचा धर्मशास्त्रचातिहास लिहिण्याच्या कामी उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. दीक्षित, मोडक आणि लेले यांनी सुरू केलेले ‘सायन पंचांग’ तीन वर्षे चालले, पण त्यास लोकमान्यता मिळाली नाही. त्यामुळे ते बंद करावे लागले. दीक्षित हाडाचे शिक्षक होते. त्यांची लेखनशैली विषय सोपा करून सांगणारी सुबोध होती. तशी विलक्षण हातोटी त्यांना लाभली होती.

दीक्षित यांचा जन्म दापोली तालुक्यातील मुरुड गावी 20/21 जुलै 1853 रोजी (आषाढ शुद्ध 14, शके 1775) झाला. गावचे उपाध्ये पण त्यांच्या घरात होते. त्यामुळे त्यांचा अभ्यास लहानपणीच झाला. वैदिक विषय, अमरकोश, काव्यव्युत्पत्ती, व्याकरण असे विषय त्या अभ्यासात होते. त्यांचे औपचारिक प्राथमिक शिक्षण मुरुड येथील मराठी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी दापोली कोर्टात नोकरी दोन वर्षे केली. त्यांचा इंग्रजीचा अभ्यास चालू राहिला. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा 1874 मध्ये दिली. त्याच वर्षी ते ट्रेनिंग कॉलेजमधून पहिल्या वर्गातून उत्तीर्ण झाले. त्यांनी इंग्रजीही शिकून घेतले. त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात बाबा गोखले ह्यांनी सुरू केलेल्या इंग्रजी शाळेत 1874 मध्ये केली. ते रेवदंडा येथे 1874-80 ह्या कालावधीत शिक्षक तर ठाणे येथील मराठी शाळेत 1880-82 ह्या काळात मुख्याध्यापक होते. ते बार्शी येथील इंग्रजी शाळेत शिक्षक 1882-89 या दरम्यान होते. ते धुळ्यातील ट्रेनिंग कॉलेजवर शिक्षक 1889-94 ह्या काळात होते. ते पुण्यातील ट्रेनिंग कॉलेजमध्ये 1894 नंतर शिकवू लागले.

परंतु त्यांनी स्वतःला केवळ शिक्षकी नोकरीत अडकावून ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या रोजनिशीत ‘स्वतःच्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे नाहीतर काकोsपि जीवति’ अशा प्रकारचे उद्गार नमूद केले आहेत. कै. विसाजी लेले वर्तमानपत्रात ‘स्फुटवक्ता अभियोगी’ या नावाने सायनवादावर लेख लिहीत असत. त्यांचे लेख दीक्षित यांनी ते रेवदंड्यास असताना वाचले. ते वाचून दीक्षित यांचे लक्ष ज्योतिषशास्त्राकडे वळले. त्यांच्या मनाने ज्योतिषशास्त्र या विषयात प्राविण्य मिळवण्याचा ध्यास घेतला. पुढे, ठाण्यात त्यांची गाठ कै. जनार्दन बाळाजी मोडक ह्यांच्याशी पडली. त्या दोघांनी मिळून ज्योतिषसंबंधाने अनेक उद्योग केले. त्यामुळे दीक्षित यांचा ज्योतिषाचा अभ्यास वाढीस लागला. मोडक यांस ज्योतिष विषयाची खूप माहिती होती. परंतु त्यासाठी लागणारे गणित मात्र दीक्षित करत असत. त्या दोघांसोबत विसाजी लेले एकत्र आले व तिघांनी मिळून सायनमानावर आधारित पंचांग तयार केले. ते पंचाग ठाण्यातील ‘अरुणोदय’ ह्या नियतकालिकात प्रसिद्ध होत असे.

दीक्षित यांनी ज्योतिषशास्त्रावर आधारित सखोल व अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. ज्योतिषशास्त्र सर्वसामान्य लोकांना समजावे ह्यासाठी त्यांनी ‘ज्योतिर्विलास’ अथवा ‘रात्रीची दोन घटका मौज’ हे पुस्तक लिहिले. लोकमान्य टिळक यांनी त्या ग्रंथाबद्दल असा अभिप्राय दिला, की कोणत्याही शास्त्राबद्दल इत्थंभूत पण सोप्या भाषेत माहिती देणारा असा ग्रंथ मराठीत त्या आधी झालेला नाही. त्यांनी ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ अथवा ‘भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथात भारतीय ज्योतिषाचा इतिहास वेदकाळापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतचा आहे. त्या ग्रंथात भारतीय समाजाची ज्योतिषविषयक मते काय होती? ती कशी बदलत गेली? भारतीय ज्योतिषी व अर्वाचीन पाश्चात्त्य ज्योतिषी या दोघांच्या ज्योतिषशास्त्र विषयक मतांमध्ये साम्य व भेद काय आहेत? पंचांग कसे तयार करतात? निरनिराळ्या पंचांगाचे गुणदोष इत्यादी विषयी सखोल लिहिलेले आहे. त्या ग्रंथास बडोद्याचे गायकवाड सरकार व दक्षिणा प्राइज कमिटी यांसारख्या मोठ्या संस्थांकडून पारितोषिके मिळाली.

त्यांनी ज्योतिषशास्त्राव्यतिरिक्त इतरही काही विषयांवर ग्रंथरचना केली आहे. ‘भारतवर्षीय भूवर्णन’ हा त्यांतील महत्त्वाचा ग्रंथ. त्या पुस्तकात वेदपुराणे व इतर प्राचीन ग्रंथ ह्यांमधून ज्या स्थळांचा उल्लेख होतो ती सध्या कोणत्या नावाने ओळखली जातात याविषयी लिहिलेले आहे. दीक्षित मुळात शिक्षक असल्याने त्यांनी त्या अनुषंगाने देखील लिखाण केले आहे. त्यांनी ‘विद्यार्थीबुद्धिवर्धिनी’ या पुस्तकात तत्कालीन मराठी पुस्तकातील कवितांवर माहितीपूर्ण टीका लिहिलेली आहे. शिक्षकांनी कविता कशा  शिकवाव्यात व विद्यार्थ्यांनी त्या कशा शिकाव्यात याबद्दल पुस्तकात मार्गदर्शन आहे. तत्कालीन ‘पब्लिक सर्व्हिस’ परीक्षेत सृष्टिज्ञान हा विषय असे. त्यांनी त्याच्या अभ्यासात उपयोगी असे ‘सृष्टिचमत्कार’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी अंकगणित विषयावर देखील ग्रंथ लिहिला. त्यांची शिक्षक म्हणून ख्याती होती. ते सर्व विषय विद्यार्थ्यांना कळतील अशा सोप्या भाषेत शिकवत. ते विद्यार्थ्यांना ग्रह, तारे इत्यादीविषयी देखील माहिती रात्रीच्या वेळी देत असत. त्यांचे तत्त्व ‘विद्यार्थ्यास शिकवणे म्हणजे केवळ परीक्षेसाठी तयार करणे नाही तर त्याला सुशिक्षित गृहस्थ बनवायचे’ हे होते. ‘गुप्तांचे शक’ या ग्रंथाचे लेखक डॉ. फ्लीट यांनी दीक्षित यांना महसूल विभागात मामलेदारपद देऊ केले होते, पण त्यांनी ते पद विद्याव्यासंग थांबेल म्हणून नाकारले !

त्यांचा सक्त विरोध बालविवाहाला होता. त्यांनी त्यांच्या मुलांची लग्ने अठरा वर्षे पूर्ण व मुलींची लग्ने बारा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय करणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यांनी समाजाचा व कुटुंबीयांचा विरोध न जुमानता ती शपथ पूर्णही केली. दीक्षित प्रख्यात ज्योतिषी असले तरी त्यांचा फल ज्योतिषावर विश्वास नव्हता. वर्षफलाने काही गोष्टी जुळतात तर काही जुळत नाहीत, त्यामुळे त्यांचे मत ज्योतिषशास्त्र व ज्योतिषी ह्यांची कुचेष्टा होते असे होते. त्यांची कार्यपद्धत कोठल्याही गोष्टीचा निश्चित शोध घेऊन मगच स्वत:ची मते ठरवावी ही होती. त्यांनी तिला अनुसरून फलज्योतिषाचे ग्रंथ हाती घेतले. त्यात त्यांना दिसून आले की कालगणनेच्या चुकीमुळे व हलगर्जीपणामुळे अनेक चुका होत गेल्या. त्यांचा मानस त्या चुका शोधून दुरुस्त करण्याचा होता. त्यांनी त्या कामास सुरुवातसुद्धा केली होती, परंतु त्यांचे निधन त्याच दरम्यान, 27 एप्रिल 1898 रोजी प्लेगच्या साथीत विषमज्वराने आजारी पडून झाले.

संकलन –

अश्विनी भोईर

———————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here