जांभेकरांच्या जगभर पसरलेल्या हिरव्या वास्तू

_He_Vishwache_Angan_1.jpg

सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू हे एक सांस्कृतिक विधान असते. कलावंत त्याच्या विचारानुसार कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की आत्मसमाधानासाठी, ही निवड करत असतो. कला विचारपूर्वक निर्माण करणारे कलावंत विरळा असतात. तशा दुर्मीळ कलावंतांमुळे माणसाच्या सांस्कृतिक प्रगतीचे प्रवाह बदलू शकतात; तर बाकीच्या इतरांमुळे बाजारपेठ वाढत जाते.

वास्तुकलादेखील इतर कलांप्रमाणे काळाच्या ओघात बदलत गेली आहे. बांधकामांची संख्या मागणीप्रमाणे वाढत गेली. व्यक्तीचे समाजातील स्थान, तिची श्रीमंती अभिव्यक्त करणारी बांधकामे सर्रास आढळतात. वास्तुविशारद व ग्राहक या दोघांनाही ‘वास्तुकला म्हणजे सुसंस्कृततेचे प्रकटीकरण’ या वचनाचा विसर पडत चालला आहे. अशा वेळी सुधीर जांभेकर यांचे ‘हे विश्वाचे अंगण’ या आत्मपर पुस्तकाचे महत्त्व वेगळे वाटते. जांभेकर अहमदाबादेचे. ते अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांनी तेथे आणि इतर अनेक देशांत वास्तुकलेवर स्वत:चा ठसा उमटवला.

जांभेकर मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समधून वास्तुविशारद १९६४ साली झाले. त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी, नंतर स्वतःचा व्यवसाय केला. ते १९६९ साली अमेरिकेस गेले. ते न्यू यॉर्कमध्ये प्रारूपकार (ड्राफ्ट्समन) या हुद्यावर नोकरी करू लागले. जांभेकर ज्येष्ठ वास्तुविशारदांसोबतच्या अनुभवातून शिकत गेले. अमेरिकेत त्यावेळी प्रचंड वैचारिक घुसळण होत होती. व्हिएतनाममधील अमेरिकी हल्ल्यांच्या विरुद्ध देशभर निदर्शने चालली होती. वर्णद्वेषाविरूद्ध लढ्याचे अहिंसक नेते मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येने वातावरणात क्षोभ होता. तर त्याच काळात मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यामुळे विज्ञान-जगत भारावून गेले होते. साहित्य, चित्रपट, संगीत, वास्तुकला या क्षेत्रांत नवनवीन कल्पनांना बहर येत होता. जांभेकरांनी ते बाह्य बदल मनःपूर्वक समजावून घेऊन त्यानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणले. ते ‘सत्याग्रह म्हणजे काय?’ या प्रश्नावर निरुत्तर झाले. त्यांचे भारतीय इतिहासाकडे दुर्लक्ष झालेले आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांची मान खाली गेली आणि त्यांना खाडकन जाग आली! मग त्यांनी गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग’, पंडित नेहरूंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, रियासतकार सरदेसार्इंचे इतिहासाचे आठ खंड अशी विचार प्रवर्तक पुस्तके भारतातून आणवून वाचण्याचा सपाटा लावला. त्यातून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच वेळी जांभेकरांनी कोलंबिया विद्यापीठातून स्थापत्य व नगरररचना या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी वास्तुरचनेचा अनुभव चौदा वर्षें घेतल्यानंतर मार्क स्ट्राउस या मित्रासोबत ‘जांभेकर-स्ट्राऊस आर्किटेक्ट्स’ कंपनी स्थापून व्यवसायात उडी घेतली. त्यांच्या समोर न्यू जर्सी शहराच्या लाईटरेल स्टेशनची रचना करण्याचा प्रस्ताव आला. तेथे जमिनीच्या खाली एकशेसाठ फुटांवर रेल्वे धावते. डोंगरातील उभा बोगदा आणि

त्यावरील स्टेशन हे नदीकाठच्या दोन्ही लोकांना सोयीचे होते. ती रचना आखताना जांभेकरांनी निसर्गतः लाभलेल्या प्रागैतिहासिक काळातील प्रचंड खडकाचा छतासारखा वापर केला. लाल रंगातील विटा आणि काच यांचा उपयोग करून नैसर्गिकता जपली. नंतर जांभेकरांकडे अमेरिकेतून उत्तम कामांचा ओघ चालू झाला. तेथे सामान्य माणसांच्या सुविधा आणि सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाते. बालके, वृद्ध आणि अपंग यांचा सहज वावर व्हावा याचा विचार केला जातो. कोठलाही मोठा प्रकल्प करताना अभियंते, तंत्रज्ञ आणि वास्तुविशारद यांना एकत्र येऊन काम करावे लागते. जाभेकरांनी तसे प्रकल्प कौशल्याने पूर्ण केल्यामुळे त्यांचा लौकिक वाढू लागला. त्यांच्याकडे दुबई, रियाध, बगदाद, दोहा अशा मध्यपूर्वेतील महानगरांमधील कामे येऊ लागली.

जांभेकरांनी दुबईमधील मरिना टॉवर या चाळीस हेक्टरवरील मध्यमवर्गीयांच्या निवासी रचनेसाठी हवेत झेपावणाऱ्या हाताच्या बोटांसारख्या इमारतींची पर्यावरणस्नेही रचना केली. पाण्याला अडथळा न समजता त्याचा कालव्यासारखा वापर केला. नैसर्गिक वायुविजनाची सोय केली. अरबस्तानातील वाळवंटी रियाद (मूळ अर्थ उद्यान) मध्ये मशीद उभी करताना दिवसाचा असह्य उष्मा सहन करण्यासाठी जाळीदार भिंत केली. सभोवताली झाडी ठेवून पाणी खेळवले. त्यामुळे पूर्ण वास्तू पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो. त्या वास्तुरचनेला अनेक पुरस्कार लाभले.

_He_Vishwache_Angan_2.jpgबांधकाम करताना कमीत कमी सामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, निसर्गाला त्रास देऊ नये, बांधकामाचा वापर सुरू झाल्यावर वीज, पाणी या नियमित खर्चात काटकसर साधली जाईल अशा पर्यावरण स्नेहाच्या कल्पना युरोपमध्ये व अमेरिकेत स्वीकारल्या गेल्या. तिकडे पर्यावरण रक्षणासंबंधीच्या नियमांचे पालन कसे होते त्यावर इमारतींची गुणवत्ता ठरते. जांभेकर व त्यांची संस्था यांनी ‘हरित वास्तू’स प्राधान्य दिले. त्यांच्या अनेक इमारतींना त्या उत्तम रचल्या गेल्या असल्याचे प्रमाणपत्र लाभले. पायाभूत सुविधांची, शैक्षणिक-सांस्कृतिक- व्यावसायिक व निवासी रचना करताना अनेक पातळ्यांवर विचार करून वास्तुकला साकारावी लागते. जांभेकरांचे समाज आणि कला यासंबंधीचे चिंतन पुस्तकात अनेक ठिकाणी वाचावयास मिळते.

जांभेकर यांना भारतीय व पाश्चात्य संगीत, चित्र, काव्य यांमध्ये रूची आहे. ते तशा वातावरणात रममाण होतात. त्यांनी जयदेव यांच्या गीतगोविंदवरील कांगडा शैलीतील चित्रे, रामकुमार- सुझा- जेमिनी रॉय यांची चित्रे, तांबे व पाडगावकर यांच्या कविता, कुमार गंधर्व व भीमसेन जोशी यांचे गायन यांविषयी भरभरून लिहिले आहे. त्यांचे सर्व कलांमधील निर्मितीविषयीचे कुतूहल पुस्तकात वारंवार जाणवत राहते. त्यांचा स्थिर स्वरूपाच्या वास्तुकलेमध्ये संगीतातील प्रवाहीपणा आणण्याचा ध्यास अपूर्व आहे.

पूल ही केवळ स्थापत्यरचना नसून सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे, त्याची प्रचीती त्यांनी रचलेल्या दुबईच्या खाडीवरील पूल देतो. अरबी लिपीसारख्या लफ्फेदार वळणांचा तो ओघवता नयनमनोहर पूल म्हणजे पाण्यावरील प्रवाही अक्षरेच वाटतात. रात्रीच्या

प्रकाशात ती वलयांकित रचना पाण्यावर चंद्रकोरीचा (तर कधी पूर्ण चंद्राचा) भास निर्माण करते. पाच खाड्यांना पार करणारा तो बारा पदरी पूल मेट्रो स्टेशनपर्यंत जातो. त्या पुलाच्या सान्निध्यात पक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र ठेवले आहे. नवी व जुनी दुबई, सांस्कृतिक व भावनिक बंध यांना सांधणाऱ्या त्या पुलाची चर्चा जगभर झाली. जांभेकरांनी दोहा येथील विमानतळापासून सहा किलोमीटर लांबीचा पूल बांधताना पाण्याखालून बोगदा आणि बाहेर दोन पूल दिले. ती रचना समुद्रलाटांमध्ये शुभ्रशिंपले तरंगत असल्याचा भास निर्माण करणारी आहे.

जांभेकर शहरीकरण, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक बांधिलकी या तीन घटकांविषयीच्या चिंतनातून वास्तुरचना (डिझाइन) निर्माण झाली पाहिजे असे म्हणतात. झोपडपट्टी हटवून नवी वस्ती केल्यास शहराचा तो भाग निकामी अवयवासारखा होईल. गरीब वस्तीत घुसमटणाऱ्या माणसांना नव्या उमेदीने मूळ प्रवाहात आणता येईल. मुंबईतील आर्किटेक्चरल स्कूल्सना एकत्र आणून धारावीच्या पुनरुत्थानासाठी आखणी करावी अशी त्यांची सूचना आहे.

लेखकाचे वास्तुकलेमधून होणारी अभिव्यक्ती आणि वास्तुरचनेची प्रक्रिया यांविषयीचे चिंतन पुस्तकात ठिकठिकाणी विखुरले गेले आहे. ते एकसंध असते तर अधिक परिणामकारक झाले असते. जांभेकर यांची वास्तुकलाविषयक दृष्टी अमेरिकेतून अवघ्या जगाला भिडल्यामुळे प्रगल्भ होत गेली आहे याचा प्रत्यय पुस्तकात वारंवार येतो. वास्तुकलेसमोरील आव्हाने, मागणी व बाजारपेठ यांचा परिणाम कसा होतो? तंत्रज्ञानातील प्रगती, आर्थिक सुबत्ता यामुळे वास्तुकला अधिक सुसंस्कृत झाली काय? जगातील विविध देशांतील समाजमन वास्तूमधून कसे व्यक्त होत आहे? यासंबंधी जांभेकरांचे विस्तृत भाष्य आवश्यक होते.

वास्तुकलेसंबंधीची जाण वाढवणारी पुस्तके मराठी वाचकांच्या वाट्याला क्वचित येतात. विश्वाचे अंगण हे आंदण मानून वास्तुकलेची महती उलगडून दाखवणारे हे पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचले पाहिजे.

‘हे विश्वाचे अंगण – वास्तुरचनाकाराची कहाणी’

राजहंस प्रकाशन

पृष्‍ठसंख्‍या- 188

किंमत – 350 रुपये

– अतुल देऊळगावकर

atul.deulgaonkar@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.