चित्राद्वारे कथाकथन करणारा चित्रकथी समाज

चित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी चित्रकथी समाज रात्रभर रामायण, महाभारत आणि पुराणे यांतील कथांवर तयार केलेल्या चित्रांनुसार निरुपण करत असे. हुबेहूब चित्रांमधून आणि प्रभावी संवाद कौशल्यातून कथा जिवंत करण्‍यात त्‍या समाजाचा हातखंडा असे. महाराष्ट्रात चित्रकथींच्‍या पैठणशैली आणि पिंगुळीशैली अशा दोन शैली प्रसिद्ध आहेत. मानवाला जेव्हा लिखित भाषा अवगत नव्हती, त्याकाळी चित्रभाषेचा जन्म झाला. विविध प्रकारची चित्रे काढून त्याद्वारे कथाकथन करण्याची कला मानवाने निर्माण केली. रामायण, महाभारत यांसारखे धार्मिक ग्रंथ हे प्रथम चित्रांच्या भाषेत प्रकाशित झाले व चित्रांच्या भाषेतूनच त्या ग्रंथांचे वाचन सुरू झाले. गावोगावी भटकंती करून मंदिरे, धमर्शाळा यांमधून चित्ररूपी ग्रंथांचे वाचन करणारा एक समाज निर्माण झाला. तो चित्रकथी समाज होय.

चित्रकथी चित्रांद्वारे जी कथा सांगतात त्याला ‘पोथी सांगणे’ असे म्हणतात. दीड बाय दोन आकाराच्या कागदाच्या तुकड्यांवर ही चित्रे काढली जातात. चित्रे काढण्यासाठी लाल, काळी माती, पांढरा शाडू, हिरव्या रंगासाठी झाडांची पाने अशा निसर्गातील रंगांचा वापर केला जात असे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, पिंगुळी परिसरातील ‘ठाकर’ समाज हा चित्रकथी समाज म्हणून ओळखला जातो. त्या समाजातील लोकांनी त्यांच्या परंपरेचा वारसा टिकवून ठेवला आहे. चित्रकथी गणेशोत्सव आणि नवरात्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोथ्या सांगण्याचे काम करतात.

पिंगुळी आणि पैठणशैली प्रमाणेच राजस्थानी चित्रकथीशैलीही प्रसिद्ध आहे. गणपत सखाराम मसगे व डॉ. वसंत गंगावणे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोककलावंत, अभ्यासकांनी चित्रकथी लोककलेला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. गणपत सखाराम मसगे यांना त्या कलेच्या प्रसारासाठी ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

सोमेश्वराच्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात चित्रकथीची व्याख्या दिलेली आहे ती अशी:

वर्णकै: सह यो वक्ति स चित्रकथको वर: गायका यव्र गायन्ति विना तालैर्अनोहरम्

त्याचा अर्थ असा – वर्णकांच्या म्हणजेच चित्रांच्या साहाय्याने जो कथा कथन करतो, तो श्रेष्ठ चित्रकथक होय. या कथाकथनाच्या कार्यक्रमात तालाविना मनोहर गायन केले जाते. चित्रकथी तालाविना गातात असे म्हटले गेले असले तरी प्रत्यक्षात मंजिरी, वीणा व मृदुंग या वाद्यांचा वापर चित्रकथी पोथी सांगताना करतात. चित्र, गीत आणि वाद्य या त्रयींनी युक्त असे चित्रकथींचे कार्यक्रम असतात. चित्रकथी चित्रांच्या साहाय्याने बभ्रुवाहन, सीताहरण, शिवाला मोहिनी घालणारी भिल्लीण, ‘हरिश्चंद्र-तारामती’, ‘द्रौपदी वस्त्रहरण’ आदी आख्याने सादर करतात. त्या विशिष्ट कथांच्या चित्रांना सेट्स असे म्हणतात. गणपत सखाराम मसगे यांच्याकडे असे पंधरा सेट्स उपलब्ध आहेत.

‘ठाकर’ समाजात चित्रकथींची परंपरा असून जाधव, मोरे, पवार, साळुंखे अशी त्यांची आडनावे असतात. पालीचे कणीस, मोरपंखी सुरी, साळुंखीचा पंख अशी त्यांची ‘देवके’ आहेत. देवकांवरून त्यांची आडनावे पडलेली आहेत. तुळजापूरची भवानी, जेजुरी, पालपेंबरचा खंडोबा, रत्नागिरीचा ज्योतिबा, कोल्हापूरची महालक्ष्मी ही चित्रकथींची कुलदैवते होत.

पशुपालन हा चित्रकथींचा जोडधंदा आहे. चित्रकथी बाहुल्यांचेही खेळ करतात. त्यांना बाहुलेकार असेही म्हटले जाते. शिवशाहीत गुप्तहेराचे काम करणा-या बाहुलेकार, चित्रकथींना गावोगावची वतने देण्यात आली होती. त्या वहिवाटीला ‘लाकी’ असे म्हणत. ज्या भागाची ‘लाकी’ असते तेथील शेतकरी चित्रकथीला भाताची कवळी देत. मसके, मसगे, बावलेकर, ठाकर, ठाकूर, रणसिंग, सिंगनाथ, येलकर, पालते, रसनकुटे, गरुड, गंगावणे, ठुंबरे, ठोंबरे, गवाणकर, म्हसकर, यजमळ, पांगुळ, शटूल, भोरजकर, गोदीयाळे अशी चित्रकथींची कुलनामे आहेत. ती कुलनामे आणि कुलदैवते यांचा सिद्धनाथ, गंगावणे (सिदोब), रणसिंग (केदारलिंग), आटक (खंडोबा), ठुंबरे (भवानी), मसके(मेसाई), येलकर (येसाई), रसनकुटे, गरुड (भवानी) असा संबंध असतो.

चित्रकथी समाज हा लाकडी पट्ट्यांवरील चित्रांद्वारे किंवा छापील चित्रांद्वारे भविष्य व कथाकथन करून स्‍वतःची उपजीविका करत असत. ते निरुपण, संवाद व गायन याद्वारे कथाकथनात सहजस्फुर्तता आणि उत्स्फुर्तता आणत. पुराणातील कथा पदबंधातून सादर करताना या प्रत्येक पदबंधावर चित्रकथी निरुपण करत असतो. डाव्या हाताने मंजिरी वाजवत उजव्या हाताने वीणावादन करत चित्रकथी चित्रे बदलत असतो व त्यावर कथा सांगतो.

ऋद्धी-सिद्धींसह गणेशाचे अवतरण, सरस्वतीचे आगमन, सरस्वतीकडून उपदेश, रामायण-महाभारतातील कथाकथन असे चित्रकथीचे स्वरूप असते.

दे पायाची जोड मोरया दे पायाची जोड
तुजवीण कवणा शरण मी जावूङ्गरिीनाम तुझे बहु गोड

या गणेशवंदनानंतर सरस्वतीवंदन व त्यानंतर नंदीपुराण, विष्णुपुराण, काशी खंड या ग्रंथांमधील निवड कथांवरील चित्रसंचाच्या कथा चित्रकथी सादर करतात.

पिंगुळीचा अपवाद वगळता चित्रकथींची परंपरा संपुष्टात आली आहे. भविष्य सांगण्याचे व धार्मिक ग्रंथ वाचण्याचे काम ब्राह्मण समाज करत असल्याने व सकृतदर्शनी तो अधिक पद्धतशीर, कागदपत्रांच्या आधारे व शास्त्रीयदृष्ट्या करतो हे भासत असल्याने अधिक विश्वासार्ह वाटतो. त्या समाजाला जातिव्यवस्थेने धर्मसंमत अधिकार दिले आहेत. चित्रकथी समाज उपेक्षिताचेच जिणे जगत आहे. महाराष्ट्रात चित्रकथींचे अठ्ठ्याहत्तर सेट्स उपलब्ध आहेत. त्या परंपरेतील ग्रामदीक्षितांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संकीर्तनाची परंपरा कायम ठेवली आहे. कोकणासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांत; तसेच, पुणे जिल्ह्यातील काही भागांत हा समाज आढळून येतो. महाराष्ट्रात या समाजाची भटका विमुक्त समाज म्हणून शासनाकडे नोंद आहे.

भविष्य सांगण्यासाठी व धार्मिक ग्रंथांच्या कथा चित्राद्वारे कथन करण्यासाठी गावोगाव तो समाज भटकत राहिल्याने त्या समाजात शिक्षणाची क्रांती झाली नाही. महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांकशुल्क विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहनराव ठोंबरे हे या समाजातील पहिले शिक्षित होत. पुणे जिल्ह्यातील जामुर्डी मामुर्डी गावचे ठोंबरे घराणे हे चित्रांद्वारे भविष्य सांगण्याचे काम करत आहे. मोहनराव ठोंबरे यांनी शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अशी महत्त्वाची पदे भूषवली. त्यानंतर जळगावचे प्रमोद पवार हे अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण घेऊन गटविकास अधिकारी या पदावर रुजू झाले. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी व माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अप्पर सचिव म्हणून राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत आहेत. त्या दोन उच्चपदस्थ अधिकार्यांननी या समाजात शैक्षणिक क्रांतीची बीजे पेरली व त्या समाजातील असंख्य मुलांनी शिक्षणाची कास धरली आहे.

– सूर्यकांत भगवान भिसे

About Post Author

4 COMMENTS

  1. पण मग काही लोक चित्रकथी
    पण मग काही लोक चित्रकथी म्हणजेच गोंधळी असे का म्हणतात?

  2. Apan lihiyelya lekhachya
    Apan lihiyelya lekhachya mdhyamatun durlakshit samajavishi mahatvachi mahiti milail. Tiche itihas abhyasat mahatv ahe.

  3. kala anj samskritivar prakash
    kala anj samskritivar prakash takanara lekh ahe. itihasachya abhayasas upyukta !

  4. मागील चाळीस वर्षांपूर्वी
    मागील चाळीस वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यात देवराव अवताडे(समाजकल्याण आधिकारि) वाकोडे साहेब(पी एस आय) भीमराव सुपालकार रुपेश लाड रमेश लसनकुटे(इंजिनिअर)याशिवाय प्रोफेसर शिक्षक ड्रॉक्टर इंजिनिअर व लंडन ला रहात असलेले सुभाष वनारसे(इंजिनिअर) असे अनेकजण शिकलेले व उच्च पदावर पोहचलेले आहे मी स्वतः “महाराष्ट्रातील चित्रकथी समाजाच्या राजकीय नेतृत्वाचा चिकित्सक अभ्यास”या विषयावर पी एच डी करीत आहे

Comments are closed.