गंमत एका अक्षराची आणि शब्दाची!

0
24

'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे' आणि 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.' या दोन विधानांमध्ये केवळ 'च' या एका अक्षराचा फरक असला तरी विधान उच्चारल्यानंतर त्यातल्या गर्भितार्थात मोठाच फरक पडतो. आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण एका कार्यक्रमाला भेटले.

यशवंतरावांना तो 'च' खटकत होता. त्यांनी अत्र्यांना विचारले, ''अत्रे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे तुमचे विधान ठीक आहे, पण तुम्ही तो 'च' कशाला मधे घातला?''

'' अहो, तो अतिशय महत्वाचा आहे.'' अत्रे म्हणाले.

'' 'चला' एवढे महत्व द्यायचे कारण काय? ''

'' अहो, 'च' किती महत्त्वाचा असतो हे मी का तुम्हाला सांगायला पाहिजे.''

'' तुमच्या आडनावातला 'च' काढला तर मागे काय राहतं व्हाण!'' अत्रे मिष्किल हसत म्हणाले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या नेत्यांची बैठक बेळगाव प्रश्नावर भरली. बेळगाव कर्नाटकातच का असावे याबद्दल कन्नडीगा नेत्यांनी आपले पुरावे, दाखले दिले. त्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी उत्तर दिले. आणि आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यपर्थ पुरावे, दाखले सादर केले. दोन्ही बाजूंकडून दावे जोरदार मांडले जाऊ लागले.

शेवटी, देशपांडे आडनावाच्या एका कन्नड नेत्यांनी अफलातून मुद्दा मांडला. ते म्हणाले  ''ते बेळगावचे नाव आहे ना! त्यातली पहिली दोन अक्षर घेतली तर 'बेळ' शब्द बनतो, तो कानडी असतो. म्हणून म्हणतो ते बेळगाव कर्नाटकालाच देऊन सोडा.''

यावर कोणाला काय बोलावे हे सुचेना. पण असल्या बालिश दाव्याने नामोहरम होतील तर ते अत्रे कसले?  ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, '' नावातल्या पहिल्या दोन अक्षरांनी तयार होणारा शब्द हाच निकष वापराचा असेल तर उद्या कोणताही मराठी माणूस थेट लंडनवर आपला अधिकार सांगेल.''

यानंतर एवढा मोठा हशा पिकला की ते देशपांडे आडनावाचे गृहस्थ आपल्या विधानासह त्या हास्यलाटेत पार वाहून गेले.

About Post Author