ख आणि सुख-दुःख

2
21
carasole

‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख या शब्दाचा अर्थ आकाशा! विश्व हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा पंचमहाभूतांनी निर्माण झाले आहे. त्यातील आकाश महाभूत म्हणजेच ‘ख’. त्यावरून आकाशातील ग्रहांना ‘ख’गोल आणि त्यांच्या अभ्यासाला ‘ख’गोलशास्त्र म्हटले जाते. ख म्हणजे आकाशात, ग म्हणजे गमन करणारा तो ‘खग’ (पक्षी). आकाशात दिव्यासारखा चमकणारा खद्योत म्हणजे काजवा. खगंगा म्हणजे आकाशगंगा, खवल्ली म्हणजे आकाशवेल. खनगर (= गंधर्वनगर), खस्थानं (= घरटे,ढोली), खद्रुः(= चारोळी) तर खहरः म्हणजे शून्याने भागलेली संख्या (= अनंत) असे अनेक शब्द ‘ख’ पासून तयार झाले आहेत.

त्याशिवाय ख शब्दाचे सूर्य, स्वर्ग, इंद्रिय, हृदयाकाश, छिद्र, पोकळी, शून्य-टिंब, जखम, कर्म, ब्रह्म, ज्ञान, शेत, अभ्रक आणि शहर असे अर्थ गीर्वाणलघुकोशात दिले आहेत.

मनुष्याचे शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. शरीरातील सूक्ष्म पोकळ्या म्हणजेच स्रोतसं ही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. शरीराचे दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, तोंड, गुद्द्वार, आणि मूत्रद्वार ही नऊ द्वारे आहेत. ती द्वारेही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. त्यातील सर्वांत मोठे आणि मुख्य ख म्हणजे मुख किंवा तोंड तर शरीरात जेथे ‘ख’ अजिबात नसते असा अवयव म्हणजे नख.

शरीरातील त्या पोकळ्यांच्या अवस्थेवर शरीराची अवस्था अवलंबून असते. जेव्हा पोकळ्यांत दोष साठतात, त्यांच्यात अवरोध निर्माण होतो तेव्हा शरीर अस्वस्थ होते आणि व्याधीअवस्था निर्माण होते. शरीरातील आकाश बिघडल्यामुळे रोग निर्माण होतात म्हणून रोगाला दुःख असे म्हटले जाते. तर शरीरातील सर्व स्रोतसे म्हणजेच आकाश महाभूत सुस्थितीत असेल तर मनुष्य निरोगी अवस्था अनुभवतो. त्यालाच सुख असे म्हटले आहे.

समर्थांनी ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असा प्रश्न मनाला विचारून त्याचा शोध घेण्यास सांगितले आहे. त्या प्रश्नाचे उत्तर अर्थातच कोणीही नाही असे आहे. त्याचे कारण निरोगी अवस्था म्हणजेच सुखावस्था सदा सर्वकाळ टिकवणे जवळ जवळ अशक्य असते. अनेक व्याधींची मूळे जन्मजात असतात. तसेच काल, आहार-विहार, वय अशा अनेक कारणांनी शरीरातील त्रिदोषांची साम्यावस्था सतत बिघडत असते आणि त्यामुळे मनुष्य व्याधीअवस्था म्हणजेच दुःख अनुभवत असतो.

हे सर्व समजून घेतल्यानंतर एक गोष्ट ध्यानात येते की, सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी ‘ख’ महाभूतावर अवलंबून असतात हेच ‘ख’ रे !

-उमेश करंबेळकर

About Post Author

Previous articleसचिन केळकर – डिजिटल द्रष्टा
Next articleप्रतीकदर्शन रांगोळी
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here