आवडती ‘बेक्कार’ नगरी बोली (Nagari Dilect)

नगरी बोली ही ठळकपणे उठून दिसणारी नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरीया मराठीच्या बोलींना जसे स्थान लाभले तसे नगरी बोलीला मिळालेले नाही. पण काय करू राह्यला?’, ‘काय बोलू राह्यला!’, ‘जेऊ राह्यला’, ‘खाऊ राह्यलाअसे बोल ऐकण्यास मिळाले, की अहमदनगर जिल्ह्यातील व्यक्ती आसपास आहे असे हमखास समजावे. नगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तो तसा त्याच्या भौगोलिक ठेवणीमुळे घडला आहे. उत्तर बाजूने खानदेश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे अशी भौगोलिक रचना. त्यामुळे आसपासच्या त्या प्रदेशाचा मोठा प्रभाव नगर जिल्ह्यातील लगतच्या कोपरगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा या तालुक्यांवर पडला आहे.
अहमदनगरजिल्ह्यातील लोकांसाठी नगरीहा शब्द वापरला जातो. त्याचे कारण त्या जिल्ह्यातील बोलीच्या वेगळेपणात आहे. मुस्लिम वस्ती तेथे मोगलांच्या काळापासूनची आहे. तो प्रभाव आहेच. नगरी बोलीचे वेगळेच रसायन त्या सर्व मिश्रणातून तयार झाले आहे. शब्दांवर दाब देत व हेल काढत बोलण्यापासून मराठी-हिंदीच्या सरमिसळीपर्यंत अनेक गोष्टी त्यात मिसळून गेल्या आहेत. त्यामुळे तेथील भाषेला संमिश्र रूप प्राप्त झाले आहे. स्वत:ची फार वैशिष्ट्यपूर्ण बोली वगैरे असे काही तेथे नसून, खेडूत लोकांनी जपलेली भाषा असेच तिला म्हणावे लागेल. तेथील मूळ बोली, दिवसेंदिवस सुशिक्षित बनत चाललेल्या नव्या वर्गाला सहज उमगत नाही. मात्र, जिल्ह्यातील काही अल्पशिक्षित नेतृत्व त्या भाषेचा वापर करत असते. त्यांना बऱ्याच गोष्टी म्हाईतीनसतात. त्यांना आजुबाजूच्या माणसाला भावड्याम्हणून सहजच पुकारणे वावगे वाटत नाही. ते नातेवाचक शब्दांत बहिणीऐवजी भयीन’, तर आईला बय’, ‘बईम्हणून संबोधतात. वडिलांनादादाम्हटले जाते. आत्याला मावळणहा शब्द वापरला जातो. तेथील बोलण्याची सुरुवात क्काय राऽऽ व’, ‘अय भ्भोव’, ‘तर्रऽऽ मऽऽ ग’, ‘लयऽऽ भारी’, ‘त्या माह्यचा’, ‘ब्वॉ ऽऽ कसं सांगावं?’ अशी असते. माझं-तुझंहे तेथे माव्हं-तुव्हं(माह्यं-तुह्यं) बनते. कर्जत-जामखेड तालुक्यांत तेचमपलं-तुपलंबनते. माह्यावलं, तुह्यावलं(माह्यावालं, तुह्यावालं) हे शब्दप्रयोग होत राहतात. बऱ्याच वेळा,‘अक्षरावर अनावश्यक जोर देऊन बोलण्याची प्रथा आहे. गोदावरी, मुळा, प्रवरा या नद्यांच्या काठांवर, सीनेच्या उगमापासून तेथील लोकांच्या बोलीत प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलण्याने नगरची बोली आकाराला आली आहे. मूळ व्यवसाय दुग्धोत्पादनाचा व तो गवळी समाजाच्या सोबतीने इतरही अनेकजण करत असल्याने, गाईच्या (गावडीच्या) आचळावर दाब देऊन दूध काढण्याची रीत त्यांच्या बोलण्यातही अवतरली असावी. जनावरांनाही- म्हशीला म्हसाड’, गाईला गावडी’, शेळीला शेरडी’, कुत्र्याला कुत्तार्डीअसे न्यारेच प्रयोग तेथे आहेत. मीतेथे म्याबनतो, तर मलाचा मालाहोतो. च्या जागी होतो, ‘हाच्या जागी वाहोतो. म्हणून डोहातचा डवातहोतो आणि डोहातचा ढवातही होऊ शकतो. च्या जागी आणि करण्याची प्रवृत्ती आहे, इथं-तिथं चे इठं-तिठंतर काही भागांत इढं-तिढं होते, तर पोहण्यासाठी पवायलाअसा शब्द होतो.
मराठीतील अव्वल ग्रंथलेखक, महानुभावांचे म्हाइंभट यांच्यासह अनेक ग्रंथकार आणि लीळांची स्थाने नगरमधील आहेत. ज्ञानेश्वरीनाथपंथीययांचे अमर-शिष्य संवाद येथपासूनचे लेखन त्याच परिसरात घडले. शेख महंमद, चाँद बोधले अशा सुफी संप्रदायींचे लेखनही तेथे झाले. तो भाग, शिवकाळातील मोजका काळ स्वराज्याचा वगळता मध्ययुगीन काळापासून निजामाच्या राज्याचा होता (अहमदनगरची निजामशाही). ख्रिश्चनांची पहिली मंडळीदेखील सर्वात आधी अहमदनगरला येऊन धडकली आणि मिशन कम्पाउंडमधील वेगळी मराठी कविवर्य ना.वा. टिळक, ख्रिस्तपदनिर्माते कृ.र. सांगळे यांनी तेथेच पुण्यमय करून सोडली. मेरीला माझे प्रेम देअसे ‘Give my love to Mary’ हे खास इंग्रजी भाषांतर या ख्रिश्चन कंपाउंडमधीलच! त्याची नोंद मूळ नगरचे, प्रख्यात साहित्यिक आणि वीणा मासिकाचे (कालावधी 1929ते 1999) संपादक उमाकांत ठोमरे यांच्या लेखनात सापडते. सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे दिनमित्रमधील लेखन; तसेच, ‘कुलकर्णी लीलामृत’, ‘डढढाशास्त्री परांने हे लेखन तत्कालिन नगरी बोलीचा प्रत्यय देते.
दक्षिण नगर जिल्हा हा तसा कोरडा. तेथे खरी नगरी बोली नांदते. जामखेड हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार. तेथे आपुलकीला आलुनकीम्हणण्याची रीत आहे. काय चाललंय लेकाऐवजी काय चाललं, लकाअसे तेथे ऐकण्यास येते. लोक त्याकाळी समृद्ध बेलापूरला पोट भरण्यासाठी जात. आज कोणीही कोठेही पोट भरण्यासाठी गेला तरी त्याला बेलापूरला जाणंअसेच म्हणतात. बालाघाट, गर्भगिरी डोंगराच्या रांगांतून ये-जा करणाऱ्या कष्टकऱ्यांचे जिणे कष्टदायक आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे पडणारे दुष्काळही तीव्र आहेत.
पाथर्डी तालुक्यात उसतोड कामगारांची बोली स्वतंत्र असल्यासारखी परिस्थिती आहे. तांड्यावर बोलली जाणारी बंजारा बोली ही स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ऊसतोड कामगार त्या मिश्रणाची नगरी बोली बोलतो. शब्दांचे महाप्राण उच्चार अल्पप्राण बनवण्याची त्यांची पद्धत मजेशीर म्हणावी लागेल. जसे भाकर – बाहाकर,भगुनं – बहगुनं, धोतर – दोहोतर – दोहथर, घमेलं – गहमेलं असे वेगळे उच्चार असतात.
मढी या तीर्थस्थळी अखिल भारतीय भटक्या जमातींची जत्रा भरत असते. त्यात होणारे जात पंचायतीचे न्यायनिवाडे गाजत असत. पण त्यातून अनेक शब्द नागर समाजाला माहीत होत. पळी – घरून पळून जाणारी, फलका – नपुंसक, पाकळीबंद – मार्ग बंद असलेली असे कितीतरी शब्द संपूर्ण सांस्कृतिक अर्थासह जाणून घेतले तर कळतील. त्यांची परिभाषा तशी स्वतंत्र आहे. मढीच्या जत्रेत डील्लं, घेटलं, मागिटलं असे शब्द ऐकले तरी वैदू किंवा तत्सम कोण बोलत आहे ते नेमकेपणाने ओळखता येते.
नगर जिल्ह्यात इर्जिकाची परंपरा जुनी आहे. तो शब्द तेथूनच इतरत्र गेला असावा. शेतीची नवनवीन तंत्रे आली, पण मोट-नाडा होत्या त्या काळाची काही शब्दांची जागा, त्या वस्तू जाऊनही या-ना त्या कारणाने तेथे उच्चारात आहेत. मोट, नाडा, चऱ्हाट, कासरा, सौंदर, येसन, येठन, खुर्दर, हातनी, जू, शिवळ, धुरा असे शब्द तेथे ऐकण्यास मिळतात. आदिवासी-कोळी, ठाकर यांची स्वतंत्र बोली बोलणारे समूह कोकणकड्याच्या अकोले, संगमनेर व निकटच्या राहुरी तालुक्यांत आढळतात. त्याविषयी गोविंद गारे प्रभृतींनी मोठे काम केले आहे. मात्र, त्यामुळे तेथील इतर समाजघटकांची भाषा बदलली आहे. दया पवार यांच्या बलुतंया आत्मकथनात त्याचा नमुना सापडतो. कीर्तनकार निवृत्तिमहाराज देशमुख यांच्या बोली-उच्चाराचा अभ्यास केल्यास बराच उलगडा होईल. खायलाचम्हणतानालोप पावून खालाचं’, तसेच जालाचं’, ‘प्यालाचंअशी रूपे तेथे वापरात आहेत. राम नगरकर यांचा रामनगरीहा एकपात्री प्रयोग पूर्णत: नगरी बोलीत असे. त्यामुळे नगरची भाषा सर्वदूर गेली. अप्पा कोरपे यांचे मी तो हमालहे आत्मचरित्र हा नगरी बोलीचा उत्तम नमुना होय. दादासाहेब रूपवते यांचे फर्डे वक्तृत्व अकोल्यातील बोलीचे वैशिष्ट्य होते. रंगनाथ पठारे यांच्या काही कादंबऱ्यांत नगरच्या बोलीचे पडसाद आहेत. अण्णासाहेब देशमुख यांनी गोधडीहे आत्मकथन लिहिले. त्यांच्या कादंबरीत त्या बोलीचे वळण आढळते. त्यातील करतानी, जातानी, खातानी, पितानी, येती, जाती, उठती, बसती, खाती, पिती, चालती, येयेल हे, जायेल हे, पाहेल हे- ही रूपेदेखील ऐकण्यास गोड वाटतात. मधुकर तोरडमल यांनी नाटकात साकारलेली काही पात्रे आणि त्यांच्या लकबी खास नगरी होत्या. सदाशिव अमरापूरकर हे तसेच नगरी कलावंत आहेत. त्यांची मराठी हिंदी ऐकणे हा एक अनुभवच ठरला होता. मिलिंद शिंदे हा गुणी अभिनेता नगरी बोलीचा लहेजा चित्रपटात वापरतो.कुमार सप्तर्षी यांनी लोकसत्ता दैनिकात लिहिलेल्या राम राम पाव्हनंया सदरात नगरी बोलीचा बुजूर्ग व्यक्तीकडून वापर झाल्याचे महाराष्ट्राने वाचले आहे. तर, अहमदनगर आकाशवाणीवरील लोकप्रिय ठरलेल्या नगरी नगरीया किरण डहाळे यांच्या विनोदी निवेदनात साकारलेल्या साप्ताहिक कार्यक्रमात नगरी बोलीचा प्रत्यय सर्व श्रोत्यांना आला आहे. डाव्या चळवळीचे नेते शाहीर भास्करराव जाधव यांची गाणी नगरी बोलीचा आवर्जून पुरस्कार करत.
          शेतकरी शेतात रोप/पिक लावताना त्याच्या बाजूची माती बाजू बाजूने उकरून त्याच्या मध्ये पाणी टाकत असे. त्याला आळेकरणे म्हणतात. शेतकरी जेवतानाही भात बाजूला करून त्यात कढी किंवा आमटी टाकतो. त्यामुळे त्यालाही तो आळे करणे असेच म्हणतो. वाफसाअसेल तर पीक पेर करणे उत्तम समजले जाते. पण येथे भूक नसेल, जेवण जाणार नसेल तर वाफसा नाहीअसे म्हणतात. सहकारी कारखान्यात ऊस गेटावर नेऊन मोजून देणे आणि तेथेच पैसे घेऊन मोकळे होणे याला गेटकेनम्हणतात. तीच पद्धत विवाहात आली आहे. आता, विवाहहीगेटकेनहोतात. म्हणजे एकाच दिवशी पाहणी, बोलणी आणि लग्न असे तिन्ही कार्यक्रम उरकण्याला गेटकेन लग्नतेथे म्हणतात. शेतीसाठी सायफन म्हणून नदी-कालव्यातून मोठमोठ्या पाईपलाइन करण्याची पद्धत तेथे वाढली, त्या पाईपलाइनवर एअरव्हॉल्व्ह कायम हुस‘-हुसअसा आवाज करतात. त्यावरून एअरव्हॉल्व्हला हुसहुसाअसा नवीनच शब्द त्या बोलीत अवतरला.
काही म्हणी फक्त नगरनध्येच सापडतात. त्या काहीशा शिवराळ, नगरी लोकांच्या प्रकृतीला धरून असाव्यात.येळंला केळं न् वनवासाला सीताफळं’, ‘उखळात घालायचं, मुसळात काढायचं’, नवीन मुसलमान व्हायला न् रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली’, ‘चव ना चोथा येरे भुता’, ‘भूताकडून गीताअशा काही म्हणी तेथे आहेत. तसेच, तिरळ्या माणसाला कान्हेगाव-कोपरगावकिंवा नगर-भिंगारअसे म्हणण्याची आणि उगाच हेलपाटा पडला म्हणण्यालापुण्याहून पुणतांबा केलंअसे म्हणण्याची रीत तेथे आहे. विशेष म्हणजे कान्हेगाव, पुणतांबा ही गावे शेजारीशेजारीच आहेत. ती बोलीत अशी फिट्ट बसली आहेत. मराठीत त्यांचा वापर दूरवर होतो.
नगरात विहीर पुरुषभर मापात नाही, तर परसात मोजली जाते. मापाला बाजारातमापटंम्हणतात, तर मोजणीची परिमाणे अजूनही खंडी, मण, शेर, आदशेर, आच्छेर, पावशेर, अदपाव, आतपाव, छटाक अशी उतरत्या क्रमाने आहेत. प्रहराला पारखठरवले आहे. कालव्याचा पूल तवंगअसतो. ठेचणेहे क्रियापद चेचणेबनते. कोणीकडे म्हणताना कुंकडं(कुण्हंकडं) असे म्हटले जाते. ओरडाशब्दास आरोड’, ‘लई लामण लाऊ नकोसारखे वाक्प्रयोग तेथेच समजले जाऊ शकतात. एखाद्या गोष्टीत जास्त आशय वाढू लागला, की लांबणचे लामणहोते. लामणदिवा तेथूनच आला असावा.
खुद्द अहमदनगर शहराची भाषाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणतीही चांगली गोष्ट वर्णन करावी तर तेथे बेक्कारअसे म्हटले जाते. बाजारपेठेत वडा-पावचे एक दुकानही बेक्कारनावाचे होते. एखादी व्यक्ती तिचे काय वाकडे करणार, यावरून काय घंट्या करून घेणार’, ‘गडबडलायासाठी भांबाळला(भांबावला), ‘गडबड- गोंधळासाठी हुंबलअसे मजेशीर शब्द आहेत.
नगरला पहिलवानांचे पेव मोठे आहे आणि त्यांच्या तालमी ठिकठिकाणी आहेत. त्यातूनही नगरची काहीशी उर्मट भाषा जन्मली असावी. जार नाही वाळला, पण उत किती?’, ‘व्हटावरचं दूध नाही निवलं अजून’, ‘आळापण घालाव लागंल, औषीद शोदाव लागंलअशी दादागिरीची, दमबाजीची भाषा तेथे विपुल आहे. खास नगर तालुक्याच्या परिसरात करडईला किडा नाही, वक्ट्याला पिडा नाहीही म्हण ऐकण्यास मिळते. पायखुटीहा शब्द बृहत् अर्थाने वापरतात. अगदी लग्न करून देण्यासाठीदेखील. 

         

राम नगरकर

सोनईजवळ घोडेगावला जनावरांचा बाजार भरतो. तो प्रसिद्ध आहे. तेथील व्यवहारात गुप्त संकेतांचे अनेक शब्द वापरले जातात. विटी,भुरका, केवळी, तळी असे काही शब्द आहेत. म्हशीच्या नराला हाल्या’ (या नावाचे पात्र राम नगरकर विच्छा माझी पुरी करा या वगात करत असत), टोणगा, अगदी निरुपयोगी म्हणून ‘अंतुल्या’(कसा शब्द आला कोणास ठाऊक?) असे शब्द आहेत. म्हशीच्या मादी पिल्लाला वगारम्हणतात. भाकरीला भाकऱ्याम्हणतात. त्या तयार करण्याला बनवणारीच्या मनस्थितीप्रमाणे भाकऱ्या घडवणे’, ‘भाकऱ्या थापणे,’ ‘भाकऱ्या छापणे’, ‘भाकऱ्या बडवणेअसे विविध शब्दप्रयोग आहेत. भाजीला कोरड्यासम्हटले जाते. कर्जत भागात उडदाच्या आमटीस शिपी आमटीम्हणून पुकारले जाते. सोबत लसूण ठेचा, खर्डा, झिरकं (दाण्याची वाटून केलेली आमटी) असे खास नगरी प्रकार असतात. फळांमध्ये पेरूला जांब, चिक्कूला चक्कू असे सुलभ शब्द योजले जातात.

          नगरात पतंग उडवणे हा मोठा शौक आहे. त्यासाठी वो काप्यो’, ‘उईल्लावे’ ‘वोयखल्लासम्हणजे पतंग कापली, हरलास असे शब्द जाता येता सहज कानी पडतात. गणपतीचे कारखाने नगरच्या नेप्ती रस्त्यावर आहेत, तेथे डोळे रेखाटण्याला डोळे काढणे चालूअसा भयंकर मराठी शब्दप्रयोग वापरला जातो. उन्हाळ्यात बाप्ये माणसे डोक्यावर जे वस्त्र घेतात त्यास उपरणे, पंचा, बागायतदार, गमछा, टापरी अशी नावे व्यक्तीच्या सामाजिक वर्गवारीनुसार दिली जातात.नव्या पॅगो रिक्षांना तेथे त्यांच्या आवाजावरून टमटम’, हलण्यावरूनडुगडुगी’, दिसण्यावरून डुक्करअशी नावे आहेत. जीपला जीपडंआणि मोटारसायकलीला आवाजावरून फटफटीअसे म्हटले जाते. अशी रंजकता तेथील भाषेत आहे.
नगर जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील छावण्यांमधून उर्दूचा जन्म झाला. उर्दूचा प्रभाव तेथील भाषेवर आढळतो. घम ना पस्तावा’ (गम ना पछतावा) ही म्हण, पेस्तर (चालू साल), गुदस्ता (गुजिश्ता) असे काही शब्द उर्दू-फारसी शब्दांची आठवण करून देतात. तेथे मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांची दखनी हिंदी मोठी रंजक आहे. परडे में शेरड्या ओरड्या (परसात शेळ्या ओरडल्या), धावत्या धावत्या आया न् धपकन् आपट्या(धावत धावत आला नि धपकन् आपटला), हेल आणि बोल यांवरून नगरी बोली वेगळी काढता येईल. परंतु ती नष्ट पावत चालली आहे. त्याला वाढते नागरीकरण हे कारण आहे.
आंब्याचा आमरस पाणी टाकून वाढवला रस
ठकीला गं नवरा माझ्या मिळाला गांजेकस
माळ्याच्या मळ्यामधी बाई चिचचा आकडा
काहून येईना अजून भांग टोपीचा वाकडा
अशा ओव्या ऐकण्यास अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातच गेले पाहिजे. या साऱ्या भाषिक गमती मुख्यत: दक्षिण नगरमध्ये आढळतात. उत्तर नगर जिल्हा समृद्ध आहे. कारण तेथे सिंचनसोयी झाल्या आहेत. त्यामुळे 1930 च्या आसपास पुणे जिल्ह्यातून शेती करण्यासाठी आलेल्या नवस्थलांतरित आणि बागायतदारांची नवी संस्कृती तेथे रूजली.  
संतोष पद्माकर पवार 94227 96678
santoshpawar365@gmail.com
(महाराष्ट्र टाइम्स, 16 सप्टेंबर 2017 वरून उद्धृत, संपादित- संस्कारीत)
संतोष पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी मराठी विषयात एम ए केले आहे. त्यानंतर त्यांनी कृषीविषयात डिप्लोमाही केला आहे. त्यांनी कबुली’, ‘पिढीपेस्तर प्यादेमात’, ‘बहादूर थापा आणि इतर कविता हे कवितासंग्रह लिहिले. त्यांच्या कविता पुणे, सोलापूर, मुंबई, जळगाव विद्यापीठांमध्ये एम ए आणि बी ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या गेल्या आहेत. त्यांनी अरुण काळे यांच्यावरील ग्लोबलचं गावकूस ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांच्या कवितेला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते पुणे येथे राहतात. ते एकोणपन्नास वर्षाचे आहेत.
——————————————————————————————————–

About Post Author

8 COMMENTS

  1. सर,तुमच्या या लेखातून नगरी बोलीची खूपच वैशिष्ट्य माहित झाली.सुंदर लेख.प्रा.पुरुषोत्तम पटेल.

  2. नगरी बोलीभाषेतील शब्द वाचून खूप आनंद वाटला… हसायला पण आलं .. आमच्याही विदर्भात बोलले जातात असे अनेक शब्द वाचायला मिळाले .. जसे वगार .. खंडी .. आणखी बरेच ..खूप छान वाटलं वाचून

  3. उत्तम लिखाण.यातील काही शब्द सिन्नर तालुक्यात पण प्रचलित आहे.सिन्नर तसे नगर जिल्ह्याच्या सीमेवर आहे,म्हणून कदाचित तसे झाले असावे.महाराष्ट्रातील अशा बोलीभाषा टिकून राहिल्या पाहिजेत,शहरीकरणाच्या,स्थलांतराच्या रेट्यात त्या नष्ट झाल्या न पाहिजे.कुठलीही भाषा/ बोलीभाषा विकसित होण्यासाठी शेकडो वर्षे गेलेली असतात.यासाठी ती टिकून राहिली पाहिजे.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here