आजचा टाईम्स, आजचा वाचक

1
20

वृत्तपत्रे बदलली आहेत.बदलणं आजही चालूच आहे. फार जुनी गोष्ट नाही, अगदी १९९० च्या दशकापर्यंत टाईम्स ऑफ इंडिया आपल्या फ्रंट पेजवर वाचकांना झुकते माप देत असे. फ्रंट पेज वरील जाहिरात ही Solus प्रकारची म्हणजे त्या पानावर एकमेव अशी असे. त्या Front Page Solus ad चा  कमाल आकारही ठरलेला असे. २५ सेंटीमीटर उंची आणि ४ कॉलम्स रूंदी. तेव्हा एका पानावर आठ कॉलम्स असत. म्हणजे, टाईम्स आपल्या फ्रंट पेजपैकी फक्त पाव पान जाहिरातीसाठी देत असे. ह्या पाव पान मर्यादेचा दंडकही फार कडक असे. फ्रंट पेजवर कोणत्याही परिस्थितीत सोलस व्यतिरिक्त दुसरी जाहिरात घेतली जात नसे. फ्रंट पेजवर वाचकांचा पहिला अधिकार आहे, आणि त्यामुळे त्यावरील ७५% जागा वाचकांसाठी राहील हे तत्त्व टाईम्स कठोरपणे पाळी. असे म्हणत की उद्या पंतप्रधानांनी जरी फोन केला तरी टाईम्स पहिले पुर्ण पान जाहिरातीसाठी कधीही देणार नाही. हे तत्त्व पाळत काही दशके (१९६०, १९७०, १९८० ची तरी नक्कीच) मागे पडली.

आजचा ९ मेचा टाईम्स (मुंबई आवृत्ती) समोर आहे. पहिलं पान बिल्डरच्या जाहिरातीने १०० % भरलेलं आहे. वाचकांसाठी दुसरं पान आहे का? नाही. वाचकांसाठी दुसरंही नाही, तिसरंही नाही, चौथंही नाही, पाचवं पान तेही अर्ध वाचकाच्या वाट्याला आलं आहे. कारण पाचव्या पानावर दोन पाव पानी सोलस जाहिराती आहेत. टाईम्स म्हणजे वृत्तपत्रांना दिशा दाखवणारी बोरीबंदरची म्हातारी. सुकाणूच जणू. पण आज तोच सुकाणू अगतिकतेचे पांढरे निशाण दाखवत वाचकासाठी पहिल्या पानावरची ७५ % जागा तर सोडाच, संपुर्ण अंकातली पहिली ४५०% जागा जाहिरातदाराला देऊ लागला आहे. पण कोणत्याही वाचकाने टाईम्सला (वा तत्सम इतर वृत्तपत्राला) त्याचा जाब कधी विचारलेला नाही. वाचक हा जर ग्राहक मानला तर पहिल्या पानावर त्याचा हक्क सांगत तो हिरावला म्हणून कोणी वेडा वाचक ग्राहक न्यायालयात गेल्याचं आठवत नाही. कोणा संपादकाने त्या धोरणाचा निषेध करत वाचकांची बाजू घेऊन राजीनामा दिल्याचं उदाहरण नाही. आजचे कितीतरी संपादक केवळ आपण संपादक आहोत एवढ्याच टेसात सामान्य वाचकांकडे तुच्छ नजरेने पहात वावरताना दिसतात. नोकरी गेलेले, बेकार व निवृत्त पत्रकारांची आजची अवस्था तर केविलवाणी आहे. कोणी बोलवील का कुठे चॅनलवर असं गणपतराव बेलवलकर स्टाईलमध्ये म्हणत फिरणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांची संख्याही दिवसेदिवस वाढते आहे. वृत्तपत्रे आपल्याकडे लेख मागणार नाहीत, कारण अभिनेते, नट, नट्या, संगीत दिग्दर्शक यांच्याकडून वृत्तपत्रांना भरपूर लेख मिळतात हे त्यांना माहित आहे. ते बिचारे आपला काळ कसा होता हे सांगत पास्ट लॉरेल्सवर दिवस काढत आहेत. नोकरीत असलेल्या पत्रकारांना आपली नोकरी हे आळवावरचं पाणी आहे हे कळून चुकल्याने त्यांच्या मनात कमालीची असुरक्षितता आहे. त्या असुरक्षिततेपोटी अगतिकता आणि काही जण तर लाचारीची पातळी गाठत पुढे गेले आहेत. पत्रकारांच्या एकाही संघटनेने वाचकांची बाजू घेत पहिली किती पानं जाहिरातीसाठी द्यावी यावर मर्यादा असली पाहिजे अशी मागणी केलेली नाही.

वाचकाला तर आपल्या हक्काबद्दल कधीच सोयरसुतकच नव्हते. वृत्तपत्र आणि संपादक आपली बाजू घेऊनच लढणार हा स्वातंत्र्यपुर्वकाळात पसरलेला समज आजही कायम आहे. ती अफूची मात्रा वाचकांवर आजही लागू पडत असते.

उद्या असा दिवस येईल का की ज्या दिवशी वृत्तपत्रांची सगळी पानं जाहिरातींनी भरलेली असतील, आणि एका चिमुकल्या चौकटीत वाचकासाठी सुचना असेल की "बातम्या व इतर मजकूर वाचकांसाठी खास वेबसाईट वर मोफत उपलब्ध करण्यांत आला आहे. आमची पहिली वचनबद्धता ही आमच्या मायबाप वाचकांप्रती आहे. वेबसाइटवर त्यांच्यासाठी अधिकाधिक मजकूराची पाने देण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील. वाचकांनी आत्तापर्यंत सहकार्य केले आहे, यापुढेही करतील असा विश्वास आहे."

इथपर्यंत पाळी आल्यावर तरी आजचा वाचक त्या अफूच्या तारेतून जागा होईल का? की सवयी प्रमाणे रोजचा पेपर घेत राहील, आणि न वाचता तो रद्दीत टाकत राहील?

About Post Author

1 COMMENT

  1. mee tumchya matashi purnpane
    mee tumchya matashi purnpane sahamat asun vachakanchi baju gheun lihilyabaddal dhanyavad.

    mala dinkar gangal yanche patr dinank 21/12/2010 milale. mee Sahityik asun mazi 15 pustake prkashit asun tyat natak, kattha,
    kavita, samiksha, lekh adi sahtya prakar samavista ahet .

    Mala thinkmaharashtra ya web site shi judayache ahe krupaya savistar mahiti dyavi.

    email: ishwar.nandapure@gmail.com
    Mob: 9881021157

Comments are closed.