अनेक वर्षांनी निखळ आनंद देणारे विनोदी नाटक पाहिले

0
16

     विद्यासागर अध्‍यापक लिखीत आणि लता नार्वेकर निर्मित ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकाचा …


     विद्यासागर अध्‍यापक लिखीत आणि लता नार्वेकर निर्मित ‘आधी बसू मग बोलू’ या नाटकाचा प्रयोग मी गुरूवार दिनांक 19 मे 2011 रोजी पाहिला. या नाटकाचे दिग्‍दर्शन चंद्रकांत कुळकर्णी यांनी केले आहे. अनेक वर्षांनंतर इतका स्‍वच्‍छ आणि आणि मोकळ्या विनोदाचा अनुभव मी घेतला.

     गेली 5-6 वर्षे समीक्षक या नात्‍याने जी विनोदी नाटके मी पहात होतो, त्‍यातल्‍या बहुसंख्‍य नाटकांना बहुसंख्‍य प्रेक्षक का हसतात, हेच मला कळत नव्‍हते. त्‍यामुळे त्‍या उगाचच हसणा-यांच्‍या गर्दीत मी एक अडाणी व मुर्ख प्रेक्षक ठरत होतो. याची कारणमिमांसा मी शोधून काढली आणि मला असे आढळले की, आजचा प्रेक्षक पूर्वीसारखा एकाच पातळीवरचा नाही. त्‍यात भिन्‍न गट निर्माण झाले आहेत. काही प्रेक्षकवर्ग असा आहे ज्‍यांना विनोदाची जाण नाही, चांगले विनोद कळण्‍याची क्षमता नाही. त्‍याबाबतची जी एक विशिष्‍ट संस्‍कृति लागते आणि नाटक पाहण्‍याची जी पार्श्‍वभूमी लागते त्‍याचा पूर्णपणे अभाव असलेला हा प्रेक्षकवर्ग होता. पूर्वी कोणत्‍याही मराठी मराठी नाटकाला विशिष्‍ट बौद्धिक पातळीवरचा एक प्रेक्षकवर्ग लाभायचा, तशी परि‍स्थिती आता राहिलेली नाही. म्‍हणूनच फुटकळ, यमक जुळवणा-या विनोदांना हसणारे आणि खरोखरच काही बौद्धिक आनंद देणा-या विनोदाला हसणारे असे प्रेक्षकांचे दोन वर्ग आजमितीला पडतात.

     ‘आधी बसू…’ चा जो प्रयोग मी पाहिला तो बौद्धिक आनंद आणि निखळ विनोद यांचा आस्‍वाद देणारा होता. कोणत्‍याही प्रकारचा अतिरेक नाही, विडंबनाची टोकाची गाठलेली पातळी नाही, अश्‍लीलसूचक किंवा कंबरेखालचे विनोद नाहीत. नाट्यांतर्गत घडणा-या घटना वास्‍तवपूर्ण होत्‍या. चंद्रकांत कुळकर्णी यांची दिग्‍दर्शनातील सफाई वाखाणण्‍याजोगी आहे. कलाकारांच्‍या अभिनयातून स्‍वच्‍छ हास्याची निर्मिती होत होती. खूप दिवसांनी एक प्रसन्‍न आणि मोकळ्या विनोदाचे स्‍वच्‍छ नाटक पाहिल्‍याचा अनुभव मिळाला.

कमलाकर नाडकर्णी
नाट्यसमीक्षक

दिनांक – 20.05.2011

About Post Author

Previous articleसुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र
Next articleनितीन देसाईंनी सेट उभारावे!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.