अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….

0
21

आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्ताने
कवी कालिदासाचे हे स्मरण…

अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….

– श्रीप्रकाश अधिकारी

आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कवी कुलगुरू कालिदासाचे स्मरण करावयाचा दिवस. पण या कवीचे विस्मरण सा-या वर्षांत कधीतरी होते का? रघुवंश, कुमारसंभव, मालविकाग्नी मित्र, शाकुंतल, ऋतुसंहार, मेघदूत या काव्याची ओळख असलेला रसिक वर्षभरांतील विविध ऋतुकालात या काव्याचा प्रत्यय घेत असतो. प्रवासात असताना डोंगराला चाटून वळण घेत जाणारं नदीचं पात्र दिसलं, की ‘निक्षेपणाय पदमुधृतमुद्वहत्नि मार्गाचलाव्यतिकराकुलितेवसिंधू शैलाधिराजतनया न ययौ न तस्थौ’ हा, कुमारसंभवातील, पार्वतीने रूप बदलून आलेल्या स्वत: महादेवाकडूनच आपली स्वत:ची निदा ऐकल्यावर, व्रतस्थ असताना अधिक काही ऐकण्यापेक्षा निघून जाणं चागलं असा विचार करून उचललेलं पाऊल पण पुढे न जाताच थांबणं या प्रत्यक्ष कृतीतील कवी कालिदासाने उचललेला शब्दग्रथित जिवंतपणा कॅमेरामनलादेखील साधेल की नाही असाच आहे.

कवी कुलगुरू कालीदासमुंबईहून रत्नागिरीकडे जाताना अशा कित्येक नद्या आपल्याला दिसतील! कोलाडजवळची नदी पाणी कमी वाहत असताना पुलावरून पाहिली, की आठवतो तो ‘रेवां द्रक्षस्युपलविषमे विन्ध्यपादे विशीर्णा भक्तीच्छेदैरिव विरचिता भूतिमड्गे गजस्य’ – विंध्य पर्वताच्या पायथ्याशी वाहणारी विखुरलेली रेवा हत्तीच्या पाठीवर त्याला सजवण्यासाठी पट्टे ओढले असावेत अशी दिसेल.

इंद्रधनूची मजा तर कोकणात वारंवार पाहायला मिळते. सह्याद्रीचे सुळके आणि त्यावर वाहात येणारे काळे ढग, मध्येच पडणारे इंद्रधनुष्य – ‘रत्नच्छायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेत्पुरस्ता व्दल्मीकाग्रात्प्रभवति धनु:खण्डमाखण्डलस्य.’

कोकण रेल्वेने, बसने अथवा कारने फिरत असताना ‘शाकुंतला’तील ‘न मे दुरे किंचित क्षणमपि न पार्श्वे रथजवात्’ हा श्लोक आठवला, की आपण कण्व मुनीच्या आश्रमात कधी जातो ते कळत नाही. गाडीच्या खडखडाटातदेखील आश्रमातील शांती जाणवू लागते. निर्भयपणे फिरणारे प्राणी अंत:चक्षूच्या पडद्यावर दिसू लागतात. आफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलातदेखील हरीण, झेंब्रे, सिंह यांच्या डोळ्यांत निर्भयता दिसत होती, कारण हे प्राणी त्या जंगलात मुक्तपणे फिरत असतात आणि त्यांना पाहणारी माणसे मात्र बंद पिंज-याच्या गाडीतून त्यांना बघत असतात.

तसेच, मग आपण दिलीप राजाबरोबर गायी चारण्यासाठी जंगलात जाऊन पोचतो. तिथली वनराई… ‘शामायमानानी वनानी पश्यन्’ राजा त्या सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेत असताना कामधेनूची मुलगी नंदिनी… ‘गंगाप्रपातांतविरुढष्पं गौरीगुरोर्गव्हरमा विवेश’वरून गंगेचा धबधबा पडत असलेल्या गुहेमध्ये शिरावी त्याच क्षणी आपण बसलेल्या गाडीचा कर्कश्श ब्रेक लागावा आणि ‘रश्मिश्विवादाय नगेंद्रसक्ताम निवर्तयामास नृपस्य दृष्टी’…. लगाम खेचल्याप्रमाणे राजाची दृष्टी गाईच्या किंकाळीने खेचून घेतली तशी आपली अवस्था व्हावी. अशा प्रवासात खिडकीत एकटेच बसून या काव्यसृष्टीत गढून जाण्याची मजा काही औरच आहे!

पावसाला सुरूवात होण्याआधी धुळवाफेचा पेरा करतात. आपल्या गाडीने एखादे वळण घेतले आणि डोंगरमाथा गाठला की नांगरलेली अशी जमीन दिसते. मृगाच्या पावसाचे थेंब पडत असतील किंवा पडून गेले असतील तरी…. “सद्य: सीरोत्कषणसुरभि”… तो गंध नाकात भरून राहतो आणि घरी खिडकीत बसूनही या ओळी म्हणताना, तो मृदगंध बाजूला दरवळताना जाणवतो. तसाच समोर काळाभोर मेघ आकाशात वा-यावर जाताना दिसावा… ‘अद्रे श्रृडगं हरति पवन: किंस्विदिति’… अरे हा वारा पर्वताचे शिखरच वाहून नेतो आहे की काय असं त्या मुग्धसिद्धांगनांसारखे आपल्यालाही वाटावे, तोच मेघ एखाद्या शिखरावर विसावावा… “नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयामवस्था मध्ये श्याम: स्तन इव भुव: शेषविस्तारणाण्डु:’… आमराईच्या फिकट पिवळ्या रंगाने झाकलेल्या पर्वताचा पीतगौर कांतीसारखा दिसणारा उतार आणि शिखरावरचा काळाभोर मेघ देवयुगुलांना पृथ्वीचा शोभायमान झालेला उरोज आहे असे वाटेल.

हे आणि असे कितीतरी कल्पनाविलास कालिदासाच्या काव्याला अमर करून गेले आहेत. ‘मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्ति चेत:’… सुखी माणसाचे मनदेखील मेघ पाहून चलबिचल होते. या सत्याचा अनुभव सर्वानाच येतो. दोन हजार वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत लिहिलेल्या या अनमोल खजिन्याची ओळख नवीन पिढीला व्हावी अशी अपेक्षा बाळगणे उचित नव्हे का?

–  श्रीप्रकाश अधिकारी

shriprakashadhikari@yahoo.com

 

About Post Author

Previous articleआठवा स्वर
Next articleमटणाचे तुकडे आणि ब्राह्मणी मर्दानगी…
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.