अत्र्यांचा कॉग्रेसविरोध

0
67

अत्र्यांचा काँग्रेसविरोध

– नरेंद्र काळे

मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई ह्यांची सभा 20 नोव्हेंबर 1955 या दिवशी चौपाटीवर स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. संयुक्त महाराष्ट्राचे मुख्य दोन विरोधक एकाच वेळी व्यासपीठावर आहेत हे पाहिल्यावर संयुक्त महाराष्ट्रवादी मंडळी, उभय नेत्यांचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिली.

पोलिस, बॉडीगार्ड, स्वयंसेवक यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला गेला होता. व्यासपीठाभोवती बांबूंच्या साहाय्याने मोठमोठी कुंपण बांधलेली होती.

मोरारजी, स. का. पाटील आदी मंडळी व्यासपीठावर आली आणि लोकांच्या ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ अशा गर्जना जोरदार सुरू झाल्या. त्याचबरोबर ‘सदोबा, मोरारजी चले जाव’ अशाही घोषणा होऊ लागल्या; पोलिस घोषणा देणा-यांना आवरायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना न जुमानता गर्दी व्यासपीठाच्या रोखाने जाऊ लागली. सभेत एकच गोंधळ उडाला. त्या गोंधळात, स. का. पाटील ध्वनिक्षेपक हातात घेऊन गर्दीला उद्देशून म्हणाले, ”तुम्ही सारे संयुक्त महाराष्ट्रवाले गुंड, अडाणी आणि नालायक आहात! राज्य करण्याची अक्कल तुम्हाला आहे? याच वर्षात काय, पण पाच हजार वर्षांत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई तुम्हाला मिळणार नाही. मुंबई गुजरात्यांची आहे, मद्राशांची आहे, उत्तर भारतीयांचीही आहे; एकट्या महाराष्ट्राची नाही. त्यांना वाटते, की मुंबई चांगली आहे, सुंदर आहे. आयतीच आपल्याला मिळत आहे. पण लक्षात ठेवा. ही कॉस्मॉर्पोलिटन मुंबई फक्त तुम्हाला कधीही मिळणार नाही.”

स.कां.च्या या विधानावर श्रोते प्रक्षुब्ध झाले. त्यांनी जोडे आणि टोप्या व्यासपीठाच्या दिशेने भिरकावायला सुरुवात केली. तशातच मोरारजी म्हणाले, ”जोपर्यंत या देशात काँग्रेस आहे. तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही.” यानंतर श्रोत्यांनी जोडे-टोप्यांबरोबर दगडगोट्यांचाही वर्षाव केला. सभा उधळली गेली. स.का. आणि मोरारजी या दोघांच्या या विधानांचा पुरेपूर उपयोग आचार्य अत्र्यांनी, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात वातावरण तापवण्यासाठी केला.

वास्तविक, आचार्य अत्रे हे काँग्रेसचे होते. ते पुणे नगरपालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडूनही आले. स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. पण त्यांच्या मनात मोरारजींच्या विधानाचा इतका प्रचंड संताप भरून राहिला, की एका व्याख्यानात ते म्हणाले, ”देशात काँग्रेस असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं हा मोरारजी म्हणत असेल तर या देशातून काँग्रेस नेस्तनाबूत करणं हे आपलं (संयुक्त महाराष्ट्रवादींचं) पहिलं काम आहे.”

नरेंद्र काळे

narendra.granthali@gmail.com

भ्रमणध्वनी : 9822819709

 

About Post Author

Previous articleअपूर्णांकांचं प्रेम
Next articleआपल्या समोरील आदर्श
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.